नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम 85 टक्के पूर्ण झालं असून उर्वरित काम लवकर पूर्ण केलं जात आहे. या पहिल्या टप्प्याच्या सुरक्षेचे हस्तांतरण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) करण्याची अधिकृत कामकाज सुरू आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये या विमानतळावरच्या दोन धावपट्टींपैकी एका धावपट्टीवर विमान उतरवण्याची पहिली चाचणी यशस्वी झाली होती. या चाचणीनंतर एप्रिल महिन्यामध्ये या धावपट्टीचं लोकार्पण करणार असल्याचं सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जाहीर केलं होतं. मात्र अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी जून महिन्यात विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती दिली आहे.
अदानी कंपनीचे 74 टक्के आणि सिडकोच्या 26 टक्के भागीदारातून हे विमानतळ उभारलं जात आहे.
विमानतळाच्या जमीन संपादनासाठी सिडकोने 3 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम या प्रकल्पात गुंतवली. त्यानंतर एसबीआय बँकेकडून 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर अदानी समुहाने या विमानतळाच्या कामाला गती दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल सुरू करण्यासाठी विविध परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण केलं जाणार आहे. प्रत्यक्षात विमानतळ सुरू करण्यापूर्वी प्रवासी आल्यावर विमानतळावरील संचलनाची रंगीत तालीम घेतली जाईल. विमानतळ सुरू करण्यासाठी परवाना मिळाल्यानंतर या विमानतळातून प्रत्यक्षात विमानोड्डाण केले जाईल.