जगभरात अनेक भाषा आणि असंख्य बोली. प्रत्येकाला आपली मायबोली श्रेष्ठ वाटत राहते. आपली संस्कृती, आपले जगणे, आपले विचार भाषेभोवती फुलत राहतात. आपले मनोगत, आपले रागलोभ, आपली कला इतरांसमोर अधिकाधिक व्यक्त करण्यास भाषा एक सुरेख माध्यम होत राहते. संत ज्ञानेश्वरांसारखा माणूसदेखील “अमृतातेही पैजा जिंके..” असं आपल्या भाषेबद्दल अभिमानाने सांगत राहतो. मात्र जेव्हा आक्रमकांची भाषा आपल्यावर लादली जाते तेव्हा आपला जीव गुदमरून जातो. आपलं सगळं विश्व त्याखाली दबून जातं. लोकांच्या मनावर पराभूत वृत्तीची पुटं जडू लागतात. आणि हीच गोष्ट अचूक हेरून जे नेते कार्य करतात, पुन्हा आपल्या भाषेला जनसामान्यांत रुजवू पाहतात ते लोकोत्तर नेते ठरतात. छत्रपती शिवाजी महाराज असेच एक लोकोत्तर नेते होते. काय केले त्यांनी हे पाहूया आजच्या लेखात…
सुलतानांनी आक्रमणात स्थानिक भाषाही बदलली
इ. स. 1295 च्या सुमारास अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केले आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रभर रणकंदन सुरू झाले. पुढली जवळपास चारशे वर्षे इथे खिलजी,बहामनी, आदिलशाही, निजामशाही,बेरीदशाही,इमादशाही आणि कुतुबशाही यांची क्रूर आक्रमणे सुरू राहिली. समर्थ रामदासांच्या भाषेत सांगायचे तर “अवघी सृष्टी आंदोळली.. धर्म बुडाला..”. लोकानी आमची सेवा करावी, आम्ही सांगतो तसं राहावे, आमचा धर्म स्वीकारावा यासाठी इथल्या सुलतानानी अनन्वित अत्याचार केले. त्याच्या कहाण्या त्यानीच लिहून ठेवल्या आहेत. ते सारं आपल्या पूर्वजांनी कसं भोगले असेल असे वाटून मन व्याकूळ होऊन जाते. ज्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे, बंड करण्याचे प्रयत्न केले त्यांची घरेदारे उद्ध्वस्त केली गेली. स्त्रियांची अब्रू लुटून त्यांची रवानगी थेट जनानखान्यात केली गेली. माणसे तर मारली गेलीच पण मंदिरावर असलेली देखणी शिल्पेसुद्धा त्या क्रूर लोकाना पाहवली नाहीत. तीही तोडली गेली..विद्रूप केली गेली. गावांची नावे बदलली गेली. माणसांना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले गेले. साध्या पत्रलेखनात सुद्धा फारसी भाषा भरून राहिली.
हेही वाचा – शिवाजी महाराजांचे अखेरचे पत्र!
धगधगती ज्वाला शिवराय
चारीबाजूनी संस्कृती, धर्म, भाषा सगळ्यावर फक्त आणि फक्त अत्याचार होत राहिले. समाजमन कोलमडून गेले. महाराष्ट्राचा जणू कणाच मोडला गेला. सर्व जातीजमातीचे लोक सुलतानांच्या सैन्यात विभागले गेले. प्रसंगी आपापसात लढून मरु लागले. रोजच्या जगण्यावरही एक उदास सावट भरून राहिले. या सगळ्यातून उभी राहिली एक धगधगती ज्वाला.. छत्रपती शिवाजी महाराज..!
किल्ल्यांना मिळाली मूळ नावे
आपल्या लहानपणापासून या सुलतानांच्या सर्व कारवाया पाहणारे शिवबाराजे त्यामुळे मोडून न पडता उलट पेटून उठले. मावळप्रांतातील सर्व जातीमधील मूठभर सवंगडी गोळा करत हिंदवी स्वराज्यासाठी रणशिंग फुंकले गेले. हे राज्य शिवाजीचे नव्हे तर हे तर श्रीचे – ईश्वराचे राज्य या भावनेने कार्य सुरू झाले. रोहिडा, तोरणा असे दुर्ग स्वराज्यात आल्यावर मुरूम्बदेवाच्या डोंगरावर राजगडची उभारणी सुरू झाली. हळूहळू स्वराज्य वाढू लागले. पुरंदर, सिंहगड, रायगड स्वराज्यात आले. कित्येक किल्ल्यांची नावेदेखील बदलली गेली होती. शिवरायांनी मग पुन्हा सर्वत्र संस्कृत – मराठी अशी नावे दिली. जी जुनी नावे होती ती पुन्हा प्रचलित झाली. कित्येक किल्ल्यांना नवी नावे मिळाली. तोरण्याला सार्थ असे नाव मिळाले ते म्हणजे प्रचंडगड..! घेरियाचं नाव झालं विजयदुर्ग..!
मोघली सैन्याची पाठ फिरताच किल्ल्यांना पुन्हा मूळ नाव
भोरप्याच्या डोंगरावर बांधण्यात आलेल्या भक्कम दुर्गाला नाव मिळाले प्रतापगड. चंद्रगड, कमळगड, मंगळगड, मकरंदगड अशा दुर्गाच्या कोंदणात प्रतापगड शोभू लागला. मुरंजनचे नाव बदलून प्रबळगड झाला. समुद्रकिनारी हिंमतगड, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग, गोपाळगड, सागरगड, देवगड, जयगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, यशवंतगड, अशी देखणी नावे असलेली दुर्गशृंखला निर्माण झाली. सागरकिनारे सुरक्षित झाले. घाटमाथे सुरक्षित करताना व्याघ्रगड, लोहगड, कठीणगड, घनगड, श्रीवर्धन आणि मनरंजन, मनोहर गड, मनसंतोषगड, वसंतगड, कल्याणगड, चंदन –वंदन गड, सुधागड, सरसगड, पारगड, कलनिधीगड, गंधर्वगड, सज्जनगड अशा देखण्या नावानी दुर्ग सजले. नुसती ही गडांची नावे पाहूनच मन प्रसन्न होऊन जाते. शिवरायांचा संस्कृत आणि प्राकृत म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास किती उत्तम होता हेच यातून दिसत नाही का? शिवरायांच्या पश्चात महाराष्ट्राने पुनश्च मोगली सैन्याचा धुमाकूळ पाहिला. पुन्हा एकदा प्रचंड अत्याचार पाहिले. मात्र स्वातंत्र्याचा विचार उरात घेऊन महाराष्ट्र झगडत राहिला. इथे प्रत्येक गड जिंकण्यासाठी औरंगजेब खासा येऊन लढत राहिला. त्याने प्रत्येक किल्ला जिंकून त्याची नावे बदलली. अगदी रायगडचा सुद्धा इस्लामगड केला होता. सज्जनगडचा नवरसतारा तर राजगडचा झाला नबीशाहगड. तोरणा उर्फ प्रचंडगडचा झाला फुतुअल घैब..! मात्र मोगली सैन्याची पाठ फिरताच मराठे पुन्हा गड काबीज करत आणि पुन्हा आपले नाव त्याला देत असत.
रोजच्या व्यवहारातील फार्सी शब्दांना मराठी-संस्कृत शब्द
शिवछत्रपतींचे भाषाप्रेम हे गडांची नावे बदलून टाकण्याइतकेच नव्हते तर त्यांनी समाजात रुजलेले फारसी – उर्दू शब्द बदलून टाकण्याचा जणू विडाच उचलला. त्यासाठी रघुनाथ पंडित, धुंडीराज व्यास, रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारख्या काही विद्वान पंडितांची नेमणूक केली होती. त्यातूनच निर्माण झाला राज्यव्यवहारकोश. आणि आज्ञापत्रे. त्याद्वारे रोजच्या वापरातील कित्येक फारसी- उर्दू शब्द बदलून टाकण्यात आले. विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द वापरायला सुरुवात केली. “मर्यादेयं विराजिते..” “लेखन सीमा..” “.. यांचे चरणी दंडवत..” असे सगळे महाराजांच्या काळातील पत्रात दिसून येते. विविध सैन्याधिकारी, कारभारी यांना पाठवलेल्या पत्रातील कळकळ आपल्या भाषेतून अधिक प्रभावीपणे मनाला भिडत राहते. उत्तम अक्षर असलेल्या बाळाजी आवजी चिटणीस यांच्यासारख्याकडून महाराजांनी अनेक सुंदर पत्रे विविध ठिकाणी पाठवली. ती वाचताना तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतो..! इतकेच नव्हे तर शिवरायांनी विविध पदांची नावेदेखील बदलली. प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री.. अशी पदनामे निर्माण करताना सरलष्करचे सरसेनापती झाले..! राज्याभिषेक जेव्हा झाला तेंव्हा स्वतःला बादशहा असं न म्हणता महाराज छत्रपती झाले..!
लोकांच्या मनात हे स्वराज्य खोलवर रुजावे यासाठी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुत्सद्दी सहकाऱ्यांनी किती खोलवर विचार आणि कृती केली होती हे पाहून मन आदराने भरून येते..! दररोज शिवरायांचा जयघोष करत असताना त्यांचं हे भाषाप्रेमदेखील आपल्यात पुनःपुन्हा उसळत राहो हीच सर्वांकडून अपेक्षा..! आपली भाषा आपणच जिवंत ठेवायची असते, कोणत्याही आक्रमकांना ती नष्ट करू द्यायची नाही इतका धडा जरी आपण त्यांच्याकडून घेतला तरी पुरेसे आहे..!