आरदाळची ओळख बदलणाऱ्या पोलीस पाटील मनिषा गुरव

Breaking Barriers : खून, मारामाऱ्यांकरता प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरमधील आरदाळमध्ये 5 वर्षही ‘पुरूष पोलीस पाटील’ टिकेल की नाही, याची खात्री नव्हती. आधीच्या पुरुष पोलीस पाटलानं दबावानं राजीनामा दिला. पण मनिषा गुरव गावात 2012 पासून उत्तमपणे काम करत आहेत. गुन्हा झाल्यावर त्याची वर्दी पोहचवण्याबरोबरच गुन्हे होऊच नये, याकरता त्या गावात गावकरी आणि किशोरवयीनांकरता विशेष कार्यक्रम राबवतात.
[gspeech type=button]

ऑटो टेलर मशीन अर्थात एटीएम जसं 24 तास कार्यरत असतं ना, त्याप्रमाणेच गावात पोलीस पाटील 24 तास 365 दिवस कार्यरत असतात. गावात कुठे मुंगी शिरली किंवा कुणी शिंकलं याची नोंद पोलीस पाटीलांकडे असते. गावात कोणतीही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक घटना घडल्यावर आणि घडण्यापूर्वीच्या नोंदी पोलीस पाटील पोलिसांना कळवतात. एका अर्थानं गावात स्थानिक पातळीवर कायदासुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस पाटील करतात. 

किशोरवयीन मुल-मुलींच्या समुपदेशनाकरता मनिषांचा पुढाकार

आरदाळमध्ये अप्रिय घटना घडू नयेत, मुली सुरक्षित राहाव्यात याकरता मनिषा गुरव या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करतात. सध्या मुलींवरील वाढते अत्याचार पाहता अल्पवयीन अथवा प्रौढ व्यक्तींच्या प्रेमसंबंध तसेच एकतर्फि प्रेमाबद्दलची माहितीही पोलीस पाटीलांना ठेवावी लागते. 18 वर्षाहून कमी वयाच्या मुला-मुलींचं समुपदेशनही त्यांना करावं लागतं. मनिषा कॉलेजांमध्ये जाऊन विद्यार्थिनींना गोपनीय नंबर देतात. काही त्रास होत असल्यास या नंबरवर कळवण्याकरता मनिषा या मुलींचा विश्वास संपादित करतात. मनिषांना बऱ्याचदा मुली घरी येऊन त्यांच्या अडचणी सांगतात.  कोणत्याही नोकरीकरता चांगल्या वर्तुणुकीचा दाखला प्रत्येक व्यक्तिला पोलीस पाटलांकडून आणावा लागतो. याच गोष्टीचा वापर करत मनिषा शाळा-कॉलेजमधील मुलांशी संवाद साधतात. तुमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद पोलीस पाटलांकडे होत आहे. तुमची एकही गैरवर्तणूक तुमच्या दाखल्यावर परिणाम करेल आणि पुढे नोकरीवर परिणाम होईल, असं त्या मुलांना सांगतात. आणि मनिषांची ही मात्रा काम करत आहे. मध्यंतरी पबजीचं वेड मुलांमध्ये वाढल्यानं रात्री उशिरा पाण्याच्या उंच टाक्यांवर बसायचे. पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून शाळांमध्ये मनिषांनी पालक-मुलांकरता समुपदेशन कार्यक्रम घेतले. यामुळं गावात मोबाईल वापरावर आळा बसला. 

पोलीस पाटलाच्या कामाचे स्वरुप

गावात नैसर्गिक किंवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यावर पोलीस येईपर्यंत पोलीस पाटीलाला प्रेताजवळच थांबावे लागे. पूर्वी याकरता 24 तासही लागत. आडजागी अंधारात वगैरे थांबणे महिलेकरता गैरसोयीचे असायचे. त्यामुळे पुरुषच पोलीस पाटील असायचे. मात्र आता आधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे हा कालावधी एका तासावर आला आहे. गावात शांतता राखणे, गावात दंगा होत असेल तर तो कोणामुळे होतो हे गोपनीयरित्या पोलिसांना कळवणे, नैसर्गिक आपत्ती आल्यास सर्व यंत्रणांना तातडीनं कळवणे, सर्व प्रकारची स्थानिक गोपनीय माहिती पोलिसांना देणं, ही कामं पोलीस पाटलांना करायची असतात. 

वारसा दाखल्यात महत्त्वाची भूमिका

एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्या व्यक्तिच्या वारसांची नोंद अचूक आणि काटेकोरपणे करण्याचं कामही पोलीस पाटीलांना करायचे असते. वारसा दाखल्यात कधीकधी काही जण बहिण असूनही तिचं नाव लपवतात. अशा प्रसंगी सर्व खातरजमा करून हा वारसा हक्क नीटपणे द्यायचा असतो. वारसा दाखल्यावरूनच मृत व्यक्तिच्या मालमत्तेचे वाटे होतात. काही ठिकाणी पुरुष पोलीस पाटीलांनी जाणुनबुजून वारसादाखल्यात भावांचीच नावेच लिहिली आणि बहिणींची नावे लिहिली नसल्याचं आढळून आलं. महिला पोलीस पाटील खऱ्या माहितीची खातरजमा करून असा अन्याय होऊ देत नाहीत. कधीकधी दोन गटात एजंटगिरीचा प्रकार पोलीस पाटील करतात तो महिला पोलीस पाटील होऊ देत नाहीत. 

महसूली जबाबदाऱ्यांमध्ये वाढ

नुकतीच पोलीस पाटिलांच्या वेतनासोबतच जबाबदाऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळं महसूलखात्याची कामंही त्यांना करावी लागतात. निवडणुकीदरम्यान मतदारयाद्या तपासणे, पिक-पाणी पाहणे, शेती आधारकार्डाला लिंक करणे ही कामं वाढली.

वशंपरंपरागत घराण्यांकडून दडपशाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाटील, देसाई या घराण्यांना वारसा हक्काने हा मान मिळालेला होता. शेतसारा गोळा करणे, गुन्ह्याची वर्दी देणं ही काम पोलीस पाटील करायचे. मात्र शाहू महाराजांनी हे काम वंशपरंपरेत मर्यादीत न ठेवता गावातील जातीय समुदायानुसार द्यायचं ठरवलं. पुढं संपूर्ण महाराष्ट्रातही हाच नियम लागू झाला. पूर्वापार गावच्या जत्रेत, पालखीत आणि ग्रामदेवतेच्या वार्षिक पूजांमध्ये पुजाऱ्यांच्या नंतर पोलीस पाटीलांचा मान असतो. पण शिवाजी महाराजांच्या काळात वारसा हक्कानं पोलीस पाटीलकीचा मान मिळालेली घराणी सध्याच्या पदसिद्ध पोलीस पाटीलांना हा मान घेऊ देत नाहीत. पदसिद्ध पोलीस पाटीलांचा मान बळकावून स्वतःकडेच या गोष्टी वंशपरंपरेच्या पोलीस पाटीलांनी स्वतःकडेच ठेवल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मनिषा आणि इतर महिला पोलीस पाटीलांनी याविरोधात आवाज उठवला. पण सर्व वंशपरंपरावाली मंडळी त्यांच्या विरोधात एकवटली. पोलीस पाटीलांचं काम गावात तंटा होऊ न देणं असल्यानं कायद्यानं मिळालेला मान महिला पोलीस पाटीलांना समाज देत नसल्याची खंत मनिषा गुरव व्यक्त करतात. 

कामातून मनिषांचे उत्तर

मनिषा यांना गावात एखादी व्यक्ती विरोध करत असली तरी त्यावर मनिषा प्रतिक्रिया देत नाहीत. कोणत्याही कामाकरता त्या व्यक्तिंना पोलीस पाटिलांकडे यावंच लागतं. मनिषा कोणताही आकस न ठेवता त्या व्यक्तिचे काम करतात. आणि मग त्या व्यक्तिला मनिषांबद्दल विश्वास वाटू लागतो. विरोधात असलेली व्यक्ती मनिषा यांच्या कामात आपोआप सहकार्य करू लागते.

पोलीस पाटील भरती प्रक्रिया

एखाद्या गावातील पोलीस पाटील वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाला किंवा त्याने राजीनामा दिल्यावर प्रांत अधिकाऱ्याकडून भरती प्रक्रिया पार पाडते. त्या गावातील जातीनिहाय लोकसंख्येनुसार पोलीस पाटील पदाचे आरक्षण असते. तालुक्याच्या एकत्र जागांकरता भरतीकरता लेखी आणि तोंडी परिक्षेची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होते. स्पर्धापरिक्षा पद्धतीनुसारच ही प्रक्रिया असते. उत्तीर्ण उमेदवाराची निवड होते. पोलीस पाटीलांना प्रांतांकडून नेमणूकपत्र मिळत असलं तरी पगार मात्र पोलीस खात्याकडून मिळतो. पूर्वी फक्त पुरुषच पोलीस पाटील असायचे. आरक्षणामुळे गेल्या काही वर्षांपासून महिला पोलीस पाटीलही आहेत.

फॉर्म मागे घेण्यासाठी मनिषांवर दबाव

2012 मध्ये आजरा तालुक्यात पोलीस पाटीलांच्या जागेकरता सर्वसाधारण प्रवर्गातून जाहिरात प्रसिद्ध झाली. मनिषा गुरव निकषात बसत असल्याने त्यांनी अर्ज भरला. मनिषांनी अर्ज भरल्याचं कळल्यावर काही जण येऊन अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकू लागले. एकतर ओपन सीट आहे तर तुम्ही बाई कशाला फॉर्म भरता असं बोलू लागले. शिक्षण जास्त असल्याने मनिषा यांची निवड होईलच ही भीती त्यांना होती. तर काहीजण म्हणत होते, पुरुषांचं काम आहे कसं जमेल? मनिषा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि आरदाळच्या पोलीस पाटील यांची नियुक्ती झाली. 

ठराविक काळाची टांगती तलवार

एवढी महत्त्वाची जबाबदारी असूनही पाच वर्ष, दहा वर्ष अशा ठराविक काळाकरताच ही नियुक्ती असते. पोलीस पाटीलांना त्यांच्या वर्तनाचा दाखला दिल्यावरच परत नियुक्ती वाढवून मिळते. 58 व्या वर्षापर्यंत असे दाखले देत देतच नियुक्ती वाढवून मिळते. यातच एखाद्यानं खोटी तक्रार दिली तर नियुक्ती होत  नाही. कधी कधी फेरनियुक्ती प्रक्रियेत प्रांत कार्यालयात आर्थिक भ्रष्टाचारही होतो. वर्तनाचा दाखला दिल्यावरच पोलीस पाटीलांची फेरनियुक्ती पद्धत बदलावी अशी मागणी पोलीस पाटील करत आहेत. महिला पोलीस पाटील प्रामाणिकपणे काम करतात. पुरुषाप्रमाणे खांद्यावर हात टाकून चिरीमिरीचे व्यवहार होत नाहीत. त्यामुळं त्यांना खोट्या तक्रारींचा सामना करावा लागतो. परिणामी फेरनियुक्तीही रखडवली जाते. अजूनही पोलीस पाटील पदाकरता महिला आरक्षण निघालं तरी महिलांना त्याकरता अर्ज भरू दिले जात नाहीत. त्यांच्यावर अर्ज न भरण्याकरता दबाव टाकण्यात येतात. गावात गावपुढाऱ्यांकडून भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं. परीक्षेला बसू दिलं जात नाही. 

गुन्हा किंवा अपप्रकार घडूच नयेत याकरता मनिषा यांच्यासारख्या आणखी नऊ जणी कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात पोलीस पाटील म्हणून काम करत आहेत. एकेकाळी खून, मारामाऱ्यांकरता प्रसिद्ध असणाऱ्या आरदाळची ओळख आता मनिषांमुळे बदलत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ