इच्छामरण एक काळाची गरज ? भाग 1

Euthanasia : वैद्यकशास्त्रातली तांत्रिक प्रगती, लसीकरण, प्रभावी औषधी योजना यामुळे लोकांचे आयुर्मान वाढते आहे. इच्छामरण किंवा सुखमरण हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. हा सुखमरण हा अत्यंत अर्थवाही शब्द मराठी विश्वकोशात वापरला गेला आहे. या विषयाला खूप बाजू आहेत. धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर पैलू असलेला हा विषय.
[gspeech type=button]

घंटा झाली खेळ संपला

पुसली पाटी भरले दप्तर

मजेत आता हसत निघालो

घर गाठावे आता सत्वर !

-दत्तप्रसाद दाभोळकर

दीर्घायुष्याचे वाढते प्रमाण आणि सामाजिक प्रश्न

आपले आयुष्य म्हणजे एक खेळच आहे, नाही का ? कवितेप्रमाणे या खेळाचा शेवटही हसत खेळत व्हावा असे आपल्याला वाटले तर त्यात काही चुकीचे नाही. आज आपण आपल्या अवतीभोवती पाहिले तर सर्वसाधारणपणे माणसाचे आयुर्मान वाढते आहे असे चित्र दिसते. हे वाढते आयुर्मान हे शाप आहे का वरदान? हा प्रश्न आजच्या आपल्या समाजापुढे उभा आहे. वैद्यकशास्त्रातली तांत्रिक प्रगती, लसीकरण, प्रभावी औषधी योजना यामुळे लोकांचे आयुर्मान वाढते आहे. त्यातून पूर्वी आपल्यासमोर नसलेले अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातच आपले नवशिक्षित तरुण खूप मोठ्या संख्येने विदेशाकडे जात आहेत मुले विदेशात आणि आई-वडील भारतात असे चित्र अनेक ठिकाणी दिसते आहे .या दीर्घायुषी वृद्धांचे करायचे काय?हा या सर्व परिस्थितीतून निर्माण झालेला एक प्रश्न.

वृद्धांच्या प्रश्नाकडे खरेच गांभिर्याने पाहिलं जातं?

हा प्रश्न मी नकारात्मकरीत्या विचारत नसून आपण समाज म्हणून वृद्धांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार केला आहे का? या प्रश्नाची व्याप्ती आपल्याला माहिती आहे का? हे एकप्रकारे अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न म्हणून हा प्रश्न आणि याचे उत्तर होकारार्थी असल्यास त्यावर आपल्याकडे काय उपाययोजना आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

खर्चिक वैद्यकीय उपचार आणि त्याकरता खर्च करण्याची क्षमता

अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न म्हणजे दुर्धर आजाराने ग्रासलेले,आत्यंतिक मरणप्राय यातना सहन करीत असलेले रुग्ण. असे अनेक रुग्ण केवळ कृत्रिम औषधोपचार पद्धतीच्या जोरावरती जिवंत आहेत आणि तसे ते जिवंत ठेवले जात आहेत असे चित्र आपण पाहत आहोत. या कृत्रिम उपचारांचे आपल्या सर्वाना माहित असणारे सगळ्यात मोठे उदाहरण व्हेंटिलेटर हे आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी कोमात असणारे पण कृत्रिम औषधोपचारावर जिवंत ठेवले गेलेले रुग्णही आहेत. आणि या सर्व गोष्टी काही स्वस्त नसतात. खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गोष्टीसाठी खर्च करायला लागतो. त्यासाठीची आर्थिक तरतूद असणारी कुटुंबे फार थोडी असतात. मध्यंतरी शेतकरी आत्महत्येचा एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता. त्यासाठीच्या इतर अनेक कारणांसोबत न पेलणारे वैद्यकीय खर्च हे त्यातले एक कारण होते याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो.

कायदेशीररित्या उपलब्ध असलेले इच्छामरण हा या प्रश्नांवरचा एक संभाव्य उपाय असू शकतो का?

डॉक्टर म्हणून अनेक मृत्यू मी पाहिले आहेत. एका डॉक्टरला त्याचे डॉक्टर म्हणून जे आयुष्य असतं त्यात मृत्यूचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. या मृत्यूच्या अपरिहार्य अंतिम क्षणापर्यंत रुग्णाची होणारी वाटचाल देखील पाहायला मिळते. काही रुग्णांच्या बाबत ही वाटचाल म्हणजे शरशय्येवरचा भीष्म होणे असते. पितामहांसमोर उत्तरायण आणि उत्तरायणात आलेल्या मृत्यूमुळे मिळणारा मोक्ष तरी होता. बऱ्याच रुग्णांच्या समोर असे ज्याला आपण’ श्रेयस ‘म्हणू असे काही नसते. त्यांना केवळ मृत्यू येत नाही म्हणून जगावे लागते. त्यांची ही तडफड त्यांना स्वतःला, त्यांच्या कुटुंबांना, आणि ज्यांच्या संवेदना अजून जिवंत आहेत अशा डॉक्टरांना किती त्रासदायक असते ते आपण सर्वजण जाणतो.

अज्ञातासोबतच वेदनेचीही भीती!

आपण व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर मरणकल्पनेकडे थोडेसे घाबरतच पाहतो. खरे तर आपण जन्माला आलो हे वास्तव आणि आपण मरणार आहोत हे वास्तव या दोन्ही बिंदूत आपला सगळा खेळ चालू असतो. मग जी गोष्ट आपल्याला निश्चितपणाने माहिती आहे त्याची आपल्याला एवढी का बरे भीती वाटत असावी ? मला असे वाटते त्याची दोन कारणे आहेत. एकतर पृथ्वीतलावरचा आपला मुक्काम संपून आपण कुठे जाणार आहोत हे नक्की नसते. त्याविषयी वेगवेगळ्या धर्मात, तत्त्वज्ञानात वेगवेगळे विचार मांडले गेले आहेत. पण त्यातले काय बरोबर आहे आणि काय नाही ते आपण मेल्याशिवाय कसे कळणार ? त्यामुळे ही भीती एका बाजूला अज्ञात ठिकाणी जायचे आहे त्याची आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मरताना आपल्याला किती वेदना होतील असे आपल्याला वाटत राहते. या वेदनेच्या भीतीने आपण मरणाला घाबरतो. वेदनारहीत मृत्यूचा पर्याय समोर दिला तर आपली भीती कमी होईल का? माहित नाही.

पाश्च्यात्य देशात इच्छामरण विषयाची व्याप्ती जास्त

इच्छामरण किंवा सुखमरण हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. हा सुखमरण हा अत्यंत अर्थवाही शब्द मराठी विश्वकोशात वापरला गेला आहे. या विषयाला खूप बाजू आहेत. धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर पैलू असलेला हा विषय. या विषयाची व्याप्ती खरोखर मोठी आहे. पाश्चात्य विचारविश्वात या संकल्पनेचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त झालेला आहे. काही युरोपीय व स्कॅनडिनेव्हियन देशात हा पर्याय कायदेशीररित्या उपलब्ध आहे. तेथे सध्या हा पर्याय असाध्य रोगाने ग्रस्त व अपरिमित वेदना सहन करणाऱ्या रुग्णांपुरता मर्यादित आहे. परंतु तेथे या संकल्पनेचा हळूहळू विस्तार होतो आहे.

इच्छामरणासंबंधीत काही बाजू

आपल्या जगण्याला काहीतरी प्रयोजन असायला पाहिजे. या प्रयोजनाकडे जाण्याची वाट म्हणजे आपले आयुष्य. काही वेळा आपण आपल्यापुढे म्हणजे आपल्या आयुष्यापुढे जी काही उद्दिष्टे ठेवलेली असतात ती पूर्ण होतात. आपल्यावर असलेल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, आणि सामाजिक जबाबदाऱ्या आपण पूर्ण केलेल्या असतात. आपल्या मनात एक प्रकारची तृप्ती असते, समाधान असते आणि सगळे काही ठीक चालले असताना हसत खेळत वेदनाविरहित मृत्यू यावा असा विचार आपल्या मनात येणे, ही या इच्छा मरणाच्या संकल्पनेची खूप पुढची बाजू. इच्छामरणाच्या जागतिक आणि भारतीय परिप्रेक्षात ही बाजू यायला अजून खूप अवधी आहे.

भारतातील इच्छा मरणाची कायदेशीर संकल्पना

नुकतेच भारतीय सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाच्या बाबतीत काही आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सुरवातीच्या बाजूकडे आपण वळलो आहोत असे म्हणायला हरकत नाही. आज भारतात इच्छामरणासाठी जो काही तुटपुंजा कायदेशीर आधार आहे त्याबद्दल थोडेसे सांगतो. ही कायदेशीर मान्यता अप्रत्यक्ष इच्छामरणासाठी आहे. म्हणजे मरणासन्न व निर्णय क्षमता गमावलेल्या रुग्णांबाबत लाईफ सपोर्ट सिस्टीम बंद करणे या पर्यायापुरता भारतीय कायद्याचा या संकल्पनेला आधार आहे. माणसाला जगण्याचा हक्क आहे म्हणजेच त्याला हवे तेव्हा मरण्याचा हक्क आहे का? हा विचार याबाबतच्या कायद्याच्या केंद्रस्थानी असणार आहे.

पुढील लेखात आपण या प्रश्नाचे अजून कांही बारकावे पाहूयात .

क्रमश: …

प्रस्तुत लेखकाने इच्छामरण या विषयावर’ शेवटचा दिस गोड व्हावा… ’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.

त्यात या महत्त्वाच्या विषयाचा विस्तृत आढावा घेतला आहे.

1 Comment

  • Ranjit Bhosale.

    ‘शेवटचा दिस गोड व्हावा ‘ पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमास मी हजर होतो. इच्छामरण हा एक मोठा गुंतगुंतीचा विषय खूप सहजरित्या मांडला. जास्त वय त्यातून वेगवेगळे आजार व त्यातून होणाऱ्या असह्य वेदना, रुग्णाची व कुटुंबाची होणारी फरफट,दवाखान्याचा न परवडणारा खर्च, असह्य वेदनेच ओझ घेऊन मृत्यूची वाट पाहत बसणाऱ्या साठी ‘इच्छामरण ‘ हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. ‘शेवटचा दिस गोड व्हावा ‘ पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमास मी हजर होतो. इच्छामरण हा एक मोठा गुंतगुंतीचा विषय खूप सहजरित्या मांडला. जास्त वय त्यातून वेगवेगळे आजार व त्यातून होणाऱ्या असह्य वेदना, रुग्णाची व कुटुंबाची होणारी फरफट,दवाखान्याचा न परवडणारा खर्च, असह्य वेदनेच ओझ घेऊन मृत्यूची वाट पाहत बसणाऱ्या साठी ‘इच्छामरण ‘ हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Malhar Certificate : महाराष्ट्रात 'झटका' मांस’ विक्रेत्यांसाठी 'मल्हार प्रमाणपत्र' ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे
World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा शब्द सध्या खूपदा ऐकायला येतो. पण ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ते
Roja : रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ