भारतीय इतिहासातील थोर विचारवंत, समाजसुधारक, कायदेतज्ज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विविध अंगांनी अभ्यासले गेले आहे. मात्र त्यांचे पत्रकार म्हणून योगदान आणि माध्यमांच्या मदतीने त्यांनी लढलेली सामाजिक लढाई ही बाब अजूनही तुलनेत कमी चर्चिली जाते. डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली. विदेशात मानवतावादी चळवळीत काय सुरु आहे यावर डॉ. आंबेडकरांचे लक्ष होते. विदेशातील चळवळी कशाप्रकारे पाक्षिक, मासिक चालवतात याचा अभ्यास त्यांनी केला होता. डॉ. आंबेडकर म्हणत “कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तिची अवस्था पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे होते.” यामुळेच त्यांनी स्वतः पत्रकारितेत येण्याचा निर्णय घेतला. आपली स्वतःची प्रसारमाध्यमे असायला हवीत असा आग्रह त्यांनी धरला.
त्यांचा माध्यमांचा वापर हा जातव्यवस्थेच्या अमानुषतेविरुद्ध आणि बहिष्कृत समाजाच्या हक्कांसाठी एक सशक्त अस्त्र ठरला, हे वेगळे काही सांगण्याची गरज नाही. त्यांनी पत्रकारितेचा उपयोग समाजजागृतीसाठी, जनचळवळी उभ्या करण्यासाठी आणि प्रस्थापित अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. ‘माध्यमे ही केवळ बातमी देण्यासाठी नसतात, ती विवेक जागवण्यासाठी, समतेचा विचार मांडण्यासाठी आणि संघटित चळवळी घडवण्यासाठी असावी’ हा त्यांचा ठाम विश्वास होता.
डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक नियतकालिकांची सुरुवात केली. 1920 मध्ये त्यांनी ‘मूकनायक’ हे पहिले पाक्षिक सुरू केले. नावाप्रमाणेच, ज्या वंचित समुदायाला बोलण्याची परवानगी नव्हती, स्वतःचा आवाज नव्हता , अशा समुदायाचे मुखपत्र म्हणून ‘मूकनायक’ पाक्षिकाची त्यांनी सुरुवात केली. साक्षात छत्रपती शाहू महाराजांनी ‘मूकनायक’साठी डॉ. आंबेडकरांना 2500 रुपयांची मदत केली होती. आजच्या काळात आपण अल्टरनेटीव मिडिया (Alternative Media) बद्दल बोलतो. मात्र 1920 साली छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने डॉ. आंबेडकरांनी हा प्रयोग केला होता हे आपल्याला दिसते.
वाचक कोण?
मूकनायक पाक्षिकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी संपादक म्हणून डॉ. आंबेडकरांनी संत तुकारामांच्या काही ओव्या छापल्या होत्या.
काय करून आता धरुनिया भीड |
निःशक हे तोड वाजविले ||१||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |
सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||
आम्ही कितीही तोंड वाजवले, कितीही आर्जवे केले तरी आमचे म्हणणे होणीही ऐकत नाही, अशी आगतिकता त्यांच्या सर्व अग्रलेखातून आपल्याला जाणवते. अस्पृश्यतेविरोधात, शिक्षणासाठीच्या हक्कासाठी, आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी त्यांनी या मासिकातून जळजळीत शब्दांत लेख लिहिले. मूकनायक हे फक्त नियतकालिक नव्हते, ते दलित समाजाच्या आत्मभानाचे प्रतीक होते. ज्यांच्यासाठी डॉ. आंबेडकर लढत होते, तो समाज मुळातच अशिक्षित होता, ज्यांना अक्षरओळख नव्हती, मग हे पाक्षिक वाचणार कोण होते? हे पाक्षिक खरे तर तत्कालीन सुशिक्षित आणि उच्चवर्णीय लोकांसाठी होते. ज्यांना सामाजिक परिस्थिती माहिती असूनही बदलाची सुरुवात करायची इच्छा नव्हती. रंजलेल्या, गांजलेल्या समुदायाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न डॉ. आंबेडकरांनी केलेला आपल्याला दिसतो.
‘बहिष्कृत भारत’चा प्रयोग
उच्च शिक्षणासाठी डॉ. आंबेडकरांना लंडनला जावे लागले, त्यामुळे ‘मूकनायक’चे काम त्यांना पुढे चालवता आले नाही. त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पाक्षिक सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला. यानंतर 1927 मध्ये डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृत भारत’ नावाने एक नवे पाक्षिक सुरू केले. यामध्ये त्यांनी अधिक थेटपणे, परखड शैलीत जातिव्यवस्थेचा आणि ब्रिटिश सत्तेच्या धोरणांचा समाचार घेतला. सामाजिक प्रश्नांवर परखड मत मांडण्याचे धाडस त्या काळी फक्त आंबेडकरांकडेच होते. तत्कालीन कॉंग्रेस पक्षाच्या, गांधींच्या नीतीवर त्यांनी परखडपणे टीका केली. टीका करताना त्यांनी संवादाची दारे मात्र कायमच खुली ठेवली. आपल्या चळवळीची भूमिका धोरणकर्त्या वर्गापर्यंत पोहोचली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.
नावामुळे आली अडचण…
डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता ही चळवळीच्या स्वरूपात होती. ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिकाचे नाव असल्यामुळे काही सुशिक्षित मंडळींना ते ‘आपलेसे’ वाटले नाही. भारतात बहिष्कृत असलेल्या जातींचे प्रश्न इतरांसाठी कधीच महत्वाचे नव्हते. त्यामुळे पाक्षिकाचा खप घटला. आपले विचार लोकांपर्यंत जाणे हा या पाक्षिकामागचा उद्देश होता, तोच उद्देश पूर्ण होत नसल्याने त्यांनी हे पाक्षिक बंद केले आणि नव्या पाक्षिकाची घोषणा केली.
‘समता’ पाक्षिकाची भूमिका
चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, मनुस्मृती दहन, गोलमेज परिषदांना हजेरी, गांधीसोबत झालेला वैचारिक संघर्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर 1927 ते 1930 पर्यंत ‘समता’ पाक्षिकात डॉ. आंबेडकर लेखन करत होते. समता सैनिक दलाचे हे मुखपत्र होते. आपल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आणि जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी यात नियमित लेखन केले. हे पाक्षिक केवळ समता सैनिक दलाचे मुखपत्र राहू नये, अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहचावे यासाठी त्यांनी या पाक्षिकाचे नाव ‘जनता’ असे ठेवले.
‘जनता’ ते ‘प्रबुद्ध भारत’
1930 साली डॉ. आंबेडकरांनी जनता पाक्षिकमध्य्ये लिहायला सुरुवात केली. पाक्षिकांचे नाव बदलत गेले तरी वाचक मात्र तोच राहिला. गंगाधर सहस्रबुद्धे नामक आपल्या ब्राम्हण सहकाऱ्याला संपादकपदाची जबाबदारी देत डॉ. आंबेडकरांनी आपली चळवळ कुणा एका जातीपातीच्या विरोधात नसून ती जनतेच्या न्यायहक्कासाठी असल्याचा संदेश दिला. या नियतकालिकांतून त्यांनी फक्त घटनात्मक हक्कांची मांडणी केली नाही, तर दलित समाजाला ‘प्रबुद्ध नागरिक’ होण्याचे आवाहन केले. 1955 पर्यंत हे पाक्षिक चालले. प्रकाशनात अनियमितता होती, तरीही वाचकवर्ग आतुरतेने पाक्षिकाची वाट बघायचे.
पुढे 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी ‘जनता’ पाक्षिकाचे नाव ‘प्रबुद्ध भारत’ असे बदलले. मात्र डॉ. आंबेडकरांना नियतीने फारसा वेळ दिला नाही. हे त्यांचे शेवटचे पाक्षिक ठरले. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर नवभारताच्या निर्मितीसाठी त्यांना हे पाक्षिक उभे करायचे होते.
मूल्य-आधारित पत्रकारिता
आंबेडकरांच्या पत्रकारितेचा गाभा म्हणजे त्यांच्या मूल्यांचा ठाम पाठपुरावा – सत्य, विवेक, आणि सामाजिक समता. त्यांनी पत्रकारितेला व्यवसाय म्हणून नकार दिला. सामन्यांच्या भाषेत आपण लिहिले पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. डॉ. आंबेडकरांची सगळी पाक्षिके ही मराठीत होती तर सगळे ग्रंथ हे इंग्रजीमध्ये होते हे आपण समजून घेतले पाहिजे. ग्रंथ हे वैचारिक वर्गासाठी तर पाक्षिक हे सामान्य जनतेसाठी अशी त्यांनी आपल्या लेखनाची विभागणी केलेली आपल्याला आढळते. पत्रकारिता त्यांच्यासाठी एक मिशन होते, समाजाला जागृत करण्याचे कार्य होते, लोकशाहीचे सार्वत्रिकीकरण हे माध्यमांच्या मदतीने होऊ शकते असा विश्वास त्यांना होता. ते म्हणत, पत्रकारांनी नुसत्या नागरिकांच्या भावना भडकवू नयेत, तर लोकांच्या मनात विवेक चेतवावा. त्यांनी ‘हीरो वॉरशिप’ म्हणजे व्यक्तिपूजेला विरोध केला. त्यांना भावनाप्रधानतेपेक्षा विचारप्रधानतेचा प्रचार करायचा होता.म्हणूनच गांधीजींच्या इंग्रजी भाषेतील ‘हरिजन’ मासिकाला त्यांनी ‘जनता’ या मराठी पाक्षिकाच्या माध्यमातून उत्तर दिले.
परंतु ही पत्रकारितेची चळवळ सोपी नव्हती. आर्थिक अडचणींमुळे त्यांना काही नियतकालिके बंद करावी लागली. समाजातील सत्ताधारी वर्गांचा विरोध आणि ब्रिटीश सत्तेचा सेंसरशिप यामुळेही त्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागले. पण तरीही त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लेखणी सदैव तितकीच धारदार राहिली.
आज जेव्हा माध्यमं कॉर्पोरेट हितसंबंधांनी चालवली जात आहेत, जेव्हा सनसनाटीपणाचा अतिरेक झाला आहे, तेव्हा आंबेडकरांचे माध्यमविचार पुन्हा आठवण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलेली निष्पक्षता, विवेकशीलता, आणि सामाजिक भान ही पत्रकारितेची खरी मूल्ये आज अधिकच महत्त्वाची वाटतात. त्यांनी दाखवलेला मार्ग हा फक्त दलित समाजापुरता मर्यादित नव्हता, तर तो सर्वसमावेशक होता – तो आपल्या लोकशाहीच्या बळकटीसाठी आजही मार्गदर्शक आहे. खरे तर आजची माध्यमे डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करतील अशी परिस्थिती नाही. आजची राजकीय आणि भांडवली व्यवस्था सकारात्मक नाही. मात्र मूल्यआधारित पत्रकारितेचा जेव्हा जेव्हा विचार केला जातो तेव्हा तेव्हा आपल्याला डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीचा आधार घ्यावाच लागतो.
डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने पत्रकारिता म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे साधन होते – असे साधन, जो शोषितांचा आवाज बनेल, अन्यायाला आव्हान देईल, आणि नवसमाजाची उभारणी करेल. त्यांच्या या विचारधारेचे स्मरण म्हणजे केवळ त्यांच्या योगदानाची आठवण नव्हे, तर आजच्या पत्रकारितेला जबाबदारीने पुन्हा नव्याने समजून घेण्याचे आवाहन आहे. माध्यम हे परिवर्तनाचे अस्त्र असू शकते, हे आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवले – आता त्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी कर्त्या पत्रकारांची आहे.