किनाऱ्यावरचे मोती  : सागरी किल्ले भाग 2

या जलदुर्गांमध्ये सागरी संग्रहालय, मराठ्यांच्या आरमाराचे संग्रहालय, कोकणच्या लोकजीवनाचे संग्रहालय, कोळी समाजाच्या संस्कृतीचे संग्रहालय असे कितीतरी उपक्रम करता येतील. ज्यामुळे या ठिकाणांचे पर्यटन मूल्य आणखी  वाढेल.
[gspeech type=button]

महाराष्ट्रातील जलदुर्गांचा खजिना साठवलेला आहे तो तळकोकणात. म्हणूनच की काय

“ सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा, हा अंजनवेल ।

महाराष्ट्राच्या मर्दुमकीची ग्वाही सांगेल ॥”

अशी त्यांची ख्याती ‘महाराष्ट्र गीता’मध्ये कवी गोविंदाग्रजांनी वर्णन केली आहे. दापोली तालुक्यातील हर्णे-मुरूडजवळ समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग हा किल्ला आज जरी भग्न असला तरी, महाराष्ट्राच्या सागरी इतिहासात त्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. भर समुद्रातील बेटावर असलेल्या याच किल्ल्यातून कान्होजी आंग्रे यांची सागरी कारकिर्द सुरू झाली.

हा किल्ला 16 व्या शतकात आदिलशहाने बांधला असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जलदुर्ग स्वराज्यात आणला. त्याची पुनर्बांधणी केली आणि एक भक्कम ‘जंजिरा’ उभा केला. पंधरा बुरुज असलेल्या या किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे. याला दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यातील उत्तराभिमुख मुख्य दरवाज्याचे दर्शन अगदी जवळ जाईपर्यंत होत नाही. मात्र आतमध्ये सगळे भग्नावशेष आहेत.

सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर कनकगड-फत्तेगड-गोवा किल्ला असे तीन किल्ले आहेत. यातील गोवा किल्ला आजही बऱ्या अवस्थेत आहे.काही वर्षांपूर्वी या किल्ल्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हॉटेल सुरू केले होते. नंतर ते बंद झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातला आणखी एक जलदुर्ग म्हणजे अंजनवेलचा गोपाळगड. वसिष्टी नदीमुळे तयार झालेल्या दाभोळच्या खाडीचा राखणदार असलेला हा किल्ला गेली साडे तीनशे-चारशे वर्षे पाऊस -वारा आणि सागराच्या लाटांना तोंड देत टिकून आहे. 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याला ‘गोपाळगड’ हे नाव दिलं. त्याचवेळी चिपळूणच्या गोवळकोटाचं नाव झालं ‘गोविंदगड’.

मात्र काही अनाकलनीय कारणांमुळे अंजनवेलचा गोपाळगड आता खाजगी मालकीचा मानला जातो. खरंतर त्याची व्यवस्था अन्य किल्ल्यांप्रमाणेच पुरातत्व खात्याकडे असायला हवी.

 

जयगडसाठी नरबळी


मुंबई –गोवा हायवेवर निवळी फाट्यावर एक रस्ता आतमध्ये जातो, या रस्त्याने श्री क्षेत्र गणपतीपुळेला जाता येत. मात्र गणपतीपुळ्याकडे न वळता, सरळ पुढे आलो की लागतो ‘जयगड ’ किल्ला. हा किल्ला शास्त्री नदीच्या खाडीकाठावर उभा आहे. त्या खाडीलाही जयगडची खाडी हेच नाव आहे. या प्राचीन किल्ल्याचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे आला, तेंव्हा हा किल्ला अधिक बळकट करायला सुरवात केली. मात्र हे नवीन बांधकाम उभं राहिना,थोडं बांधून झालं की भाग कोसळायचा. तेव्हा त्या काळातील समजुतीनुसार नरबळी देण्याचा तोडगा काढण्यात आला. मग जयबा नावाच्या एका गाववाल्याने स्वतःचा बळी देण्याची तयारी दर्शवली आणि म्हणून या किल्ल्याला जयगड नाव देण्यात आले, अशी लोककथा प्रचलीत आहे.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर जे किल्लेदाराचं स्मारक पाहायला मिळतं, ते याच जयबाचं आहे. पडकोट आणि बालेकिल्ला अशा दोन भागात असलेल्या या किल्ल्याला 14 बुरुज आहेत. किल्ल्यात गणपतीचं मंदिर, श्री कार्तेश्वर महादेव मंदिर आणि मोहमाया देवीचं स्थान आहे. 

जयगड किल्ल्याचे प्रवेशद्वार

29 बुरुजांचा रत्नदुर्ग

रत्नागिरी शहरातही एक किल्ला आहे. सागरकिनाऱ्यावरचा हा किल्ला रत्नदुर्ग किंवा भगवती या नावाने ओळखला जातो. 120 एकरांवर पसरलेल्या या किल्ल्याला 29 बुरुज आहेत. भगवती देवीच्या मंदिरापर्यंत थेट गाडी नेता येते. या किल्ल्यात दीपगृह ही आहे, मात्र तिथे परवानगी शिवाय प्रवेश मिळत नाही.

रत्नागिरीच्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोन बाजूंना दोन सागर किनारे आहेत. एका बाजूची वाळू काळसर आहे तर दुसरीकडची वाळू पांढरी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील थोडा दुर्लक्षित पण बघायला हवा असा जलदुर्ग म्हणजे पूर्णगड.

रत्नागिरीहून पावसला जाताना वाटेत भाट्ये गाव लागते. इथे छत्रपतींच्या आरमाराचा सरखेल मायनाक भंडारी याचे स्मारक आहे. पावस गावापासून फक्त 10 कि.मी.अंतरावर असलेला छोटासा पूर्णगड किल्ला मुचकुंदी नदीच्या खाडीवर आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सन 1724 मध्ये हा किल्ला बांधला असे मानले जाते. किल्ल्यात शिरताना मारुतीचे मंदिर आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी आहे.

शासनाच्या योजनेमध्ये पूर्णगडाचे नूतनीकरण झाले आहे. त्यामुळे इतर किल्ल्यांसारखे इथे भग्नावशेष नाहीत. पूर्णगडच्या तटबंदीवरुन फिरताना भोवतालच्या परिसराचे जे विहंगम दृश्य दिसते, त्यामुळे डोळ्यांचे अगदी पारणे फिटते. 

 

मराठी आरमाराचे आश्रयस्थान विजयदुर्ग

मुंबई – गोवा महामार्गावर तळेऱ्याला मुख्य रस्ता सोडून आत वळलो की विजयदुर्ग लागतो. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिध्द जलदुर्ग म्हणजे सिंधूदुर्ग. मात्र, सिंधूदुर्गाला जे प्रसिध्दीचे वलय आहे, त्यापेक्षा कमी वलय असलेला पण त्यापेक्षा वयाने मोठा आणि मराठी आरमाराचे आश्रयस्थान ठरलेला किल्ला म्हणजे ‘विजयदुर्ग.  मुळात शिलाहारांनी बांधलेला हा किल्ला नंतर आदिलशाही अमलाखाली होता. तो सन 1654 मध्ये शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. तिहेरी तटबंदी असलेला हा किल्ला वाघोली खाडीच्या तोंडाशी आहे. शेजारी असलेल्या ‘गिर्ये’ गावावरुन याला ‘घेरिया’ असेही नाव होते. सरखेल कान्होजी आंग्र्यांनी याच विजयदुर्गाच्या आश्रयाने किनारपट्टीवर मराठी झेंडा लहरत ठेवला.

विजयदुर्गच्या जवळ आग्र्यांनी जहाजांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी गोदी बांधली होती. तिनही बाजूंनी पाणी आणि एका बाजूला जमिन असलेल्या या किल्ल्याभोवती पूर्वी खंदक होता, जो पुढे भराव घालून बुजवला गेला. किल्ल्याच्या तटबंदीवर वीस भक्कम बुरुज आहेत. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ‘साहेबाचे ओटे’ म्हणून एक जागा आहे. याच जागेवर बसून सन 1898 मध्ये सर जोसेफ लॉकियर या शास्त्रज्ञाने  ग्रहणातल्या सूर्याचे निरिक्षण केले होते.

त्यावेळी त्याने जे स्पेक्टोग्राफ्स मिळवले, त्यावरुनच सूर्यावरील ‘हेलियम’ चा शोध लागला. विजयदुर्ग जवळच्या समुद्रात ओहोटीलाही पाण्याखाली राहिल अशी दगडी भिंत आहे. याच भिंतीमुळे ब्रिटिशांनी विजयदुर्गवर हल्ला करायला पाठवलेली जहाजे फुटून बुडली होती.

स्वराज्याची समुद्रातली राजधानी  

महाराष्ट्रातल्या जल दुर्गांपैकी  मालवणच्या सिंधूदुर्गाचं नाव सर्वात प्रसिध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः जे मोजके जलदुर्ग उभारले त्यातला सिंधूदुर्ग अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे.

समुद्रामार्गे येणाऱ्या आक्रमकांचा धोका ओळखून आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची समुद्रातली राजधानी म्हणजे मालवणचा सिंधुदुर्ग. 25 नोव्हेंबर 1664 रोजी खुद्द महाराजांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गाचे भूमिपूजन झाले आणि 29 मार्च 1667 रोजी ही शिवलंका साकार झाली.

या जलदुर्गाच्या संरक्षणासाठी अवतीभवती पद्मगड- राजकोट-सर्जेकोट-निवती अशी उपदुर्गांची ( लहान लहान किल्ल्यांची ) साखळीच बनवलेली पाहायला मिळते. या पैकी सर्जेकोट आजही चांगल्या स्थितीत आहे. 

सिंधूदुर्ग किल्ला

 

महाराजांच्या हात आणि पायाचा ठसा

मालवण जवळच्या कुरटे बेटावरील सिंधूदुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा पाहायला मिळतो. तटबंदीवर दोन छोट्या घुमट्यांमध्ये ही ‘शिवचिन्हे’ जतन केलेली आहेत. ज्यांनी पुढे स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’उभारला, त्याच हिरोजी इंदुलकरांनी एक कोटी होन खर्चून सिंधूदुर्ग घडवला. सागराच्या लाटांचा मारा झेलणारी सिंधूदुर्गाची तटबंदी नागमोडी आहे आणि त्यावर बेचाळीस बुरुज आहेत.

खाऱ्या पाण्याने वेढलेल्या या किल्ल्यात दूध बाव, दही बाव आणि साखर बाव अशा गोड पाण्याच्या विहीरी आहेत. सिंधूदुर्गावरची एक नाजूक, नजाकतदार जागा म्हणजे ‘राणीची वेळा’. किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटालगत चंद्रकोरीच्या आकाराचा हा छोटा बंदिस्त किनारा आहे. जेंव्हा राणी ताराबाई यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते, तेंव्हा त्या इथे समुद्र स्नानासाठी यायच्या. म्हणून याला ‘राणीची वेळा’ म्हणतात.

सिंधूदुर्ग किल्ल्यातील राणिची वेळा हे ठिकाण

 

किल्ल्यामध्ये मारुतीचे, भवानीमातेचे, महादेवाचे मंदिर तर आहेच; पण महाराष्ट्रातले एकमेव प्राचीन श्री शिवराजेश्वर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी मूळ मंदिर बांधले होते. पुढे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्याला सुरेख सभामंडप बांधला.

मालवणला गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या नकाशावर महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी सुविधा म्हणून आता सिंधूदुर्गसाठी नियमित बोट फेरी सुरू झाली आहे. मात्र या बोटीसाठी जो बेढब धक्का बांधला आहे, त्यामुळे किल्ल्याच्या सौदर्यावर मोठ्ठा डाग पडला आहे. उपयुक्तता आणि सौदर्यदृष्टी याचा संगम साधून बांधलेल्या अनेक वास्तू आपल्या देशात  असताना अशा प्रकारचे बांधकाम करुन संबंधित यंत्रणेने काय साधले माहिती नाही.

ठेव्याचे जतन आवश्यक    

महाराष्ट्रातील सागरी किल्ले हा जसा ऐतिहासीक ठेवा आहे त्याचप्रमाणे पर्यटनाचा खजिनाही आहेत. कोकणातील या किल्ल्यांचा विकास सोडा, निदान डागडूजी करुन आणि आणखी हानी होणार नाही याची काळजी घेतली तरी, त्यामुळे हा ठेवा तर जपला जाईल.  यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील गौरवशाली क्षणांची उजळणीही होईल.

यातील काही किल्ल्यांमध्ये सागरी संग्रहालय, मराठ्यांच्या आरमाराचे संग्रहालय, कोकणच्या लोकजीवनाचे संग्रहालय, कोळी समाजाच्या संस्कृतीचे संग्रहालय असे कितीतरी उपक्रम करता येतील. ज्यामुळे या ठिकाणांचे पर्यटन मूल्य आणखी  वाढेल. हे होईल तेंव्हा होईल. तोपर्यंत आपण कोकणातील सहल ठरवताना तिथे जवळपास असलेल्या किल्ल्याला भेट देऊन निदान पर्यटकांचा राबता तर सुरू ठेवूयात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Malhar Certificate : महाराष्ट्रात 'झटका' मांस’ विक्रेत्यांसाठी 'मल्हार प्रमाणपत्र' ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे
World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा शब्द सध्या खूपदा ऐकायला येतो. पण ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ते
Roja : रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ