आसाममधील कॅन्सरग्रस्त रुग्णांची सखी दीपशिखा!!

Cancer Care Deepshika Foundation : सरकारी अधिकाऱ्याने नेमून दिलेल्या कामांव्यतिरिक्त एखा‌द्या घटकाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराने किती प्रभावी काम होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे देवाशीस शर्मा. आसाम सरकारमधील अधिकारी देवाशीस शर्मा यांनी आपल्या भूमिकेपल्याड जाऊन कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारा लेख.
[gspeech type=button]

भर कोविडमध्ये 65 कॅन्सर रुग्णांसोबतचा प्रवास

2020 मध्ये जगभर कोविडचा महासाथीने धुमाकूळ घातला होता. लॉकडाऊनचे दिवस आणि निर्बंध आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहेत. मे 2020 मध्ये देवाशीस शर्मा यांनी 2 हजार 731 किमीचा मुंबई ते गुवाहाटी असा रोड प्रवास केला होता. या प्रवासाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्यांच्यासोबत असलेले प्रवासी. 132 प्रवासी आणि सहा बसेस असा हा तांडा होता. या प्रवाशांमध्ये 65 कॅन्सर रुग्ण होते. त्यापैकी 40 महिला होत्या. यामध्ये रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या महिलांचा समावेश होता. त्यांच्यासोबतच मुंबईतल्या नारायण हृदयालया हॉस्पीटलमध्ये सर्जरी झालेल्या सहा लहान मुलांचाही समावेश होता. त्यावेळी कोविड 19 ची लाट सुरुच होती. उन्हाळासुद्धा वाढत चालला होता. अशा परिस्थितीत हे सर्व रुग्ण सुखरुपपणे आसाममध्ये पोहोचले होते. प्रवासातील या सगळ्या घटकांमुळे हा प्रवास लक्षवेधी ठरला होता.

सरकारी अधिकाऱ्यांच्या पल्याड जाऊन भूमिका निभावणं

देवाशीस शर्मा हे आसाम नागरी सेवेत 1992 मध्ये रुजू झाले. आसाम सरकारचे मुंबईमध्ये आसाम भवन आहे. देवाशीस शर्मा हे या आसाम भवनच्या उपनिवासी आयुक्तपदी सन 2003 ते मे 2021 या कालावधीत कार्यरत होते. देशाच्या विविध भागातून कॅन्सर उपचारांकरता रुग्ण मुंबईत येतात. कोविड काळामध्ये आसाममधून कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या रुग्णांना पुन्हा आसाममध्ये घेऊन जायचं होतं. त्यावेळी कोविडच्या भितीमुळे कोणी आरोग्यसेविका आणि डॉक्टर या रुग्णांसोबत आसामपर्यंतचा बसप्रवास करण्यासाठी तयार नव्हतं. त्यावेळी देवाशीस शर्मा यांनी या रुग्णांची जबाबदारी घेतली. आणि या सर्व रुग्णांना आसाममध्ये सुखरूप घेऊन गेले.

शर्मा हे सध्या आसाममधल्या मोरीगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. ते संगीतकार आहेत. शिवाय दीपशिखा नावाची स्वयंसेवी संस्था सांभाळतात. या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा केली जाते.

दीपशिखा संस्थेचा जन्म

सन 2003 मध्ये देवाशीस शर्मा हे मुंबईतल्या आसाम भवनमध्ये कार्यरत होते. त्यावेळी आसाम भवनची परिस्थिती खूप वाईट होती. त्यामुळे याठिकाणी एक चांगलं आसाम भवन उभारण्याची जबाबदारी शर्मा यांच्यावर दिली होती. आसाममधून मुंबईत वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या व्हिआयपी, व्हिव्हिआयपी आणि प्रवासी लोकांच्या सोईसाठी हे भवन उभारायचं हा प्राथमिक उ‌द्देश होता.

शर्मा हे जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना समजलं की, आसाममधून अनेक लोकं हे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णांना हॉस्पीटलच्या जवळपास राहण्यासाठी व अन्य खर्चासाठी प्रती दिवस 600 रुपये मोजावे लागतात. शर्मा त्याकाळात त्यांच्या मूळ जिल्ह्यात कॅन्सर तपासणी शिबिराचं नियोजन करत होते.

एकदा ते टाटा हॉस्पीटलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी आसाममधून आलेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यावेळी काही रुग्णांनी त्यांना सांगितलं की, कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी त्यांनी त्यांची जागा-जमीन विकलेली आहे. शिवाय मुंबईमध्ये उपचारासाठी आल्यावर इथे राहण्यासाठी जागा शोधणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं.

कॅन्सर रुग्णांसाठी उभारण्यात आलेलं देशातलं पहिलं भवन

आज आसाममध्ये सुसज्ज अशी हॉस्पिटल्स आहेत. मात्र, त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. तेव्हा आसाममधून अनेक रुग्ण हे मुंबईत उपचारासाठी यायचे. ही परिस्थिती पाहून देवाशीस यांनी मुंबईतलं आसाम भवन हे या कॅन्सर रुग्णांसाठी खुलं करावं अशी मागणी केली. या मागणीला अनेक प्रतिष्ठित लोकांनी, अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आज मुंबईतलं आसाम भवन हे खास कॅन्सर रुग्णांसाठीच उभारण्यात आलं. आज आसाम भवन हे देशातलं एकमेव भवन आहे जे की, एका राज्याने आपल्या राज्यांतील कॅन्सर रुग्णांच्या सोयीसाठी दुसऱ्या राज्यात उभारलेलं आहे.

दीपशिखाचा उदय

आसाम भवन हे फक्त कॅन्सर रुग्णांसाठी खुलं ठेवण्यात आलं. मात्र, तरिही इथली जागा ही रुग्णांसाठी पुरेशी नव्हती. कारण एखाद्या रुग्णाला उपचारासाठी सलग तीन चार महिने तरी मुंबईत राहावं लागायचं. उदा. ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णांना उपचार सुरू केल्यावर सलग 8 ते 10 महिने मुंबईत राहावं लागायचं. केमोथेरीपी, रेडीओथेरेपी आणि उपचारानंतर पूर्ण बरं होण्यासाठी लागणारा कलावधी यामध्ये ग्राह्य धरावा लागायचा. या संपूर्ण उपचाराच्या कालावधीत एका रुग्णासाठी एक खोली द्यावी लागायची. त्यामुळे, जागेची उपलब्धता हा एक विषय होता. याशिवाय उपचाराचा खर्च, रक्त, प्लेटलेट्स डोनेशन अशा अनेक गोष्टीसाठी सरकारी मदत ही पुरेश नव्हती. तेव्हा या सगळ्या गोष्टींची मदत कॅन्सर रुग्णांना करता यावी, या उ‌द्देशाने दीपशिखा या संस्थेचा उदय झाला.

सरकारी अधिकारी असल्याने स्वयंसेवी संस्था सुरू करण्यावर निर्बंध होते. मात्र, देवाशिस यांनी आसामचे तत्कालिन मुख्य सचिव यांच्याकडून रीतसर परवानगी घेत ही संस्था सुरु केली.

दीपशिखा – दिव्याचा प्रकाश असणारी शिखा

दीपशिखा हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ दिव्याचा प्रकाश असा आहे. प्रकाशमान दिवा हा आशा, मार्गदर्शक, ज्ञानाचा उंगम अशा सकारात्मक ऊर्जेचा प्रतिक आहे. या सकारात्मक ऊर्जेची कॅन्सरग्रस्त रुग्णांसह त्यांच्या कुंटुबियांना खूप गरज असते.

मुंबईतल्या मस्जिद बंदर इथे दीपशिखा संस्थेने कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपलं पहिलं वसतीगृह उभारलं. याठिकाणाहून सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि कॅन्सर आजारावर उपचार करणारं प्रिन्स अली खान हॉस्पिटल जवळ आहे. 20 रुग्णांसाठी हे वसतीगृह उभारलं होतं.

टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार खर्च कमी असतो. मात्र, तिथे असलेल्या सोईसुविधा या उपचारासाठी येणाऱ्या लोकांना पुरेशा नव्हत्या. दिवसाला हजारो रुग्ण तिथे येत असतात. मात्र, त्यांना डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळणे, रिपोर्ट्स करणे, प्रत्यक्षात उपचार सुरू करण्यासाठी विलंब होत असे. अशावेळी बाहेरील राज्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी हा सगळा काळ खूप त्रासदायक होत असे. अशावेळी अनेक रुग्ण हे मुंबईत येऊन अन्य पण परवडेल अशा खाजगी हॉस्पिटल्समधून उपचार करुन घेत असे. मात्र, नवीन अनोळखी शहरामध्ये उपचारासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की, ब्लड, प्लेटलेट्स मिळवणं कठीण होत असे. या कामामध्ये दीपशिखा संस्था ही रुग्णांना प्रत्यक्ष मदत करत होती.

संगीताच्या माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती

एकीकडे मुंबईत कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी कार्य करत असताना देवाशिस यांच्या लक्षात आलं की, आसाममधल्या ग्रामीण भागामध्ये कॅन्सर विषयी पुरेशी माहिती नाही. आजार झाल्यावर काय करावं याची येथील लोकांना काहिच कल्पना नाही. त्यामुळे या भागात जनजागृती करण्याची गरज असल्याचं त्यांनी ओळखलं. त्यांनी मग जसं जमेल तसं कामातून सुट्टी घेत आसाममध्ये ये – जा करत

तेथील छोट्या छोट्या गावात या आजाराच्या जगजागृतीच्या कामाला सुरुवात केली. आसाममधल्या बरपेटा जिल्ह्यातून त्यांनी सुरुवात केली. तंबाखू, सुपारी अशा सगळ्या गोष्टींविषयी ऐकून लोक कंटाळून जाऊ नये, म्हणून या जगजागृतीमध्ये त्यांनी चांगल्या गायकांना सामावून घेत विविध मनोरंजक गाण्यांतून ते लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवू लागले.

कॅन्सर शिबिराचं आयोजन

जनजागृतीच्या टप्प्यानंतर देवाशिस यांच्या संस्थेनं कॅन्सर निदान करणाऱ्या शिबिराचं आयोजन करण्यास सुरुवात केली. कॅन्सर झाला असल्यास त्याचं योग्य वेळी निदान झालं तर उपचार करून माणूस कॅन्सरमुक्त होऊ शकतो. या कॅन्सर तपासणी शिबिरांसाठी अनेक संस्था आर्थिक मदत करतात. त्यामुळे मॅमोग्राफी मशिन्स, डिजिटल एक्सरे, अल्ट्रा सोनोग्राफी मशिन्स, डॉक्टर आणि नर्सची टीम अशी संपूर्ण सुसज्ज अशी टीम या शिबिरामध्ये उपलब्ध असते.

जर कॅन्सरचं निदान योग्य आणि प्राथमिक टप्प्यात झालं तर तो संपूर्ण पसरण्याआधीच पूर्ण बरा करता येऊ शकतो. त्यामुळे माणूसही वाचतो शिवाय उपचाराचा खर्च कमी होतो. पर्यायी आरोग्य संस्थेवर ताण येत नाही.

नवी मुंबईमध्ये दीपशिखा संस्थेचं जाळं

वाशी इथे आसाम भवन आहे. या आसाम भवनच्या थोड्या अंतरावर कोपर खैरणे इथे 70 रुग्णांची राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी सेक्टर 28 मध्ये एक घर भाड्याने घेत तिथे 90 रुग्णांची व्यवस्था केली. तर आसाम भवनमध्ये 72 रुग्ण राहू शकत होते. या सर्व ठिकाणी रुग्ण हे अतिशय कमी किंमतीवर म्हणजे प्रती दिवस 100 किंवा 200 रुपये दर भरुन राहू शकत होते. मात्र, ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती अशा रुग्णांच्या राहण्याचे पैसेही दीपशिखा संस्था भरत होती.

जेवण आणि प्रवास खर्च

या संस्थेने अनेक दानशूर लोकांशी संपर्क साधून दान गोळा करत राहिले. या दानातून जमलेल्या पैशांतून त्यांनी या सगळ्या संस्थेतल्या वसतीगृहात आणि आसाम भवनमध्ये राहणाऱ्या रुग्णांना जेवण पुरविले. या शाकाहारी जेवणाची किंमत 10 रुपये असे. तसच दानातून मिळालेल्या बसेसच्या माध्यमातून या रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये मोफत ये जा केली जात असे.

दीपशिखा शिशू आश्रय स्थळ

दीपशिखा शिशू आश्रय स्थळ हे गुवाहाटी मध्ये आहे. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये उपचारासाठी येणाऱ्या लहान मुलांसाठी हे विशेष केंद्र सुरू केलं आहे. इथे मुलांना उपचाराशिवाय जेवण आणि प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.

कॅन्सर पुनर्वसन केंद्र

अनेकदा कॅन्सर आजार झाला असल्यामुळे या रुग्णांना पूर्ण क्षमतेने त्याचं पूर्वीचं काम करता येत नाही. तर कधी उपचारासाठी नोकरी सोडावी लागते. अशावेळी या आजारातून बरे झाल्यावर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणं कठीण होतं. अशा रुग्णांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आसाममधील जोहाट इथं पुनर्वसन केंद्र स्थापन केलं आहे. या केंद्रमध्ये रुग्णांना त्यांच्या आताच्या आरोग्य क्षमतेनुसार कोणती कामं करता येतील त्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसेच त्यासाठी लागणारे साधनं पुरवली जाणार आहेत.

याशिवाय या रुग्णांना आजारातून बरे झाल्यावर ज्या आरोग्य समस्या येतील त्या सोडवण्यासाठी आणि मानसिक आधार देण्यासाठी ही संस्था क्रियाशील आहे.

रुग्णसेवा करणाऱ्यांची काळजी घेणं

अनेकदा कॅन्सरग्रस्त रुग्णांवर त्यांच्या कुटुंबियांच्या शारीग्नि मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र, या रुग्ण 8/10 г घेणारे लोकं हे मानसिकरित्या खूप जास्त थकलेले असतात. त्याना मानसिक आधाराची खूपच गरज असते. रुग्णांच्या वेदना पाहणं, त्यांची पूर्ण सेवा करणं हे असं एक नाही तर अनेक रुग्णांचं करावं लागतं. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा दीपशिखा संस्थेकडून घेतली जाते. त्यांचं वेळोवेळी समुपदेशन केलं जातं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ