पहिल्या दोन लेखांमध्ये आपण इच्छामरण का असायला पाहिजे त्याचा थोडासा ऊहापोह केला. यासाठी एखादा सक्षम कायदा करणे या प्रश्नावर ते उत्तर आहे हे उघड आहे. असा कायदा करताना कायद्याला विरोध होण्याची खूप दाट शक्यता आहे. या संभाव्य विरोधाचा विचार करायचा झाल्यास त्यात काय मुद्दे येतील ते पाहिले पाहिजे आणि त्या मुद्द्यांना व्यवस्थित उत्तर देता आले पाहिजे.
विरोधाचे संभाव्य मुद्दे खालील प्रमाणे असू शकतात –
सामाजिक कारणांमुळे इच्छामरणाचा पर्याय स्वीकारला तर..
दुर्धर आणि असाह्य वेदना देणारे आजार याबाबतीत इच्छामरण असावे असे आपण म्हणतो. काही देशांमध्ये असाध्य मानसिक आजारांसाठीसुद्धा हा पर्याय कायदेशीररित्या उपलब्ध आहे. मानसिक आजार असलेले रुग्ण आणि लहान मुले यांच्या बाबतीत हा कायदा कसा करायचा हा काहीसा नाजूक मुद्दा आहे. त्यासाठी सांगोपांग विचार होणे गरजेचे आहे. भविष्यात सामाजिक कारणे म्हणजे दारिद्र्य, एकटेपणा, नैराश्य यांमुळे लोक इच्छामरणाचा पर्याय स्वीकारू लागले तर काय करायचे असा एक प्रश्न याबाबतीत विचारला जाऊ शकतो?
हे ही वाचा : इच्छामरण एक काळाची गरज ? भाग 1
कायद्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी काय करावे?
इच्छामरणाची कायदेशीर प्रक्रिया निर्दोष ठेवण्यासाठी त्यात काय काळजी घेण्यात आलेली आहे आणि त्याचा दुरुपयोग होण्याचा संभव आहे का हा दुसरा मुद्दा. या कायद्याच्या दुरुपयोगाची भीती सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच वाटते. दुरुपयोग टाळण्यासाठी काय करता येईल हे ठरवले पाहिजे. बेल्जियममध्ये असाध्य रोगांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या बाबतीत दोन डॉक्टरांनी या प्रक्रियेस मान्यता द्यावी लागते तर मानसिक आजारांच्या बाबतीत यासाठी तीन डॉक्टर्स लागतात.
palliative medicineची सुधारणारी गुणवत्ता
असाध्य रोगांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी जे उपशमन औषधोपचार केले जातात त्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे.
महागडे उपचार परवडणारे नसतील तर इच्छामरणाचा आधार घेऊ शकतात!
काही अत्याधुनिक व खर्चिक उपचार उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी दीर्घकाल थांबायची तयारी हवी. शिवाय ते उपचार अत्यंत महागडे आहेत; काही वेळेला ते प्रायोगिक आहेत अशी परिस्थिती बऱ्याच वेळा पाश्चात्त्य देशांत आढळते. अशा प्रसंगी उपचारांपेक्षा इच्छामरणाचा पर्याय अवलंबला गेला तर; त्यात काही अनैतिक आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावर विरोधी पक्षाचे असे म्हणणे आहे की, शेवटी उपचार घ्यायचे का नाही हा निर्णय रुग्णाच्या हातीच असतो. रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या उपचारांची सक्ती कायदेशीर दृष्ट्या केली जात नाही किंवा करता येत नाही. त्यामुळे भविष्यकालीन महागडे उपचार रुग्णांनी नाकारले तर त्यात अनैतिक काय आहे?
पाश्चात्य देशांमध्ये श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीयांचा कल जास्त
इच्छा मरण कायदेशीर असलेल्या अनेक देशात या प्रश्नावरती जनमत कौल चाचण्या झाल्या आहेत. या सर्व चाचण्यांचा कल इच्छामरण असावे असाच आहे. शिवाय पाश्चात्य देशांमध्ये इच्छामरणाचा पर्याय स्वीकारून जीवन संपवणाऱ्या लोकांमध्ये श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय लोकांचे प्रमाण जास्त आहे असेही आढळले आहे. इच्छामरण कायदेशीर असणाऱ्या देशांमध्ये म्हणून तर अवयव दानाचे प्रमाण हळूहळू वाढते आहे, अशी देखील आकडेवारी आहे. इच्छा मरण कायद्याचा गैरवापर करून समाजातील दुर्बळ घटकांचे निर्धारण केले जाईल, अशी एक भीती व्यक्त केली जाते त्यासंदर्भात ही आकडेवारी महत्त्वाची आहे.
हे ही वाचा: इच्छामरण एक काळाची गरज भाग – 2
मानसोपचार तज्ञांमध्ये एकमत नाही
एखादा मानसिक आजार कोणत्या क्षणाला असाध्य व तो कायम असाध्यच राहतो का याविषयी मानसोपचार तज्ञात एकमत नाही आणि तसे एकमत होण्याची शक्यताही नाही.
इच्छामरण एक प्रकारे आत्महत्याच नाही काय?
स्वतःच्या अंतरासाठी उचललेले पाऊल म्हणजे आत्महत्या अशी आत्महत्येची सरळ सोपी व्याख्या केली जाते; मग इच्छा मरण हे देखील एक प्रकारे आत्महत्याच नाही काय? असा एक आक्षेप असतो. या दोन्हीतला फरक म्हणजे आत्महत्येचे निर्णय हे क्षणिक भावना वेगातून घेतले जातात तर इच्छा मरण हा पूर्ण विचारांती झालेला निर्णय असतो.
एकंदरीत या प्रश्नाला एकच एक बरोबर किंवा चूक अशी बाजू नाही हे उघड आहे. या प्रश्नावर ती भूमिका ठरवताना कोणकोणते मुद्दे विचारात घेतले जातील किंवा घेतले जायला हवेत त्याचे विवेचन आपण या तीन लेखांच्या मालिकेद्वारा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रश्नाला सामाजिक, नैतिक, राजकीय आर्थिक व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धार्मिक असे पैलू आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय किंवा कायदा हा एका दिवसात होणारा नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. ही इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी जनमताचा रेटा पाहिजे. त्या दृष्टीने व्यापक विचार मंथन होऊन नजीकच्या भविष्यकाळात याबाबतचा एखादा कायदा आपल्या संसदेने व राज्य विधिमंडळाने मंजूर करावा अशी अपेक्षा आहे.
प्रस्तुत लेखकाने इच्छामरण या विषयावर’ शेवटचा दिस गोड व्हावा… ’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
त्यात या महत्त्वाच्या विषयाचा विस्तृत आढावा घेतला आहे.