मुंबईकरांसाठी यंदाचं वर्ष खास असणार आहे. केंद्र सरकार मुंबईमध्ये तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार आहे. विशेष म्हणजे, हे विमानतळ समुद्रात कृत्रिम बेट तयार करून बांधले जाणार आहे.
हे नवीन विमानतळ सध्याच्या मुंबई विमानतळापासून 120 किलोमीटर दूर, पालघरमधील वाढवण बंदराजवळ एका कृत्रिम बेटावर तयार करणार आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, वाढवण बंदर हा 76,000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे आणि पूर्ण झाल्यावर हे बंदर जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक असेल.
मुंबईची लोकसंख्या आणि विमान प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेऊन हे नवीन विमानतळ उभारणे आवश्यक आहे. सध्या मुंबईत दोन विमानतळ आहेत एक सांताक्रूझ इथे आणि दुसरे नवी मुंबईत. नवी मुंबईतलं विमानतळ एप्रिल 2025पर्यंत सुरू होऊ शकते. मात्र भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिसऱ्या विमानतळाची गरज भासणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी वाढवण बंदराजवळ विमानतळ बनवण्याचा विचार मांडला होता. त्यांनी सांगितले की, “मुंबईला भविष्यात तिसऱ्या विमानतळाची गरज भासेल आणि आणि जगातील अनेक देशांमध्ये समुद्रात कृत्रिम बेट तयार करून विमानतळ उभारले जातात. माझं केंद्र सरकारला असं म्हणणं आहे की, वाढवण बंदराजवळ समुद्रात जमीन तयार करून विमानतळ बनवण्याच्या प्रस्तावाचा विचार करावा.”
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील तिसऱ्या विमानतळाचा विचार मांडला होता. त्यावेळी राज्य सरकार पालघर जिल्ह्यातील केळवा-माहीम किंवा डपचरी इथे देशांतर्गत विमानतळ उभारण्याचा विचार करत होते.
प्रकल्प कधी पूर्ण होईल?
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. पहिला टप्पा 2030 पर्यंत आणि दुसरा टप्पा 2039 पर्यंत पूर्ण होईल.
तज्ञांच्या मते, कृत्रिम बेटावर विमानतळ बांधायला 10 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल. पण, यामुळे प्रवाशांसाठी अधिक सोयीसुविधा मिळतील आणि जमीन मिळवण्यात येणाऱ्या अडचणी देखील टाळता येतील.
2013 मध्ये अभियांत्रिकी सेवाप्रमुख नेदरलँड्स एअरपोर्ट कन्सल्टंट्स या कंपनीने मुंबईजवळ समुद्रात एक कृत्रिम बेट बांधण्याची कल्पना मांडली होती. कंपनीचे अधिकारी जोएरी ऑलमन यांनी जवाहरलाल नेहरू बंदराच्या (JNPT) उत्तरेकडील जमिनीवर पुन्हा दावा करून बेट तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता.
मुंबई विमानतळावर वाढती गर्दी
ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबई विमानतळावर 31.6 लाख लोकांनी देशांतर्गत प्रवास केला. या विमानतळावर एका दिवसात 900 विमानांची वाहतूक शक्य आहे. पण सध्या इथे खूप गर्दी झाली आहे, त्यामुळे विमानांना उशीर होतोय.
एअर इंडियानेही त्यांच्या विमानांना उशीर होण्याची हीच समस्या असल्याचं सांगितलं आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी एक पत्रक काढून सांगितलं की, “मुंबईत धावपट्टीची क्षमता कमी असल्यामुळे विमानांच्या येण्या-जाण्यावर परिणाम होत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये, मुंबईतील 58 टक्के विमानांना उशीर याच कारणामुळे झाला.”
विमानतळ उभारणीतील आव्हान
वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेट उभारून बनवण्यात येणाऱ्या विमानतळाबद्दल अधिकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या आहेत. पहिली अडचण म्हणजे, नवीन विमानतळ आणि शहरातील सध्याचे विमानतळ यांच्यात लवकर आणि सोयीस्कर प्रवासाची व्यवस्था करावी लागेल. दुसरी गोष्ट, या मोठ्या प्रकल्पासाठी सरकारला खूप खर्च करावा लागेल, आणि त्याचा योग्य हिशोब द्यावा लागेल.
चीन आणि जपानसारखा प्रकल्प
वाढवण बंदराजवळील प्रस्तावित विमानतळ चीनमध्ये ईशान्येकडे बांधल्या जाणाऱ्या डालियान जिंझोऊ बे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखेच आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर, ते जगातील सर्वात मोठे कृत्रिम बेटावरील विमानतळ म्हणून ओळखले जाईल. हे बेट 20 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेलं असेल , यामध्ये चार धावपट्ट्या आणि 9,00,000 चौरस मीटरचा प्रवासी टर्मिनल असेल.
अधिकारी सांगतात की, हे विमानतळ 2035 पर्यंत पूर्ण होईल . त्यानंतर या ठिकाणी वर्षाला 8 कोटी प्रवासी आणि 5,40,000 विमानांची वाहतूक होणं शक्य होईल.