करीम लाला : मुंबईच्या गुन्हेगारी जगतामधील आदिपुरुष

अब्दुल करीम शेर खान उर्फ करिम लाला...
[gspeech type=button]

साल 1911, अफगाणिस्तानातल्या कुन्नुर प्रांतातील एका सर्वसाधारण पश्तुन म्हणजेच पठाण कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. अत्यंत साधं सरळमार्गी पश्तुनवाली म्हणजेच पश्तुनच्या नियमांचं आणि संस्कारांचं पालन करणारं कुटुंबं. त्या मुलाचं नाव ठेवलं अब्दुल. त्यावेळी हा मुलगा भारतात जाईल किंवा तिथल्या एका शहरावर राज्य करेल असं कुणालाही वाटलं नसेल. अफगाणिस्तानातल्या पश्तुन चालिरीती आणि संस्कारांमध्ये अब्दुलचं बालपण गेलं. पश्तुन समाजात कुटूंब, साहस आणि समाजाप्रती आपली कर्तव्य ही मूल्यं लहानपणापासूनच शिकवली आणि रुजवली जातात. अब्दुलनंही ही मूल्यं आयुष्यभर जपली. तर हा मुलगा होता, मुंबईच्या गुन्हे जगताला त्याच्या तालावर नाचवणारा आणि मुंबईवर राज्य करणारा करीम लाला. होय, अफगाणिस्तानच्या एका साध्या मध्यमर्गीय कुटुंबात जन्मलेला अब्दुल करीम शेर खान.

पठाणांची मुंबईकडे धाव

अफगाणिस्तानात परिस्थिती बिकट होत चालली होती. अनेक अफगाण नागरीक देश सोडून स्थलांतर करत होते. त्यातल्या अनेकांनी भारताची वाट पकडली. 1930 च्या दशकाच्या सुरुवातीला शेर खान आणि त्यांच्या कुटुंबानंही भारताची वाट धरली आणि ते थेट मुंबईत येऊन पोहोचले.

अब्दुल करीम शेर खान त्याच्या ऐन तारुण्यात म्हणजेच वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत दाखल झाला. आयुष्याला दिशा देण्याचं वय होतं ते. उदरनिर्वाह करण्यासाठी हे कुटुंब मुंबईत आलं होतं. त्या वेळी मुंबईच्या गोदीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या. त्याचाच फायदा घेत अब्दुल करीम त्याच्या दोन लहान भावांसोबत गोदीत काम करायला लागला.

त्यावेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यामुळं गोदी कामगारांच्या आयुष्याला तिथं काहीही किंमत नव्हती. त्यांची प्रचंड पिळवणूक करून अगदीच तुटपुंज्या पैशांत काम करुन घेतलं जायचं. अब्दुल करीमलाही हीच वागणूक मिळाली. पण त्याच्यातलं पठाणी रक्त मात्र हा अन्याय सहन करायला तयार नव्हतं.

पठाण गँगची स्थापना

ब्रिटिशांच्या काळातही व्यापाराच्या दृष्टीनं मुंबई हे महत्वाचं बंदर होतं. बंदरातून होणाऱ्या व्यापारामुळं मुंबईत भरभराट दिसायला लागली होती. मुंबईतल्या गुन्हेगारीची मूळं या भरभराटीतच रुजत होती. त्यावेळी समुद्राचा मार्ग हा तस्करीसाठी वापरला जायचा. पण त्यात धोकेही तेवढेच होते. तस्करी करुन आलेला माल जसाच्या तसा हवा त्या माणसापर्यंत पोहोचेल, याची काही शाश्वती नसायची. त्यामुळं अनेक तस्कर आपल्या मालाचं संरक्षण करण्यासाठी गुंडांची मदत घ्यायचे. उंचपुऱ्या, धिप्पाड आणि शरीरानं मजबुत असलेल्या पठाणांना हाताशी धरुन मुंबईतले छोटेमोठे तस्कर त्यांची कामं करुन घ्यायचे. अफगाणिस्तानातून आलेले अनेक पठाण ही कामं करत.

अब्दुल करीम या पठाणांच्या संपर्कात आला. हळूहळू त्यानंही ही कामं करायला सुरुवात केली. सुरुवातीला तो त्याच्या आणखी काही पठाण सहकाऱ्यांसोबत या तस्करीच्या मालाला सुरक्षा देण्याचं काम करु लागला. त्यात चांगले पैसे मिळायचे. गोदी कामगारांसारखा छळही सहन करायला लागायचा नाही. त्यामुळं तो या कामात खूष होता. तस्करीच्या मालाला संरक्षण देण्यापेक्षा आपणच तस्करी करायची. यामुळे आपल्याला कुणाच्या हाताखाली काम करायची गरज राहणार नाही, असा विचार त्यानं केला. अब्दुलनं तस्करांशी संपर्क करायला सुरुवात केली. हे पठाण गुन्हेगारीत कार्यरत असले तरीही ते वेगवेगळे काम करायचे. अब्दुल करीमनं या सगळयांना एकत्र आणून आणखी काही नविन पठाण सहकाऱ्यांच्या मदतीनं या पठाण गँगचं नेतृत्व करायला सुरुवात केली. आणि काही दिवसांतच अब्दुल करीम शेर खानचा करीम लाला झाला. मुंबईच्या गुन्हेगारी जगतात सगळेच त्याला करीम लाला या नावानं ओळखू लागले.

तस्करीतला नवा बादशहा
त्यावेळी मुंबईच्या गुन्हेगारी जगतात छोट्या मोठ्या टोळ्या कार्यरत होत्या. पण करीम लालाच्या नेतृत्वाखाली पठाण गँगसोबतच मुंबईच्या गुन्हेगारी जगतातही सुसूत्रता आणि थोडी शिस्त आली, जी याआधी नव्हती. पठाण गँगचं सुरुवातीचं कार्यक्षेत्र हे फक्त दक्षिण मुंबईतली गोदी, आणि घाऊक बाजारपेठांपर्यंत मर्यादीत होतं. पठाण गँग सुरुवातीला व्यापारी आणि व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करायचे आणि त्यांना इतर गुन्हेगारांपासून संरक्षण द्यायचे. लवकरच खंडणी हा पठाण गँगचा मुख्य व्यवसाय आणि उत्पन्नाचा स्रोत बनला.

पुढच्या 10 वर्षांत करीम लालानं मुंबईवर राज्य करायला सुरुवात केली. मुंबईच्या सागरी किनाऱ्याचा फायदा तस्करीसाठी होऊ शकतो हे लालाच्या कधीच लक्षात आलं होतं. त्यानं त्यानुसार त्याच्या व्यवसायाला नवीन दिशा द्यायला सुरुवात केली. त्याला हे माहीत होतं, की भारतात आयात-निर्यातीचं धोरण हे अतिशय कडक आहे. म्हणूनच या तस्करीत प्रचंड नफा आहे. पठाण गँगनं लवकरच मुंबईच्या तस्करीच्या मार्गांवर नियंत्रण मिळवलं आणि स्थानिक तस्करांसोबतच आंतराष्ट्रीय तस्करांशाही चांगले संबंध प्रस्थापित केले.  करीम लालाच्या नेतृत्वाखाली 1950 च्या दशकापर्यंत मुंबई हे तस्करीचं प्रमुख केंद्र बनलं.

मटका किंग

त्याचवेळी, पठाण गँगने जुगार क्षेत्रातही आपले पाय पसरायला सुरुवात केली, मुंबईत अनधिकृत जुगाराचे अड्डे, ज्यांना ‘मटका’ म्हणून ओळखलं जायचं, ते हळूहळू फोफावत होते आणि लाला यांच्या गँगने त्याच्यावरही आपलं नियंत्रण मिळवलं.

मुंबईची वाटणी

1960 चं दशक येईपर्यंत मुंबईत अनेक छोट्या छोट्या टोळ्या मोठ्या होऊ लागल्या होत्या. त्यातली दोन नावं ही प्रामुख्यानं घ्यावी लागतील, ती म्हणजे हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलीयार. 1960 ला या दोघांनीही मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रात आपली जागा निर्माण केली होती, करीम लालानं या दोघांशीही जुळवून घेतलं होतं. तिघांनीही त्यांच्या व्यवसायासाठी मुंबई तीन भागांत वाटून घेतली होती. कुणीही एकमेकांच्या भागात येऊन व्ययसाय करत नसे. हाजी मस्तान आणि वरदराजन अपलं अस्तित्व निर्माण करेपर्यंत करीम लालानं आपलं साम्राज्य निर्माण केलेलं होतं. त्यामुळं गुन्हेगारी जगतात करीम लालाला भितीवजा आदर मिळत होता. त्यानं घेतलेले निर्णय बिनशर्त मान्य केले जात होते.

1970 आणि 1980 च्या काळात करीम लालाचं साम्राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचंलं होतं.

पश्तुनवी संस्कार

दुष्मनांसाठी करीम लाला म्हणजे क्रौरकर्मा होता. पण त्याचवेळी त्याच्या पठाण समाजासाठी मात्र तो मसीहा सारखं काम करायचा. खंडणी, मटका, तस्करी या सगळ्या काळ्या धंद्यांतून मिळवलेला पैसा तो त्याच्या पठाण समाजासाठी खर्च करायचा. पठाण समाजात कुणाला कधीही कशाचीही गरज लागली तर करीम लाला त्यांच्यांसाठी उभा राहत असे. अनेक मुलांच्या शाळेचा खर्च, सांस्कृतिक कार्यक्रम, मशिदींचं बांधकाम अशा प्रत्येक कामात करीम लाला मदत करत असे. त्यामुळं एकंदर मुंबईच्या पठाण समाजात त्याचं नाव आदरानं घेतलं जाई.

करीम लाला महिला आणि लहान मुलांचा आदर करायचा आणि इतरांनाही तसं करायला भाग पाडायचा. त्याचा वचक असलेल्या परिसरातील महिला स्वत:ला सुरक्षित समजायच्या. गुन्हेगारी किंवा दुश्मनी काढण्यासाठी त्यानं कधीही महिला किंवा लहान मुलांचा वापर केला नाही. जर कोणी करीम लालाशी गद्दारी केली, तर त्याची शिक्षा म्हणजे फक्त मृत्यू.

यंत्रणेत भ्रष्टाचाराची बीजं

मुंबईवर राज्य करायचं असेल आणि आपल्या साम्राज्याचं रक्षण करायचं असेल तर राजकारणी आणि पोलिस या दोन्ही यंत्रणा आपल्या बाजूनं हव्यात हे करीम लालाला चांगलं माहीत होतं. म्हणूनच त्याचे पोलिस आणि राजकारणी दोघांशीही अतिशय चांगले संबंध होते. म्हणूनच त्याला जेव्हाही अटक होई तो त्यातून सहीसलामात बाहेर पडत असे. करीम लालानं राजकारण आणि पोलिस या दोन्ही यंत्रणांमध्ये भ्रष्टाचाराची बीजं रोवली आणि वाढवलीही. त्याकाळातील आर आर जोशी नावाचे पोलिस अधिकारी मात्र करीम लालाच्या हात धुवून मागे लागले होते. पण भ्रष्ट झालेली पोलिस यंत्रणा, राजकारणी आणि मुंबईतल्या बड्या हस्ती यांच्या वरदहस्तानं करीम लाला मात्र नेहमीच जेलच्या बाहेर राहिला.

अस्ताला सुरुवात

1980 च्या दशकापर्यंत मुंबईतल्या अनेक तरुणांना मुंबईचं गुन्हेगारी जग खुणावत होतं. नविन तरुण मुलं गुन्हेगारीत प्रवेश करत होती. आणि करीम लालाचंही वय वाढत होतं. त्यामुळं 80 चं दशक हे करिम लालाच्या साम्राज्याच्या अस्ताचं दशक मानलं जातं. याच काळात लालाच्या हाताखालीच काम केलेला दाऊद इब्राहिमसारखा अत्यंत क्रूर आणि निर्दयी गुन्हेगाराचा मुंबईत उदय होत होता. एक दिवस करीम लालाच्या समोर त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून तो उभा राहीला. त्यानं आत्तापर्यंत मुंबईच्या गुन्हेगारी जगतात असलेले नियम कधीही पाळले नाहीत. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तो कितीही हिंसा करायला मागेपुढे पहात नव्हता. त्याच्या येण्यानं मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीचं स्वरुप बदललं. आणि मुंबईच्या गुन्हेगारी जगात सत्तासंघर्ष सुरु झाला. काही दिवसांतच दाऊद मुंबईचा नविन राजा झाला.

ही सगळी प्रक्रिया करीम लाला थांबवू शकला नाही. कारण तोपर्यंत त्यानं पठाण गँगची सगळी जबाबदारी त्याचा पुतण्या समाद खानकडे सोपवली होती. पण समाद आणि दाऊद दोघांनाही मुंबईवर राज्य करायचं होतं. त्यामुळं त्यांच्यात वाद होत राहीले. दाऊदची डी कंपनी मुंबईचा ताबा घेत गेली आणि पठाण गँग हळूहळू कमकुवत होत गेली.

करीम लालाच्या साम्राज्याचा अस्त झाला. पण त्याची एक समाजसेवक म्हणून तयार झालेली ओळख, पठाण समुदायातच कायम राहिली. आजही अनेक लोक करीम लालाचं नाव आदरानं घेतात.

जवळपास आठ दशकं मुंबईचं गुन्हेगारी क्षेत्र करीम लालानं जवळून पाहिलं. स्वत:च्या साम्राज्याची भरभराट आणि अस्त त्याला जिवंतपणीच पहावा लागला. 2002 साली वयाच्या 90 व्या वर्षी करीम लालानं मुंबईत अखेरचा श्वास घेतला आणि मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या एका दीर्घ अंकाचा शेवट झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ