केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या नागरिकांनाही आता आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 11 सप्टेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळं देशातील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना आणि 4.5 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे.
कोण आहेत पात्र?
सरकारने या योजनेच्या पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. ग्रामीण भागात राहणारे नागरिक, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, अपंग व्यक्ती, असंघटित क्षेत्रातील कामगार, आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर या योजनेसाठी पात्र आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल.
कोणाला मिळणार नाही लाभ?
संघटित क्षेत्रात काम करणारे लोक, कायमस्वरूपी घर आणि वाहन असलेले नागरिक, EPF धारक, ESIC सदस्य, सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणारे नागरिक यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
कॅशलेस उपचार सुविधा
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देशभरातील अधिकृत रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा दिली जाणार आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि दाखल झाल्यानंतर 15 दिवसापर्यंतचा उपचार खर्च यामध्ये समाविष्ट असणार आहे.
We are committed to ensuring accessible, affordable and top quality healthcare for every Indian. In this context, the Cabinet today has decided to further expand the ambit of Ayushman Bharat PM-JAY to provide health coverage for all citizens above 70 years. This scheme will…
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2024
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
“प्रत्येक भारतीयाला सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 70 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी या योजनेची व्याप्ती वाढवली आहे,” असे मोदींनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर निर्णय
याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 5 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये जलविद्युत प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय साहाय्य योजना, PM-eBus सेवा, पीएम ग्राम सडक योजना, नाविन्यपूर्ण वाहन प्रोत्साहन योजना आणि ‘मिशन मौसम’ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.