सुरतेची लूट असा धडा वाचलेल्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात आणि देशात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘सुरत लुटली’ या विधानाला कधी कुणी आव्हान देईल असं वाटलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली याचा अन्वयार्थ छत्रपती लुटारू होते, असा लावण्याचं धाडस कुणाच्या स्वप्नातही येण्याचं काही कारण नव्हतं. छत्रपतींनी राजधर्म, स्वराज्यधर्म पाळला होता, याबाबत संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही मनात शंका नाही.
पण गेल्या काही दिवसांत ‘सुरतेची लूट’ हा धडा नव्याने शिकवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. त्यांच्या दृष्टीने तेव्हाची मुघलांची सुरत आजचे गुजरातेतले एक शहर आहे आणि गुजरात राज्यातून आलेले अध्वर्यू आज दिल्लीत राज्यकर्ते आहेत. म्हणून मराठ्यांच्या साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासातल्या सुरतेच्या लुटीचे संदर्भ नव्या चष्म्यातून पाहण्याची गरज काहींच्या राजकीय सोयीसाठी निर्माण झाली आहे.
इतिहासातील संदर्भांचे दृष्टिकोण हे असे राजकीय सोयीने किंवा वर्तमानकाळातल्या घटनाक्रमाने बदलू लागले तर मग इतिहासाचा अर्थ लावणे अवघड होत जाईल. इतिहासासोबत अनेक अभिनिवेश, भावभावना येतात. जेते आणि पराजितांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोण वेगवेगळा असू शकतो. ऐतिहासिक स्थानांची भौगोलिक, राजकीय, सामाजिक आणि प्रसंगी धार्मिक परिस्थिती काळाच्या ओघात बदललेली असू शकते. अशावेळी सुरत शहराच्या निमित्ताने मराठ्यांचा आणि गुजरातचा इतिहास वर्तमानातल्या राजकीय परिस्थितीत पाहून वेगवेगळे अभिनिवेश निर्माण केले जात आहेत. हे योग्य नाही.
छत्रपतींनी एकदा नव्हे दोनदा सुरत लुटली होती. स्वराज्याच्या विस्तारासाठी, गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी, रयतेच्या सुविधेसाठी निधी आवश्यक होता. 300 वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या मुलुखगिरीत रयतेच्या भल्यासाठी अशी लूट सर्वमान्य होती. म्हणून काही शिवाजी महाराजांना ‘लुटारू’ असं विशेषण लागू शकत नाही. त्या काळातल्या अनेक राजा-महाराजांना आपल्या प्रजाजनांची काळजी घेण्यासाठी, सैन्यदल उभे करण्यासाठी, घोडदळाच्या चारापाण्यासाठी, जनतेच्या अन्नपाण्यासाठी, रस्ते, तलाव, पाणपोया, मंदिरं, नदीचे घाट आणि इतर पायाभूत सुविधांसाठी आपला खजिना रिता करून चालणार नव्हतं. जेव्हा युद्ध किंवा आक्रमणं व्हायची तेव्हा खंडणी वसुल करणं हा तहाचा अविभाज्य भाग असायचा.
मऱ्हाठ्यांच्या घरातला तरणाबांड मुलगा दसऱ्याच्या मुहूर्तावर तलवार आणि घोडा घेऊन सीमोल्लंघनासाठी निघायचा तो खरंखुरं सोनं लुटायलाच. दसऱ्याचं सोनं लुटणं, आनंद लुटणं हे मराठीतले सर्वमान्य वाक्प्रचार आहेत.
छत्रपती शिवराय हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. ते रयतेसाठी जितके सालस आणि दयाळू होते तितकेच ते शत्रूसाठी न्यायनिष्ठुर होते. पुण्याच्या लाल महालात औरंगजेबाचा अत्याचारी मामा शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली याचं आपल्याला आज विशेष कौतुक असलं तरी शिवाजी महाराज केवळ बोटं छाटून समाधानी नव्हते. त्याआधी तीन वर्षे शाहिस्तेखानाने महाराष्ट्रात उधम माजवला होता. मोठीच नासधूस केली होती. शाहिस्तेखान बंगालला पळाला तेव्हा शिवाजी महाराजांच्या मनात त्याने तीन वर्षांत केलेल्या नुकसानाची भरपाई करण्याचे घोळत होते.
त्यांनी त्याचवेळी मोगलांच्या प्रदेशात सर्जिकल स्ट्राइक करण्याचे ठरवले होते. हा सर्जिकल स्ट्राइक केवळ फौजी हल्ल्याचा मनसुबा नव्हता तर स्वराज्याची नुकसान भरपाईही त्यातून अपेक्षित होती. त्यामुळेच महाराजांनी बहिर्जी नाईकांना सुरतेची बारीकसारीक माहिती काढायला सांगितली होती.
सुरत हे त्याकाळी मोगलांचे भरभराटीला आलेले व्यापारी केंद्र होते. तिथे डच, फिरंगी आणि ब्रिटिशांच्या व्यापारी वखारी होत्या, अरब, तुर्क, इराणी यांच्या बाजारपेठा आणि गोदामं होती. बोहरी, कासम, बेग, मारवाडी, माहेश्वरींच्या श्रीमंती गढ्या आणि व्यापारी सराया होत्या. सुरत हे ग्रीस, इजिप्तशी व्यापार करणारे सातत्याने लगबग असलेले व्यापारी बंदरही होते. मोठ्या प्रमाणात जडजवाहिर, सोन-नाणं, चांदीच्या ऐवजांनी सुरत लडबडलेलं होतं. सुरतेवर छापा मारल्यास स्वराज्यासाठी योग्य ती आर्थिक रसद मिळणार होती. सर्व नुकसान भरून येणार होतं.
पण हा सर्जिकल स्ट्राइक सोपा नव्हता. मोगलांच्या प्रदेशात 300 कि.मी. आत जायचं होतं. आठ-दहा हजारांची फौज, घोडे व खेचरं घेऊन फारशी वाच्यता न करता सुरतेपर्यंत पोहचणं अवघड काम होतं. 1663 सालच्या डिसेंबरच्या थंडीत शिवाजी महाराजांचं सैन्य दिवसा पर्वतीय प्रदेशात थांबून आणि रात्री प्रवास करत जानेवारी 1664 च्या सुरुवातीला उधना या सुरतेजवळच्या शहरात पोहचलं तेव्हा ‘सिवा आया, सिवा आया’ अशी एकच बोंब उसळली आणि सुरतेमध्ये हलकल्लोळ उडाला.
सुरतेचा मोगल नवाब इनायत खान याला महाराजांनी रीतसर वकील पाठवून नोटीस दिली. त्याला इनायत खानाकडून उद्धट उत्तर आलं. इनायत खानाच्या वकिलाने उधना येथील शामियानात महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराजांच्या धारकऱ्यांनी या हल्ला करणाऱ्या वकिलाचा तिथेच खातमा केला. इनायत खानाने ठरावीक व्यापारांना आणि इंग्रज, डच व फ्रेंचांना आपल्या किल्ल्यात आसरा देऊन सुरतेला वाऱ्यावर सोडलं. महाराजांनी सुरतेतली गिरीजाघरं, परोपकारी डच व्यापारी आणि काही सन्माननीय नागरिकांचा अपवाद करून बाकी सुरतेवर हल्लाबोल केला.
सुरतेतल्या सरायांमधली संपत्ती काढून घेतल्यानंतर मराठ्यांनी सुरतेत जाळपोळ केली असं सांगितलं जातं. त्याचं कारण पळवून आणलेल्या स्त्रिया व गुलामांच्या विक्रीचं केंद्रही सुरतेत त्या काळात विकसित झालं होतं. सुरतेतून जहाजांद्वारे भारतीय स्त्रिया गुलाम म्हणून पाठवल्या जात होत्या. शिवाय मोगलांच्या चुंगी करवसुलीचं कंबरडं मराठ्यांना मोडायचं होतं. म्हणूनच लुटल्यानंतर सुरत जाळली गेली. महाराजांनी केवळ सुरत लुटली नाही, त्यांनी या मोगलांची अब्रू वेशीला टांगली, मोगलांची घमेंड लुटली, त्यांचं स्वास्थ्य लुटलं.
जानेवारी 1664 मधल्या पहिल्या लुटीनंतर औरंगजेबाचा मोठाच तिळपापड झाला आणि त्याने मिर्झा राजे जयसिंग यांना महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी धाडलं. त्यानंतरचा पुरंदरचा तह आणि महाराजांची आग्र्याची कैद आपणा सर्वांना माहीत आहेच. महाराजांनी आग्र्याहून सुटका करवून घेतल्यानंतर झालेलं नुकसान पुन्हा भरून काढण्यासाठी तेव्हाच सुरतेच्या दुसऱ्या लुटीचा प्लान आखून ठेवला असणार. 1664 लुटीनंतर सुरतेत दर चार-सहा महिन्यांनी ’सिवा आ रहा है’ अशी अफवा सुरतेत पसरायची आणि सुरतेतले लोक सैरावैरा धावायचे. या अफवा बहिर्जी नाईक यांचीच माणसं पसरवत असावेत.
ऑक्टोबर 1670 मधल्या दुसऱ्या सुरतस्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना फारसा विरोध झाला नाही. कारण सततच्या अफवांमुळे सुरतेची गत ‘लांडगा आला रे’ सारखी झाली. गमतीचा भाग म्हणजे औरंगजेबाचा पुत्र शहजादा मुअज्जम हाही सुरत लुटण्यासाठी सुरतेवर चालून येतोय, अशा अफवाही या कालखंडात होत्या. म्हणजे सुरत लुटणं हा काही केवळ एकट्या शिवाजी महाराजांचा अजेंडा नव्हता. स्वतः औरंगजेबाच्या मुलाला स्वतःच्या बापाचीच प्रॉपर्टीच लुटणं गैर वाटत नव्हतं. म्हणूनच त्या कालखंडात या लुटीला आजच्या लुटमारीचा संदर्भ लावता येत नाही.
विशेष म्हणजे सुरतेच्या दुसऱ्या लुटीदरम्यान महाराजांना आणखी एक जबरदस्त लूट मिळाली. त्या पराक्रमी ऐतिहासिक घटनेचा आपल्याला विसर पडला आहे. दुसऱ्या लुटीच्या दरम्यान महाराजांनी जप्त केलेली सर्व संपत्ती रायगडाकडे धाडली आणि ते स्वतः बुऱ्हाणपूरच्या दाऊद खानाचा सामना करण्यासाठी दिंडोरीला थांबून राहिले. ही दिंडोरीची लढाई महाराज जिंकले आणि मोगल हरले. या लढाईत महाराजांना मोगलांचा तोफखाना, दारूगोळा आणि घोडेही मोठ्या प्रमाणात लूट म्हणून मिळाले. हा सुरतेच्या लुटीनंतर दिंडोरीच्या लढाईत मिळालेला बोनस होता.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक लोकविलक्षण व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांच्या लढाईतील शौर्याच्या, उत्तुंग पराक्रमाच्या, धाडसी सामरिक नीतीच्या, बुद्धिमत्तेच्या, प्रशासकीय कौशल्याच्या, उमद्या स्वभावाच्या कहाण्यांचे गारुड जगभर आहे. लूट आणि लुटारू यावरून शब्दच्छल केल्याने या प्रतिभावंत कीर्तिवंत राजसी व्यक्तिमत्वाच्या लोकप्रियतेत कुठलीही तूट येणार नाही. हा अलौकिक राजा या देशाच्या मातीत जन्मला हे या मातीचं सौभाग्य. राजे जितके महाराष्ट्राचे तितकेच ते गुजरातचे, तितकेच कर्नाटकाचे आणि तितकेच या देशाचे आहेत.
शक्तिशाली मोगल साम्राज्याला आपल्या अफाट क्षमतेने धडका देत छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात मराठा साम्राज्य उभं केलं, ते खऱ्या अर्थाने स्वराज्य म्हणून या संपूर्ण देशाने स्वीकारलं आहे. या प्रतापी राजाने या भारतवर्षातील सर्व भाषिकांचं, सर्व जाति-धर्मीयांचं, सर्व प्रांतातील लोकांचा आदर आणि प्रेम लुटलं आहे. सुरतेची लूट या प्रेमाच्या लुटीपुढे काहीच नाही.
1 Comment
झकास