इसवी सनाच्या चौथ्या आणि पाचव्या शतकात, उत्तर भारतात गुप्तांचे भव्य साम्राज्य पसरलेले होते. त्याच वेळेसे दक्षिण भारतातील वाकाटक नावाचे महान सामर्थ्यवान राजवंश होते. सहाजिक त्यांच्या मध्ये साम्राज्याच्या विस्तारासाठी सतत चढाओढ सुरु होती. पुणे ताम्रपट लेखनात उल्लेख आहे की, गुप्त राजवटीतील चंद्रगुप्त विक्रमादित्याची कन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह वाकाटक युवराज रुद्रसेन द्वितीय याच्यासोबत झाला होता. प्रभावती गुप्त ही गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त आणि महाराणी कुबेरनागा यांची कन्या. तर रुद्रसेन द्वितीय हा वाकाटक सम्राट पृथ्विषेण प्रथम याचा पुत्र होता. पृथ्वीषेण आणि दुसरा चंद्रगुप्त एकमेकांना समकालीन होते.
चंद्रगुप्त द्वितीयने आपल्या पश्चिम भारतातील साम्राज्य विस्ताराच्या राजनैतिक उद्देशाने हा विवाह जुळवून आणला होता असा कयास आहे. हा विवाह अंदाजे इ.स. 380 मध्ये पाटलीपुत्र येथे मोठ्या थाटामाटात आणि वैभवात संपन्न झाला असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. वाकाटकांसोबत झालेल्या या वैवाहिक संबंधामुळे गुप्तांना फार मोठा राजकीय लाभ झाला.
राज्याची जबाबदारी घेणारी प्रभावती गुप्त
चंद्रगुप्तचा जावई आणि वाकाटक युवराज रुद्रसेन द्वितीय हा कालौघात वाकाटकांच्या सिंहासनावर आरूढ झाला. मात्र, दुर्दैवाने रुद्रसेन द्वितीय फार काळ राज्य करू शकला नाही. अवघ्या पाच वर्षांचा राज्यकारभार करून इ.स. 390 मध्ये त्याचे अकाली निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याची पत्नी प्रभावतीगुप्ता आणि दिवाकरसेन व दामोदरसेन हे दोन अल्पवयीन पुत्र मागे राहिले. असे म्हटले जाते कदाचित या बिकट परिस्थितीत चंद्रगुप्त द्वितीय आपल्या कन्येच्या सांत्वनासाठी आला होता. एकंदरीत राजकीय आणि कौटुंबिक परिस्थितीचा अंदाज घेवून त्याने प्रभावती गुप्ताला तिच्या अल्पवयीन पुत्रांच्या वतीने राज्यकारभार हाती घेण्याचा सल्ला दिला. आपल्या वडिलांच्या सल्ल्यानुसार प्रभावतीगुप्ताने आपल्या अल्पवयीन पुत्र दिवाकरसेन आणि दामोदरसेन यांच्या वतीने वाकाटक साम्राज्याचे कारभार हाती घेतला आणि ती वाकाटकांच्या साम्राज्याची राज्यपाल झाली.
हे ही वाचा : नवरात्रीतील उकडीची महालक्ष्मी
यशस्वीपणे साम्राज्य सांभाळणारी सम्राज्ञी
चंद्रगुप्त द्वितीयने आपल्या मुलीला खाजगी आणि राजकीय आयुष्यात शक्य तेवढी मदत केली यात वादच नाही. प्रभावती गुप्ताला वाकाटकांचे प्रशासन यशस्वीपणे चालवता यावे यासाठी त्याने पाटलीपुत्रातून अनेक अधिकारी पाठवले. आपल्या नातवंडांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणावरही विशेष भार दिला. जरी प्रभावतीगुप्ता वडिलांच्या सहाय्याने एक यशस्वी राज्यकर्ती म्हणून उभी राहिली असली तरी तिला स्वतःची वेगळी ओळख होती. तिच्या कारकीर्दीच्या काळात वाकाटक साम्राज्याची भरभराट झाली. मिळालेल्या पुराव्यानुसार तिने केवळ प्रशासन चालविण्यावर भर दिला नाही तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला. तिचे राज्यसंचालन दीर्घकाळ टिकले. तिच्या पुत्रांनी प्रत्यक्ष प्रशासन हाताळेपर्यंत ती स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहत होती.
वाकाटक सम्राज्ञीचा ताम्रपट
तिच्या राजवटीची नोंद घेणारा महत्वाचा उपलब्ध पुरावा म्हणजे वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता. ताम्रपटात आलेल्या नामनिर्देशांवरून तो मूळतः सध्याच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील असावा, असा प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांचा कयास आहे.
वाकाटकांचा कालक्रम ठरविणारा महत्त्वाचा दुवा म्हणके शके 380 मधील देवसेनाचा हिस्सेबोराळा प्रस्तरलेख. मात्र हा प्रस्तरलेख उजेडात येण्यापूर्वी प्रभावती गुप्ताचा पुणे ताम्रपट वाकाटक राजांचा कालक्रम ठरविणारा एकमेव ऐतिहासिक आधार होता.
हे ही वाचा : महिषासूरमर्दिनी आणि मूर्ती शास्त्र
ताम्रपटाचे स्वरुप
सदरील ताम्रपटाचे दोन पत्रे असून त्यांची लांबी 23 सेंमी. व रुंदी 14.4 सेंमी. आहे. दोन्ही पत्रे कडीमध्ये घातलेले असून त्या कडीवर मुद्रा आहे. मुद्रेचा आकार लंबवर्तुळाकार असून त्याची लांबी 7.2 सेंमी. व रुंदी 5.6 सेंमी. आहे. मुद्रेवर वरच्या भागात सूर्य व चंद्र आहेत. त्यानंतर चार ओळींच्या खाली एक फूल कोरलेले आहे. दोन्ही पत्र्यांच्या केवळ आतील भागावरच मजकूर लिहिला असून पहिल्या पत्र्यावर दहा व दुसऱ्यावर बारा ओळी आहेत. पहिल्या पत्र्यावरील अक्षरे ही दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांपेक्षा काहीशी मोठी आहेत. ताम्रपटाचे वजन 1.116 किग्रॅ. आहे. ताम्रपटातील लिपी कीलकशीर्षक असून काही अक्षरे वाकाटकांच्या इतर अभिलेखांमध्ये दिल्याप्रमाणे पेटिकाशीर्षक लिपीत आहेत. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘स’. मिराशींच्या मतानुसार हे दानपत्र सर्वप्रथम पेटिकाशीर्षकानुसार लिहावयाचे असावे, परंतु नंतर ते कीलकशीर्षक लिपीत लिहिले गेले. या वरून असे दिसते की, याचा कोरक्या उत्तर भारतातील रहिवासी असावा, जो कीलकशीर्षकात लिहिण्यात निपुण होता. ताम्रपटाची भाषा संस्कृत असून पहिल्या 20 ओळी आणि 22 वी ओळ गद्यरूपात, तर 21 वी ओळ पद्यरूपात आहे. मुद्रेवरील मजकूरही पद्यात लिहिलेला आहे. ताम्रपटाच्या पहिल्या पत्र्यावर प्रभावतीगुप्ताने आपल्या माहेर व सासरकडील मंडळी व त्यांच्या वैशिष्ट्यांची महती कोरवून घेतली आहे. दुसऱ्या पत्र्यावर आचार्य चनालस्वामी यांना प्रभावतीगुप्तेने दिलेले ग्रामदान व तत्संबंधित गोष्टींचे वर्णन केले आहे.
ताम्रपटाचा काळ
ताम्रपटातील मचकुरानुसार प्रभावतीगुप्ताचा युवराज दिवाकरसेन राज्य करीत असताना त्याच्या राज्यकालाच्या 13 व्या वर्षी कार्तिक शुक्ल द्वादशीस दिलेल्या दानाचा नोंद प्रस्तुत ताम्रपटात ठेवते. ताम्रपटातील गुप्त राजांची वंशावळ, प्रभावतीगुप्ताचा वाकाटक युवराज द्वितीय रुद्रसेन याच्याशी विवाह, त्याच्या मृत्युनंतर राणीने केलेला राज्यकारभार अशा सर्व ऐतिहासिक घटनांवरून या ताम्रपटाचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. 415 ते 420 आहे, असे अनुमान पुराभिलेखतज्ज्ञ शोभना गोखले यांनी केले आहे.
प्रभावतीगुप्ताबद्दल वर म्हटलेल्या माहितीचा प्रमुख स्रोत हा ताम्रपट आहे. मुळात गुप्तांसारख्या घराण्यातील असल्याने तिला आपल्या माहेर बद्दल विशेष अभिमान होता. ताम्रपटात तिने आपल्या माहेरच्या घराण्याची म्हणजेच गुप्तांची वंशावळ दिली आहे.
हे ही वाचा : महिषासूरमर्दिनी आणि मूर्ती शास्त्र भाग 2
भगवान विष्णुचे उपासक
या ताम्रपटामुळे हे स्पष्ट होते की, गुप्त सम्राट तसेच प्रभावतीगुप्ता विष्णूची उपासना करीत असत. राणीने ताम्रपटात स्वतःला ‘भगवदभक्ता’ असे म्हटले असून कार्तिक शुद्ध द्वादशीस दान केले आहे असाही उल्लेख आहे. वैष्णव-पंथामध्ये एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी अतिशय पुण्यकारक मानल्या जातात. असे मानले जाते की, तिच्याच प्रभावामुळे रुद्रसेनने त्याचा पारंपरिक शैव धर्म सोडून वैष्णव धर्म स्वीकारला होता.
रुद्रसेनाच्या पट्टराणी प्रभावतीगुप्ता
ताम्रपटातील उल्लेखानुसार प्रभावतीगुप्ता रुद्रसेनाची अग्रमहिषी म्हणजेच पट्टराणी होती आणि युवराज दिवाकरसेनची माता होती. रुद्रसेनाच्या मृत्यूनंतर तिने सु. 15 वर्षे राज्यकारभार पाहिला. तिने स्वतंत्रपणे दिलेल्या अनेक दानांचे उल्लेख ताम्रपटात आढळतात. या सर्व गोष्टींवरून तिचे तत्कालीन राजकारणातील श्रेष्ठत्व सिद्ध होते.