पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, पाणी कसे, किती आणि कधी प्यायचे याचे काही ठरलेले नियम आहेत. तहान लागल्यावरच पाणी प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात. शरीराला पाण्याची किती गरज आहे, हे नैसर्गिकरित्या आपल्याला लागणाऱ्या तहानेद्वारे सुचवले जाते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तहान कमी लागते, तर उन्हाळ्यात अधिक लागते. याशिवाय, शारीरिक श्रम करणाऱ्यांना जास्त तहान लागते, तर एसी मध्ये बसून काम करणाऱ्यांना कमी.
पाणी पिण्याचं शास्त्र
आपल्या शरीरामध्ये ‘अग्नी’ नावाचे एक तत्त्व आहे. हा अग्नी आपण सेवन केलेल्या अन्नाचे, पाण्याचे पचन करतो आणि शरीरासाठी उपयुक्त असे घटक बनवतो. जसं आगीवर पाणी टाकलं की ती आग विझते, अगदी तसंच तहान नसताना पाणी पिलं तर अग्नी मंदावतो. आणि मंद अग्नी म्हणजे अनेक रोगांचं मूळ. त्यामुळे, तहान लागल्यावरच पाणी प्या.
गरम पाणी पिण्याचे फायदे
आयुर्वेदानुसार गरम पाणी म्हणजेच ‘उष्णोदक’ हे औषधासारखे काम करते. गरम पाणी पचायला हलके असते आणि काही आजारांमध्ये फायदेशीर ठरते.
-
कफ आणि वात कमी करतं
गरम पाणी उष्ण असल्यामुळे कफ आणि वात कमी करतं. सर्दी, नाक चोंदणे, खोकला, घसा दुखणे, दम लागणे अशा समस्यांमध्ये गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो. कफ पातळ होऊन बाहेर पडतो आणि नाक, छाती, घसा मोकळा होतो.
2.पोटाच्या समस्यांवर उपाय
पोट फुगणे, पोट दुखणे, अपचन, यासारख्या पोटाच्या समस्यांवर गरम पाणी फायदेशीर आहे. हलका आहार घेऊन गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
3.ताप उतरण्यास मदत
ताप आल्यावर सुंठ, नागरमोथा, वाळा, चंदन यांसारख्या वनस्पती घालून उकळलेले गरम पाणी प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
गरम पाण्याबद्दलचे काही गैरसमज.
गरम पाणी पिण्याचे काही फायदे आहेत, पण काही गोष्टी लोकांच्या मनात चुकीच्या रूपात घर करून बसल्या आहेत.
गरम पाण्याने शरीर ‘डिटॉक्स’ होतं!
आजकाल ‘डिटॉक्स’ हा शब्द खूप वापरला जातो. लोकांना वाटतं, खूप गरम पाणी प्यायल्याने पोट साफ होतं, त्यामुळे सकाळी उठून लगेच गरम पाणी पिण्याची सवय अनेकांना लागली आहे. पण हे खरं नाही! तुम्ही जबरदस्तीने मलप्रवृत्ती करू शकत नाही. सकाळी पोट साफ होण्यासाठी रात्री लवकर जेवणं आणि आहारात तेल, तूप यांसारख्या स्निग्ध पदार्थांचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे.
गरम पाण्यात मध टाकून प्यायल्याने वजन कमी होतं
वजन कमी करण्यासाठी काही लोक गरम पाण्यात मध टाकून पितात. पण हे चुकीचं आहे! गरम पाणी आणि मध एकत्र घेणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. मध कधीही गरम करू नये. त्यामुळे मध घ्यायचा असेल तर तो साध्या पाण्यातून घ्या, गरम पाण्यातून नाही.
गरम पाण्याचे बाह्य उपयोग
सूज, वेदना किंवा स्नायूंना आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याचा शेक फायदेशीर ठरतो. नाक बंद असल्यास किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास गरम पाण्याच्या वाफेने आराम मिळतो. मुतखड्यामुळे वेदना होत असल्यास गरम पाण्याचा शेक फायदेशीर ठरतो.
गरम पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. पण, ते कधी आणि किती प्यावं हे आपल्या तहान आणि गरजेनुसार ठरवावं.