वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक जडण घडण हे क नैसर्गिक वमहाराष्ट्राला लाभलेलं एरदान आहे. ढोबळपणे आपण महाराष्ट्राची भौगोलिक विभागणी कोकण, घाटमाथा,पठारी भाग आणि मैदाने अशी करतो. यातला कोकण आणि घाटमाथा ही विभागणी ज्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमुळे झाली आहे, ती सह्याद्रीची रांग लाखो वर्षांपूर्वी झालेल्या नैसर्गिक उलथापालथी मधून तयार झाली आहे.
सह्याद्रीचा जन्म
सुमारे शंभर-सव्वाशे दशलक्ष वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवरील दख्खनच्या पठाराचा एक भाग खचला आणि त्यामुळे जो भाग उंचावला गेला त्यावरच सह्याद्रीची रांग निर्माण झाली. ही पर्वत रांग निर्माण व्हायला कारणीभूत ठरला तो ज्वालामुखीचा उद्रेक. सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला अणि त्यातून बाहेर जो लाव्हा फेकला गेला. त्याचे थर साचून सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या. बेसॉल्ट म्हणजे अग्निजन्य खडकानं तयार झालेल्या सह्याद्रीनं महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास घडवला आहे, असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही.
भौगोलिक चमत्कारांचा सह्याद्री
राकट – उभे पहाड, त्यांच्या कुशीत उगम पावणाऱ्या नद्या, या नद्यांच्या खोऱ्यात वसलेली गावं आणि लोकजीवन. या लोकजीवनाशी जोडली गेलेली इथली प्राचीन मंदिरे – लेणी आणि सह्याद्रिच्या डोंगररांगेतील ऐतिहासिक किल्ले या सगळ्यांनी तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आकाराला आली आहे. या महाराष्ट्रात अनेक भौगोलिक चमत्कार निसर्गतः तयार झाले आहेत. ते बघताना निसर्गाच्या किमयेचं कौतुक वाटतं. माणसानं आपल्या कलाविष्काराची प्रेरणा अशा नैसर्गिक-भौगोलिक रचनांमधूनच घेतली असावी. यातल्याच काही निवडक गोष्टींचा हा थोडक्यात परिचय.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचं विवर
महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय पटलावर स्थान मिळवून देणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे ‘लोणारचे सरोवर’ किंवा ‘लोणारचे विवर’. हे सरोवर अशनीपातामुळे तयार झालेल्या सरोवरांपैकी जगातले सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. अगदी सुरवातीला लोणार इथलं विवर हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालं असावं, असा अंदाज प्रचलीत होता. परंतु अधिक संशोधनानंतर हे विवर अशनीपातामुळं म्हणजेच अवकाशातून पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केमुळे तयार झालं असल्याचं सिध्द झालं. संशोधकांच्या अंदाजानुसार सुमारे 60 ते 65 हजार वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळं लोणारचं विवर तयार झालं आहे. ही उल्का किंवा अशनी साधारण 60 मीटर रुंद आणि 10 लाख टनांपेक्षाही जास्त वजन असलेली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. सगळ्या जगात अग्निजन्य (बेसॉल्ट) खडकात तयार झालेलं हे एकमेव विवर आहे.
लोणार सरोवरातून मीठ निर्मिती
या ठिकाणी जो अशनी भूमीत घुसला तो अल्कलाइन गुणधर्माचा होता. त्यामुळेच या विवरातील पाणी खारट आहे. या विवरातून आजही क्षार मोठ्या प्रमाणावर बाहेर येतात. ‘लोणार’ हे नाव ‘लवण’ म्हणजे ‘मीठ’ या शब्दावरुनच पडलं आहे. जुन्या काळात लोणारच्या सरोवरातलं पाणी सूर्याच्या उष्णतेवर आटवून, त्यापासून तयार होणारं मीठ विकण्याचा व्यवसाय या परिसरात होता.
लोणारच्या सभोवती गोडं पाणी
आश्चर्य म्हणजे सरोवराच्या जवळपास खोदल्यावर गोडं पाणी लागतं. त्यामुळंच सरोवरालगतच्या जमिनीवर भाज्या-फळांची लागवड केली जाते. मात्र या लागवडीमुळं सरोवरातलं पाणी प्रदुषित होऊ लागलं आहे. त्यामुळं मानवी हस्तक्षेपापासून लोणार सरोवर वाचवणं जरुरीचं आहे.
दैत्यसूदन मंदिराचं उत्कृष्ट स्थापत्य
लोणार सरोवराचे संदर्भ ऋग्वेदापासून ते अकबरनामापर्यंत वेगवेगळ्या काळातील ग्रंथांमध्ये आढळतात. लोणार सरोवराजवळच प्राचीन दैत्यसूदन मंदिर आहे. या मंदिराच्या पुराणकथेतही श्री विष्णूंनी जमिनीतील छिद्रात शिरुन लपून बसलेल्या ‘लवणासूर’ नावाच्या दैत्याचा वध केला आणि त्याच्या रक्ताने ते छिद्र भरुन गेले, असा उल्लेख आढळतो. दैत्यसूदन मंदिर अनेक शतकं जमिनीखाली गाडलेलं होतं. 1878 साली ते उत्खनन करुन बाहेर काढण्यात आलं. या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकाम आणि शिल्पे खजुराहो मंदिराची आठवण करुन देतात. लोणार सरोवर आणि दैत्यसूदन मंदिर हे महाराष्ट्राच्या भौगोलिक-सांस्कृतिक मानचिन्हांपैकी एक आहेत.
भौगोलिक चमत्कार रांजण खळगे
राकट, कणखर, रांगड्या महाराष्ट्र देशाला सुजलाम सुफलाम करुन नाजूक,कोमल फुलांचा दळदारी देशा बनवण्याचं काम केलं आहे इथल्या नद्यांनी. कृष्णा-कोयना असो किंवा सावित्री-वसिष्ठी, पूर्णा – तापी असो किंवा वैनगंगा-पैनगंगा या सगळ्या नद्यांनी काठावरचं लोकजीवन तर समृध्द केलं. पण आपल्या संदर्भातील पुराणकथा आणि लोककथांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक संचितही समृध्द केलं आहे. यातील काही नद्यांनी त्यांच्या ओघवत्या प्रवाहात काही निसर्ग शिल्प घडवली आहेत. त्या शिल्पांमुळे महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यांना एक वेगळंच परिमाण लाभलं आहे. नदीच्या प्रवाहामुळं तयार होणारं निसर्ग शिल्प म्हणजे ‘रांजण खळगे’. अहमदनगर जिल्ह्यातील ‘निघोज’ या गावाजवळ कुकडी नदीच्या प्रवाहात तयार झालेले रांजण खळगे प्रसिध्द आहेत. नदीच्या पात्रात जे खडक असतात, त्यात कठीण आणि मृदु खडकांचे स्तर एकमेकांत मिसळेले असू शकतात. नदीचे पाणी वेगाने वाहाताना सोबत काठावरचे दगड गोटे घेऊन येते. हे दगड-गोटे आणि पात्रातले खडक यांच्यात घर्षण होतं. त्यामुळे खडकातला मृदू भाग झिजतो आणि कठीण भाग शिल्लक राहातो.वर्षानुवर्षे ही क्रिया घडते आणि त्यातून नदीच्या पात्रातील खडकांमध्ये गोल गोल आकाराचे खळगे तयार होतात. काहीशा खोल वाटणाऱ्या या खळग्यांना त्यांच्या आकारावरुन ‘रांजण खळगे’ असं नाव मिळालं आहे.निसर्गाची आर्ट गॅलरी
निघोजचे रांजणखळगे बघण्यासाठी आता तिथे एक झकास पूल तयार केला आहे. त्यामुळे तुम्ही नदीच्या पात्रावर उभे राहून नदीचा प्रवाह आणि त्यानं निर्माण केलेले शेकडो रांजण खळगे सहज पाहू शकता. हे असे खळगे तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात. त्यामुळं या निसर्ग शिल्पांचं दर्शन घेताना मन थक्क होतं. नजर जाईल तिकडे या खळग्यांनी व्यापलेला भूभाग पाहून ही जणू ओपन आर्ट गॅलरी असावी असाच भास होतो. नदीच्या काठावरच मळगंगा देवीचं मंदिर आहे. या सगळ्या परिसरात फिरताना पुन्हा पुन्हा आपलं लक्ष वेधतात ते नदिच्या प्रवाहाने आपोआप तयार झालेल्या शिल्पकृती. असे रांजण खळगे फक्त निघोज जवळच नाहीत, तर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातही असे खळगे आहेत. पुणे जिल्ह्यातील शेलारवाडी जवळ इंद्रायणी नदीच्या पात्रात ही नव्यानं म्हणजे साधारण सत्तर -ऐंशी वर्षांपूर्वी तयार झालेले रांजणखळगे पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातील उरमोडी नदीच्या प्रवाहात आणि सांगली जिल्ह्यातील बलवडी इथंही असे रांजण खळगे आहेत. छिन्नी-हातोड्यांनी माणसांनी तयार केलेल्या कलाकृतींची प्रेरणा बहुदा अशा निसर्गातील स्वयंभू कलाकृतींमध्येच असावी.
डोंगरातली ‘नेढं’
निसर्गातील घडामोडींनी नदीच्या पात्रात रांजण खळगे तयार होतात तर डोंगररांगेत ‘नेढं’ तयार होतं. महाराष्ट्राचा कणा असलेल्या सह्याद्रीच्या लांबलचक डोंगर रांगेत अनेक ठिकाणी हा आविष्कार बघायला मिळतो. नेढं या शब्दाचा नेहमीच्या वापरातला अर्थ आहे ‘सुईला जे दोरा ओवण्यासाठी लहानसं छिद्र असतं ते ’. सुईच्या आकाराच्या मानाने जसं तिचं नेढं अगदी लहान,बारीक,चिंचोळ असतं त्याच प्रमाणे डोंगररांगेत काही ठिकाणी मधेच पडलेलं भोक पाहायला मिळतं. आता ताठपणे उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत हे असं छिद्र कोण निर्माण करतं? तर अर्थातच वारा, पाऊस, ऊन, पाण्याचे प्रवाह यांच्यामुळे डोंगराला अशी लहान लहान भोकं पडतात. या गोष्टींचा सतत होणारा मारा खडकातल्या मृदू भागाला हळू हळू नष्ट करत जातो. ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असते, त्यामुळे असं छिद्र किंवा भोक तयार व्हायला शेकडो वर्ष लागतात. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर उभारलेल्या काही किल्ल्यांच्या आसपास हा निसर्ग चमत्कार बघायला मिळतो.रायगडाच्या पायथ्याथी दुनळी नेढं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीवर एक नेढं आहे. लोणावळ्याजवळच्या लोहगड किल्ल्याकडे जाताना तिथल्या डोंगरात ही नेढं बघायला मिळतं. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी देखिल एक झकास नेढं आहे. या नेढ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दुर्बिणीप्रमाणे दुनळी आकारात नेढं बनलं आहे. या नेढ्यामागची गुहा अतिशय प्रशस्त आहे,तिथे साधारण पंधरा-वीस लोक सहज मुक्काम करु शकतात.या नेढ्यातील गुहेत गेल्यावर आपण एखाद्या अवाढव्य प्राण्याच्या दोन डोळ्यांमधून खालचा परिसर बघतोय असा भास होतो. आता रायगडच्या पायथ्याशी झालेल्या हॉटेल्समुळे या नेढ्याची वाट जरा लपली आहे पण वाट वाकडी करुन रायगडावर जाण्याआधी या नेढ्याला अवश्य भेट द्यावी अशीच ही जागा आहे. महाबळेश्वरच्या एलिफंटा पॉइंटवरुन दिसणारं नेढं आणि नाशिक जवळच्या सप्तशृंगी गडावरुन दिसणारं नेढं सर्वांनीच पाहिलं असेल.
नेढ्यांच्या पुराणकथा
यातल्या काही नेढ्यांच्या बाबत लोककथा-पुराणकथा प्रचारात आहेत. साल्हेरच्या किल्ल्यावर परशुरामांचे मंदिर आहे. त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य असताना, त्यांनी कोकणची निर्मिती करताना जो बाण सागरावर सोडला तो साल्हेरच्या समोरच्या डोंगरातून आरपार गेला आणि तिथे नेढं निर्माण झालं अशी कथा सांगतात. नाशिक जिल्ह्यातील मोहनदर आणि कण्हेरगड या किल्ल्यांनाही नेढं लाभलेलं आहे. मोहनदरचे नेढे सप्तश्रुंगी गडावरुन दिसतं. त्याबाबत अशी कथा सांगतात की देवी सप्तश्रुंगीने जेंव्हा महिषासुराचा वध करायला त्याचा पाठलाग केला, तेव्हा तो मोहनदरच्या डोंगरामागे लपून बसला. त्यावेळी देवीने त्या डोंगरावर इतक्या जोराने लत्ता प्रहार केला की डोंगराला भोक पडलं. तेच आज दिसणारं नेढं आहे.
आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलातील ही आश्चर्ये म्हणजे आपला नैसर्गिक ठेवा आहे,पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांचा उपयोग सुयोग्य पध्दतीने करायला हवा.
4 Comments
धन्यवाद
फारच छान लेख
धन्यवाद 🙏
छान लिखाण. एकून असलो तरी डिटेल्स कळले