अंतराळात जाणं हा एक अद्भुत अनुभव आहे. पण तिथे आपल्या शरीरात खूप बदल होतात, हे तुम्हाला माहीत आहे का? गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे अंतराळवीरांना अनेक अडचणी येतात. वास, चव आणि तहान या संवेदनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे अंतराळवीरांना डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. अंतराळातील अनोखे वातावरण माणसाच्या शरीरासाठी नवे असते, त्यामुळे हे सर्व घडतं.
तहान न लागण्याचे कारण
अंतराळात तहान न लागण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे, शरीरातील द्रवांची जागा बदलते. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे द्रव पायांमध्ये साठतात. आणि म्हणून शरीराला तहान लागल्याचे संकेत मिळतात. पण अंतराळात द्रव समान रीतीने पसरतात. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीराला पाण्याची गरज भासत नाही. यामुळे तहान लागण्याचे संकेत मिळत नाहीत. आणि पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे डिहायड्रेशन होते.
हॉर्मोन्समध्ये बदल
अंतराळात शरीरातील हॉर्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होते आणि तहान कमी लागते. यावर उपाय म्हणून, अंतराळवीर ठराविक वेळ ठरवून पाणी पितात. यामुळे त्यांच्या शरीराची स्थिती आणि काम करण्याची क्षमता चांगली राहते. सुरुवातीच्या काळात, शरीरातील पाणी वरच्या दिशेने सरकल्यामुळे चेहरा सुजतो.
अन्नाची निवड
चेहरा सुजल्यामुळे नाक बंद होते. आणि वास घेण्याची क्षमता कमी होते. वास आणि चव यांचा जवळचा संबंध असल्यामुळे चवही कमी लागते. काही दिवसांनी आपल्या शरीराला या बदलांची सवय होते. पण अंतराळातील बंदिस्त वातावरणामुळे चव आणखी कमी होते. तिथे अनेक वास एकत्रित असल्याने वास घेण्यास अडचण येते. त्यामुळे अंतराळवीरांना जेवण बेचव लागते. म्हणून ते जेवणात तिखट सॉस, मसाले आणि इतर चव वाढवणाऱ्या गोष्टी वापरतात. अन्नाची योग्य निवडकता आणि मसाले यामुळे अंतराळवीरांचे मन प्रसन्न राहते आणि त्यांना आवश्यक पोषण मिळते.
पाण्याचा पुनर्वापर
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर, पाणी आणि इतर गोष्टी जपून वापराव्या लागतात. नासाने एक खास पाणी पुनर्वापर प्रणाली तयार केली आहे. यामुळे वापरलेले पाणी 98% परत मिळवता येते. हे यंत्र दीर्घकाळ चालणाऱ्या अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यंत्र लघवी, घाम आणि श्वासातील वाफेपासून पाणी परत मिळवते. त्यामुळे वारंवार अंतराळात पाणी पाठवण्याचा खर्च आणि त्रास कमी होतो.
पर्यावरण नियंत्रण प्रणाली
अंतराळात ‘पर्यावरण नियंत्रण आणि जीवन आधार प्रणाली’ (ECLSS) नावाची यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे, घाण पाणी स्वच्छ पाण्यात बदलते. यामध्ये ‘ब्राइन प्रोसेसर असेंब्ली’ नावाचा एक नवीन भाग जोडला आहे. हा भाग डिस्टिलेशन प्रक्रियेतून तयार होणाऱ्या लघवीतील ‘ब्राइन’मधून (खारट पाणी) आणखी पाणी काढतो. यामुळे पाणी परत मिळवण्याचे प्रमाण 93-94% वरून 98% पर्यंत वाढले आहे.
ताजे अन्न आणि भाज्या
हे नवीन तंत्रज्ञान पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि स्वच्छतेसाठी सतत स्वच्छ पाणी पुरवते. पाणी पुनर्वापर प्रणाली आणि जीवन आधार प्रणालीमुळे दीर्घकाळ चालणाऱ्या अंतराळ मोहिमा शक्य होतील. आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर विविध आणि चवदार जेवणाचा आनंद घेतात. त्यांना नियमितपणे ताजी फळे आणि भाज्या मिळतात. आणि ते काही पिके स्वतः देखील लावू शकतात. तरीही, कमी गुरुत्वाकर्षणामुळे अन्न तयार करणे आणि खाणे यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
अंतराळात मीठ आणि मिरपूड द्रव रुपात वापरण्यात येतात. जेणेकरून कण हवेत तरंगणार नाहीत. विविध प्रकारचे अन्न सुरक्षित आणि गुरुत्वाकर्षणाशिवाय खाण्यासाठी त्यांची खास पॅकिंग करण्यात येते.