सिनेमातील गाणी – मनोरंजन की व्यत्यय ? 

Bollywood songs : एक काळ होता जेव्हा बॉलीवूड सिनेमा हा हिंदी गाण्यांशिवाय अशक्य आहे अशी मान्यता होती. गाणी हाच तेव्हा हॉलीवूड आणि आपल्या बॉलीवूड सिनेमांधील मूलभूत फरक होता.
[gspeech type=button]

संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. घरातील लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्ती यांच्यातील मन रमणारा काही कॉमन धागा असेल तर तो संगीत आणि गाणी आहे. ‘नर्सरी ऱ्हाईम्स’ ते ‘सारेगामा कारवा’ पर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गाणी ऐकणं हे आपल्याला कधी ना कधी तर आवडलेलं असतं. काहींना गाणी ही घरातील कामं सुरू असतांना बॅकग्राउंडला वाजत रहावी, असं वाटत असतं. तर काहींना कार चालवतांना प्रवास कंटाळवाणा वाटू नये म्हणून गाणी ही गरजेची वाटत असतात. स्वभाव, मनःस्थिती यानुसार गाणी बदलत रहातात, इतकाच काय तो फरक असतो.

करमणुकीसाठी तमाशा आणि रेडिओवरील गाणी

एक काळ होता जेव्हा बॉलीवूड सिनेमा हा हिंदी गाण्यांशिवाय अशक्य आहे अशी मान्यता होती. गाणी हाच तेव्हा हॉलीवूड आणि आपल्या बॉलीवूड सिनेमांधील मूलभूत फरक होता.त्या काळातील ग्रामीण भागांमध्ये रहाणारे कामगार हे संध्याकाळी थकून भागून आले की, मनोरंजन म्हणून ‘तमाशा’ किंवा तत्सम कार्यक्रम बघायला आवर्जून जायचे. व्हाईट कॉलर कामगार हे तेव्हा रेडिओ वरील गाण्यांच्या आधारे मनोरंजनाची भूक भागवायचे.

टी व्ही क्रांती आणि सिनेमातली गाणी 

1980 च्या दशकांत भारतात ‘टीव्ही क्रांती’ झाली आणि त्यानंतर आधी केवळ मोठ्या पडद्यावर दिसणारी गाणी घराघरांत दिसू लागली. नव्वदीमध्ये ‘ईटीसी बॉलीवूड’ सारखी टीव्ही चॅनल्स अस्तित्वात आली आणि त्यावर प्रदर्शित होऊ घातलेल्या सिनेमांची ‘ट्रेलर्स’, गाण्यांची झलक ही दाखवली जाऊ लागली. दूरदर्शनवरील ‘चित्रहार’, ‘छायागीत’ आणि मग पुढं 1992 नंतर खाजगी वाहिन्यांवरील ‘फिलिप्स टॉप टेन’ सारख्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना सिनेमातील गाणी पाहायला मिळायची.

गाण्यांवर सिनेमाचं यश

गाणी बघून किंवा ऐकूनच ‘हा सिनेमा पहायचा बॉस’ हा निर्णय तेव्हा झालेला असायचा. गाणी मोठ्या पडद्यावर बघणं याची सुद्धा तेव्हा क्रेझ असायची. कारण, तेव्हा सिनेमांना टीव्हीवर बघता येण्यासाठी जास्त काळ थांबावं लागायचं. आज ओटीटीवर सिनेमा सुरू असतांना गाणं लागलं की जी ‘पिच् पिच्’ होते, पटकन गाणं फॉरवर्ड करण्यासाठी रिमोट शोधलं जातं हे पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हते. तेव्हा गाण्यांमुळे सिनेमा सुपरहिट व्हायचे. आज ही जागा सिनेमाच्या कंटेंट, कथेने घेतली आहे. हेच कारण आहे की, एआर रहेमान यांनी दिलेल्या संगीतावर सडकून टीका होत असतांना देखील ‘छावा’ हा आजच्या घडीचा सर्वात मोठा सुपरहिट सिनेमा म्हणून जगभरात नावाजला जातोय.

चहाची टपरी आणि सिनेमाचं भवितव्य

एका गाण्यामुळे सुपरहिट ठरलेल्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘राजा हिंदुस्तानी’चं नाव पहिल्या क्रमांकावर घ्यावं लागेल. साधी कथा असलेला हा सिनेमा केवळ त्या सिनेमातील ‘परदेसी, परदेसी जाना नही’ या गाण्यामुळे हा सिनेमा सर्वांपर्यंत पोहोचला. या गाण्याचे गायक उदित नारायण, अलका याग्निक आणि सपना अवस्थी हे या सिनेमाचे खरे नायक, नायिका असं म्हटलं तरी अतिशोयोक्ती वाटणार नाही. भारतीय सिनेमा हा हिट की फ्लॉप हे गावातील चहाच्या टपरीवर ठरत असतं. तिथे जी गाणी वाजतात, ज्या सिनेमांवर लोक चहाचा घोट घेत चर्चा करतात त्या सिनेमांना लोक मान्यता मिळते. गाण्यांमुळे चाललेल्या सिनेमांसोबत हेच झालं आहे, त्यांनी आधी ग्रासरूट लेव्हलवर लोकांना अपील केलं आणि नंतर बॉक्स ऑफिसवर विक्रम प्रस्थापित केले. आज हा फॉर्म्युला चालेल की नाही ? याबद्दल मात्र शंका आहे.

प्रेक्षकांची बदललेली आवड

‘दिल तो पागल है’ या सिनेमाने देखील हा ट्रेंड सेट केला होता की, भारतीय सिनेमातील गाणी ही कथे इतकीच किंवा त्याहूनही अधिक महत्वाची आहेत. हा असा सिनेमा होता ज्याची सुरुवात ही एका गाण्याने होते आणि शेवट देखील गाण्यानेच होतो. या सिनेमाचे संगीत उत्तम सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी या सिनेमासाठी 150 ट्युन्स तयार केल्या होत्या. ज्यापैकी 10 गाण्यांचा समावेश करून या सिनेमाचा डोलारा उभारण्यात आला होता. हे केवळ तेव्हाच शक्य होतं, कारण तेव्हा प्रेक्षकांमध्ये जरा निवांतपणा होता. सिनेमा बघणं हे तेव्हा प्रेक्षकांसाठी आजच्या सारखं एखाद्या चेकलिस्टवर टिक करण्यासारखं नव्हतं. आजचा बहुतांश प्रेक्षक हा सिनेमा बघतांना सिनेमाचा, त्यातील गाण्यांचा मनसोक्त आनंद घेण्यापेक्षा त्या सिनेमाबद्दल मी कुठे आणि कोणत्या शब्दांत त्याबद्दल लिहेन, बोलेन याचा जास्त विचार करत असतो.

गाण्यातून उलगडणारी कथा

‘हम आप के है कौन’ या सिनेमाचं उदाहरण सुद्धा या सिरीज मध्ये खूप रिलिव्हन्ट आहे. प्रत्येक भावना ही गाण्यातून व्यक्त केली जाऊ शकते हे या सिनेमाची गाणी ऐकल्यावर प्रकर्षाने जाणवते. “आज हमारे दिल मे, अजब ये उल्झन है, सामने समधी जी, गा रही समधन है…” इतकी मोठी देखील एखाद्या गाण्याची पहिली ओळ असू शकते हे या सिनेमातील गाण्यातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच कळलं. चॉकलेट आवडतं हे सांगण्यासाठी गाणं म्हणणारी आपली सुंदर माधुरी ही या सिनेमात आपण बघितली. वहिनीचं कौतुक करण्यासाठी गाणं, रामाचे आभार माणण्यासाठी गाणं, प्रेमात होणाऱ्या संभाव्य विरहासाठी गाणं अशा सर्व प्रकारच्या गाण्यांना दिगदर्शक सूरज बडजात्या यांनी व्यवस्थितपणे पेरलं आहे. ही गाणी टिपिकल मासेसची गाणी नव्हती; ही गाणी खेळीमेळीचं वातावरणाची अपेक्षा ठेवणाऱ्या कौटुंबिक प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून लिहिण्यात आली होती. आता कदाचित या वातावरणाची अपेक्षा प्रेक्षकांना सिनेमाकडून राहिलेली नाहीये, मूळ कथेत जे काही सांगायचं आहे पटकन सांगा आणि आम्हाला निघू द्या हे डोक्यात असल्याने आज सिनेमातील गाणी ही आपल्याला मनोरंजनापेक्षा व्यत्यय अधिक वाटत आहेत हे आपण मान्य करू शकतो.

म्युझिकट हिट्सने बनवलेले स्टार

म्युझिकल हिट्सची जर यादी काढली तर त्यामध्ये बेवफा सनम या सिनेमाचा देखील समावेश करावा लागेल. “अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का…” या सोनू निगमच्या बॉलीवूडमधील पहिल्याच गाण्याने त्याला अक्षरशः रातोरात स्टार केलं होतं. हा सिनेमा किती जणांनी बघितला आहे ते माहीत नाही, पण या गाण्यातील खून करून पोलिसांपासून पळणाऱ्या भूषण कुमारला प्रत्येकानेच बघितलं असेल. या सिनेमातील “तुझे भुलना तो चाहा…” हे नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील गाणं हे आज सुद्धा ठराविक प्रेक्षक आवडीने ऐकतात.

ताल से ताल मिलाओ

‘ताल’ हा म्युझिकल हिट सिनेमा सुद्धा ए आर रहेमान यांच्या संगीताच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ‘ताल से ताल मिला’ आणि आणि या सिनेमातील इतर सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना त्या काळात ठेका धरण्यास भाग पाडलं होतं. या सिनेमा प्रमाणेच ‘सूर’, ‘झंकार बिट्स’ हे सिनेमे सुद्धा संगीतकारांची कथा सांगतात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

गाण्यांचा बदललेला ट्रेंड

2010 पासून पुढच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर, क्वचितच एखादा सिनेमा सापडेल जो की, गाण्यामुळे गाजला आहे. गाणी ऐकली जात आहेत, गुणगुणली जात आहेत, अरिजित सिंग हा आपल्या सर्वांच्या गळ्याचा ताईत झालेला आहे हे सर्व खरं आहे. पण, गाण्यांना ऐकून आपली पावलं आता सिनेमागृहाकडे खेचली जात नाहीत हे ही तितकंच खरं आहे. आजच्या गाण्यांमध्ये सुद्धा सिनेमाच्या कथेप्रमाणेच कंटेंट, गर्भित अर्थ वगैरे देण्याचा गीतकार आटोकाट प्रयत्न करतात हे आपण ऐकू शकतो. आजच्या सिनेमातील बरीच गाणी ही बॅकग्राऊंडला असतात आणि एक तर कथेबद्दल बोलत असतात किंवा कथेला पुढे नेणारी असतात.

2024 चं उदाहरण घ्यायचं झालं तर, स्त्री 2मधील “आज की रात…” हे तमन्ना भाटियाने परफॉर्म केलेलं आयटम सॉंग हे वर्षभरातील केवळ असं एकमेव गाणं आहे ज्याने प्रेक्षकांना आकर्षित केलं. बाकी, वर्षभरातील बरीच गाणी ही चांगली होती; पण, सिनेमात ती ‘साईड हिरो’ सारखी केवळ उपस्थित होती.

1 Comment

  • Aarti

    Very good write up with detailing

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ