माल्कमनं दापोडी गार्डनचं महत्त्व पटवून द्यायला काही पावलं उचलली. त्यानं कोर्टाला आणि त्याच्या काही विरोधकांना पत्रं लिहिली. दख्खनेतल्या सरदारांना मोठाल्या बागा उभारायला, जोपासायला आवडतात. त्यांच्यापैकी काहींनी दापोडीच्या बागेला भेट दिली असून आपण त्यांना बिया, रोपं पुरवल्याचं त्यानं पत्रात लिहिलं.
आपण अनेकांना बटाट्याचं वाण दिल्याचं लिहायलाही तो विसरला नाही. आपण सरदारांना, श्रीमंत नागरिकांना युरोपीय आणि अमेरिकी बिया, रोपं दिली, तर त्यांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलेल, आपल्या व्यापारात ते सहकार्य करतील. आपल्याला इथे आरामात राज्य करता येईल, हेही त्यानं पुढे लिहिलं.
व्यापार केंद्रस्थानी
पूना छावणीत त्यावेळी पाण्याची टंचाई होती. त्यामुळे तिथे फळं, भाजीपाला पिकवणं कठीण झालं होतं. माल्कमनं सुचवलं की, दापोडीतल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पिकं घेऊन कलकत्त्याच्या गार्डनप्रमाणे त्यांची विक्री करता येईल आणि त्यामुळे युरोपीय सैनिक आणि नागरिक या दोहोंना फायदा होऊ शकेल.
स्वतःच्या अधिकारांचा वापर
परंतु कोर्टाचा निर्णय लगेच आला नाही. माल्कमनं मग त्यासाठी वाट न बघता स्वत:च बोटॅनिकल गार्डन उभारायचं ठरवलं. तो बॉम्बे इलाख्याचा गव्हर्नर होता. काही ठरावीक रक्कम खर्च करण्याचे त्याला अधिकार होते. त्यानं ते वापरून दापोडीच्या गार्डनचं काम सुरू केलं. त्याला खर्च करता येणारी रक्कम गरजेपेक्षा खूप कमी असली, तरी त्याला आता कोर्टाच्या निर्णयासाठी थांबावं लागणार नव्हतं. या खर्चावर कोर्ट आक्षेप घेऊ शकत नव्हतं.
“दापोडीच्या गार्डनमध्ये जगातल्या विविध भागातली फळझाडं, भाज्या, धान्य एकत्र रुजवण्याची मला इच्छा आहे”, असं उद्घाटन करताना त्यानं जाहीर केलं. असिस्टंट सर्जन विल्यमसन हे गार्डनचे पहिले सुपरिंटेंडन्ट होते. त्यांनी लगेच वॉलिक यांच्याशी संपर्क साधला. वॉलिक पुढची अनेक वर्षं दापोडीला कलकत्ता, एडन, कैरो इथून बिया पाठवत राहिले. मात्र विल्यमसन यांचा अकाली मृत्यू झाला.
बागेतल्या मातीचे परिक्षण
त्यांच्या जागी आलेल्या चार्ल्स लश यांनी गार्डनचा पाणीपुरवठा सुधारला. तिथल्या मातीचे नमुने तपासणीसाठी युरोपातल्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले. बागेत काळी माती होती. शेजारी मात्र चुनखडी आणि नदीची वाळू होती. त्यांचा वापर करून घेता येईला का, यासाठी त्यानं प्रयोग सुरू केले.
शेतकऱ्यांना विविध रोपं मोफत
लशचे उत्तराधिकारी होते डॉ. अलेक्झांडर गिब्सन. त्यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा गार्डनमध्ये पीच, पेरू, आंबे, सफरचंद, जर्दाळू अशी कितीतरी फळझाडं होती. अव्होकादो आणि बदाम होते. त्यांनी हिवरा आणि शिवनेरी इथेही बागा तयार केल्या. तिथे तयार झालेली रोपं शेतकर्यांना फुकट वाटली. त्यांनीच दापोडीला निलगिरीहून बटाट्याची वाणं आणली. त्यातली काही पुढे तळेगावला शेतकर्यांना दिली. कापूस आणि मॉरिशसहून आणलेला ऊसही इथेच लावला गेला.
हिवऱ्याच्या बागेला महत्त्व
कालांतरानं दापोडीचं बोटॅनिकल गार्डन बंद केलं गेलं. हिवर्याच्या बागेला महत्त्व आलं. नंतर गणेशखिंड परिसरात मोठी बाग निर्माण केली गेली. या गणेशखिंड गार्डनमध्ये फळ – भाज्या – धान्य यांच्यावर प्रयोग होत राहिले. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
नव्या पिकांचं मोल
बटाट्यांच्या लागवडीत मिळालेल्या यशाबद्दल बोलताना सांगलीचे राजेसाहेब माल्कमला म्हणाले होते, “तुम्हां युरोपियांच्या तुलनेत आम्हां ब्राह्मणांच्या दृष्टीनं एका नव्या भाजीचं मोल कितीतरी पट अधिक आहे.” हे केवळ बटाट्याबद्दलच नाही, तर इतर अनेक भाज्या-फळांबाबतही खरं आहे. आणि त्याचं श्रेय माल्कम आणि दापोडीच्या बोटॅनिकल गार्डनला द्यायला हवं.