नाशिक महाराष्ट्रचं एक प्रमुख शहर म्हणून ओळखलं जातं. इथली देवस्थानं आणि गोदावरी नदीमुळे नाशिकची देशभरात वेगळी ओळख आहे. नाशिकची आणखी एक ओळख म्हणजे द्राक्ष. इथल्या द्राक्षांना देशभरातून मोठी मागणी असते. नाशिक पुण्यापासून 205 किलोमीटर तर मुंबई पासून 150 किलोमीटरवर आहे. त्यामुळं पर्यटकाना कनेक्टिविटीचे खूप सारे ऑपशन्स मिळतात. या सर्व गोष्टींमुळं स्थानिकांना रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही नाशिकला आल्यावर नाशिकमधल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या.
श्री सप्तश्रुंगी देवी – महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. त्यापैकी त्रिगुणात्मक स्वरुपात आद्यस्वयंभू शक्तीपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. श्री सप्तश्रुंगी देवीचे मंदिर, नाशिकच्या उत्तरेस 65 कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेत वसलेले आहे. डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून सुमारे 4600 फुट उंचीवर हे ठिकाण आहे. इथं हजारोंच्या संख्येने भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशभरातून दर्शनासाठी येतात.
त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक शहरापासून 28 कि. मी अंतरावर आहे. इथं जाण्यासाठी भाविकांना प्रत्येकी 15 ते 20 मिनिटांनी एसटी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच खाजगी किंवा स्वतःच्या सोयीनुसार भाविक इथं आपला प्रवास करू शकतात. हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पवित्र गोदावरीचे उगमस्थान, भोलेनाथाने काहीकाळ निवास केलेला ब्रम्हगिरी पर्वत, निवृत्तीनाथ महाराजांची समाधी, नागपंथी आखाडा ह्या ठिकाणांमुळे संपूर्ण भारतात त्र्यंबकेश्वर हे ठिकाण एक तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळा हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
श्रावणी सोमवार प्रदक्षिणेसाठी भाविक मोठ्या संख्येने इथं येतात. श्रावणातल्या हिरव्यागार ऋतूनंतर येतो तो कार्तिक महिना. संपूर्ण त्र्यंबकेश्वर कार्तिक महिन्याची वाट पाहत असतो. कारण कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेला भगवान त्र्याम्बकेश्वराची रथयात्रा असते.
पांडव लेणी – बौद्ध धर्मीयांची प्राचीन लेणी असणारे हे ठिकाण शहरापासून 8 कि . मी . अंतरावर आहे.

चांभार लेणी – नाशिकच्या उत्तरेस 8 कि.मी. अंतरावर जैन धर्मियांची लेणी आहेत. त्यास चांभार लेणी असे म्हणतात. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर 1942 साली बांधले आहे. पुढं साडे तीन फूट उंचीची पारसनाथांची मूर्ती आहे. ही लेणी अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत.
हरिहर किल्ला – नाशिक पासून त्र्यंबक खोडाला रस्त्यावर निरगुड पाडा नावाचे गाव आहे. जे त्रंबकपासून 21 कि.मी. अंतरावर आहे. या किल्यावर जाण्यासाठी काळ्या कातळात खोदलेल्या उभ्या दगडी पायऱ्या आहेत. त्यामुळे नवीन ट्रेकर्ससाठी हे एक वेगळं ठिकाण आपल्या म्हणता येईल. या ठिकाणी पावसाळ्यात शेवाळे असतात, त्यामुळे चढणे धोकादायक आहे. भास्कर गढ व कणीचा डोंगर ही दोन्ही स्थाने इथून जवळपास आहेत.
हातगड किल्ला – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात हा ऐतिहासिक व प्राचीन किल्ला आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 1 हजार 14 मीटर आहे. नाशिकहून सापुताऱ्याच्या वाटेवर चार किलोमीटर अलीकडे हातगड गाव लागते. त्याच्या पूर्वेला समोर हातगड किल्ला दिसतो. उत्तम तटबंधी, बुरुज, राजवाड्याचे पडके अवशेष, पाण्याचे टाके, गुहा ही किल्ल्याची वैशिष्टे आहेत. पावसाळ्यानंतर भटकंतीस हे उत्तम ठिकाण म्हणता येईल.
रामशेज किल्ला – नाशिकच्या पेठ रस्त्यावर 13 किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. इथं जवळच आशेवाडी गाव आहे. मात्र राहण्यासाठी जवळपास हॉटेल नसल्यामुळे इथं एक दिवसांचीच ट्रीप प्लान करू शकता.

पंचवटी – शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदिरा जवळ वटवृक्षांचा समुह आहे. हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्यामुळे या परिसाराला ‘पंचवटी’ असे म्हटले जाते. तसचं ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ पंचवटी म्हणुन केला गेला आहे.
नाशिक शहरात काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक असे अनेक मंदिरं पंचवटीच्या सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. म्हणूनच की काय नाशिक शहराला ‘पश्चिम भारताची काशी’ ओळख दिली गेली आहे.
नवसाचा गणपती – नाशिक शहराला लागूनच नवश्या गणपतीचे मंदिर आहे. इथं हजारो भाविक नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर मंदिरात घंटी बांधून आपली इच्छा पूर्ण करतात. येथील पुजारी दरवर्षी मौसमी फळांचा प्रसाद बाप्पाना चढवतात आणि प्रसाद म्हणून तो भाविकांना देतात. इथून पुढं गेल्यावर सोमेश्वर आणि श्री बालाजी मंदिर आहे.
फक्त धार्मिक यात्राच नाही तर लहान मुलांनाही नाशिकमध्ये फिरण्याकरता आणि माहितीपूर्ण गोष्टींकरता उत्तम जागा आहेत. यात देवळाली आर्टिलरी म्युझियम, सिन्नरचं गारगोटी म्युझियम यांना अवश्य भेट द्या. देवळालीहून पुढं गेल्यावर भगूरला वीर सावरकराच्या जन्मस्थळालाही भेट देता येईल.
त्यामुळे आपण निवांत 1-2 दिवसात नाशिकची ट्रिप प्लान करू शकाल..