बॉलीवूडमध्ये मराठी मुली का कमी होत आहेत?

Bollywood : 100 वर्षाच्या बॉलीवूड सिनेमांच्या इतिहासात, मुंबई ही प्रमुख चित्रनगरी असूनही केवळ बोटांवर मोजता येतील इतक्याच मराठी मुली अभिनेत्री म्हणून यशस्वी करिअर करू शकल्या ही एक शोकांतिका आहे.
[gspeech type=button]

“ममता कुलकर्णी भारतात परतली” हे ऐकून, तिची इंस्टा वरील रील बघून तिच्या चाहत्यांना मध्यंतरी सुखद धक्का पोहोचला होता. 1990 च्या दशकांत बॉलीवूडमध्ये आपलं एक स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री ते दशक संपण्याच्या आसपास भारतातून गायब झाली होती. ‘करण अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘नसीब’, ‘बाझी’, ‘क्रांतीवीर’, ‘वक्त हमारा है’, ‘घातक’, ‘आशिक आवारा’ आणि ‘चायना गेट’ सारख्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या सिनेमात काम करणाऱ्या मराठमोळ्या मुलीनं आपल्या दिसण्याने, सहज अभिनयाने प्रेक्षक, समीक्षकांना प्रभावित केलं होतं.

ड्रग्स तस्करीत नाव आल्यानंतर गायब

20 एप्रिल 1972 रोजी जन्मलेल्या ममता कुलकर्णीने विकी गोस्वामी सोबत ‘गुपचुप’ लग्न केल्याच्या बातम्या देखील बराच काळ गाजल्या होत्या. पण, त्यामध्ये काही तथ्य नसल्याचं ममता कुलकर्णीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. ड्रग्ज तस्करीमध्ये नाव अडकल्याने विकी गोस्वामी आणि तिचं लग्न होऊ शकलं नाही, तिच्या स्वतःवर पण हे आरोप लागल्याने ती भारतातून पसार झाली होती हे देखील आता स्पष्ट झालं आहे.

आध्यात्मिक मार्गाकडे !

‘महाकुंभ मेला’ साठी भारतात आलेली ममता कुलकर्णी ही आता ‘महामंडलेश्वर’ या पद भूषवणारी साध्वी झाल्याचं जगाने बघितलं. “ममता आली” हे कळल्यावर तिच्या सिनेमा, सिरीजमधून कमबॅकच्या आशा लागून राहिलेले प्रेक्षक आणि कदाचित काही निर्माते नाराज झाले असणार हे नक्की. 2000 च्या दशकांत, वयाच्या 28 व्या वर्षी बॉलीवूड करिअरवर पाणी सोडत अध्यात्मिक मार्गाला लागलेल्या ममता इतकं यश त्यानंतर कोणत्याही मराठी मुलीला मिळालेलं नाहीये ही वस्तुस्थिती आहे. माधुरी दीक्षीत हिची इथे तुलना होऊ नये; कारण, तिचा एक वेगळा ‘क्लास’ आहे.

सिनेमापेक्षा इतर करिअरना पसंती

करिअर ‘पिक’वर असतांनाच मराठी मुली गायब का होतात ? किंवा मराठी घरात वाढलेल्या नायिकांच करिअर बॉलीवूड आजच्या कियारा अडवाणी, तमन्ना भाटीया यांच्यासारखं बहरु का देत नाहीत ? हे प्रत्येक मराठी प्रेक्षकाला पडलेले प्रश्न आहेत. 21 व्या शतकातील मराठी कुटुंब हे मुलींना केवळ अभ्यास, खेळ, आयटी इंजिनिअरिंग, परदेशात जाऊन स्थायिक होणे यासाठीच प्रोत्साहन देत आहेत का ? हा देखील एक प्रश्न आहे. बॉलीवूड मधील करिअर हे सामान्य, मध्यवर्गीय प्रेक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे का ? ते आजच्या मराठी कुटुंबांना शाश्वत, विश्वासार्ह वाटत नाही का ? बॉलीवूड मध्ये करिअर सुरू झाल्यावर मराठी कुटुंब हे त्यांच्या मुलींना आवश्यक तो पाठींबा, गरजेची असलेली इको सिस्टीम उपलब्ध करून देत नाहीत का? हे देखील विचार करण्यासारखे विषय आहेत.

स्वदेसची गायत्री जोशी

गायत्री जोशी या सुंदर आणि गुणी अभिनेत्रीची देखील अशीच स्टोरी आहे. २००५ च्या आशुतोष गोवारीकर दिगदर्शित ‘स्वदेस’ मध्ये तिने शाहरुख खान सोबत पदार्पण केलं. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर जरी यशस्वी झाला नसला तरी कित्येक प्रेक्षकांच्या ‘ऑल टाईम फेव्हरेट’ सिनेमाच्या यादीत त्याचा समावेश आहे. गायत्री जोशी ही तिच्या उंचीमुळे पुढे जाऊन ह्रितिक रोशन सोबत वगैरे काम करतांना दिसेल अशी आशा भाबड्या प्रेक्षकांना होती. पण, कसचं काय ? मॅडम का करिअर तो शुरु होनेसे पहले ही खतम हो गया. ‘स्वदेस’ हाच तिचा एकमेव सिनेमा ठरला. विकास ओबेरॉय या अब्जोप्ती व्यावसायिकाशी लग्न करून गायत्री आज दक्षिण मुंबईत वास्तव्य करत आहे. लग्न करा, सेटल व्हा असा तगादा कदाचित तिला देखील तिच्या पालकांनी लावला असावा.

माधुरीचा चढता आलेख

माधुरी दिक्षीत वगळता इतर कोणत्याही मराठी अभिनेत्रीने आपल्या या क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयाला न्याय दिला नाही किंवा प्रोफेशनली आपलं करिअर बिल्ड केलं नाही असं आपण म्हणू शकतो. 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ पासून आपलं करिअर सुरू केलेल्या माधुरीने 2024 मधील ‘भुलभुलैय्या 3’ पर्यंत ज्या पद्धतीने स्वतःला फिट, या क्षेत्राला समर्पित ठेवलं आहे हे कमाल आहे. 1988 च्या ‘तेजाब’ मधील एक, दो, तीन या गाण्याने तिच्या करिअरला ‘हाय स्पीड ट्रॅक’वर नेऊन ठेवलं. त्यानंतर 1990 च्या दशकांत माधुरी दिक्षीतचे आलेले ‘साजन’, ‘राजा’, ‘खलनायक’, ‘दिल’, ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘मृत्यूदंड’, ‘पुकार’, ‘लज्जा’, ‘देवदास’ सारख्या चित्रपटांनी तिचा करिअर आलेख नेहमीच चढत्या दिशेने ठेवला.

बॉलीवूडमध्ये सन्मानाचं स्थान

2002 मध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षीतने करोडो भारतीयांची निराशा करत अमेरिकेत स्थायिक डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. पाच वर्ष मोठ्या पडद्यापासून लांब राहिल्यानंतर माधुरी नेने यांनी 2007 मधील ‘आ जा नच ले’ पासून कमबॅक केलं. सिनेमाला संमिश्र यश मिळालं. त्यानंतर माधुरी यांनी आपला मोर्चा छोट्या पड‌द्याकडे वळवला. 2010 ते 2022 पर्यंत ‘झलक दिखला जा’ आणि ‘डान्स दिवाने’ या दोन रिऍलिटी शोज् च्या त्या जज झाल्या. प्रेक्षकांना दिसत राहिल्या. 2014 मधील ‘डेढ इशकीया’, 2019 मधील ‘टोटल धमाल’ आणि 2024 मधील ‘भुलभुलैय्या 3’ या सिनेमात माधुरी दीक्षीत यांनी अभिनय केला. 40 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये आपलं नाव सन्मानाने घ्यायला प्रेक्षकांना, निर्मात्यांना भाग पाडणारी माधुरी दीक्षीत ही एकमेव मराठी व्यक्ती आहे.

प‌द्मिनी कोल्हापुरेचीही एक्झीट

माधुरी दिक्षीत चा ‘एरा’ सुरू होण्यापूर्वी ‘प‌द्मिनी कोल्हापुरे’ यांनी बॉलीवूडमधील मराठी मुलगी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी ‘भवरे ने खिलाया फुल…’ हे गाणं असलेल्या ‘प्रेमरोग’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रस्कार पटकावला होता. ‘विधाता’, ‘प्यार झुकता नही’, ‘वो सात दिन’ ही त्यांची काही बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरलेल्या सिनेमांची नावं आहेत. त्यांच्या सख्ख्या बहिणीची मुलगी श्रद्धा कपूर ही आजची आघाडीची अभिनेत्री आहे.

एकाच दिग्दर्शकामुळे करिअर बाधा

1982 मध्ये मासूममधून बालकलाकाम म्हणून बॉलीवूडमध्ये आली. उर्मिला मातोंडकरने 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’, 1997 मधील ‘जुदाई’ आणि 1998 मधील ‘सत्या’ सारख्या सिनेमातून आपली ओळख निर्माण केली. पण, नंतर दिगदर्शक राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमांतून त्यांचं सतत दिसून येणं हे त्यांच्या करिअर आणि इमेज साठी घातक ठरलं. अभिनय, नृत्य पात्रता असूनही उर्मिला यांचं करिअर जितकं बहरु शकलं असतं तितकं ते बहरलं नाही. आपल्या वयापेक्षा लहान काश्मिरी मुलासोबत लग्न करणं, 8 वर्षात विभक्त होणं, राजकारणात प्रवेश करणं हे उर्मिला यांचं वागणं प्रेक्षकांना खूप उथळ वाटलं. कारण, एकदा तुम्ही सेलिब्रिटी झालात की, तुमच्यावर आपसूकच काही बंधनं येतात. जी व्यक्ती त्या बंधनांचा आदर करत आपलं लक्ष कामावर केंद्रित ठेवते ती जास्त काळ या क्षेत्रात टिकून राहते.

सोनसळी सोनाली

सोनाली बेंद्रे या सुंदर आणि गुणी अभिनेत्रीने 90 च्या दशकातील एक काळ गाजवला आहे. ‘दिलजले’, ‘मेजरसाब’, ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’, ‘हमारा दिल आपके पास है’ सारख्या सिनेमातून प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. 2002 मध्ये निर्माता गोल्डी बहेल यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर बऱ्याच काळ सोनाली या मोठ्या पडद्यापासून लांब होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली. 2022 मध्ये झी 5 वर प्रदर्शित झालेल्या ‘द ब्रोकन न्यूज’ मधील त्यांच्या न्यूज चॅनल हेडच्या रोलचं समीक्षक आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी देखील खूप कौतुक केलं.

खल्लास गर्ल इशा

खल्लास गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इशा कोपीकर हिने देखील जवळपास 40 हिंदी, तेलगू, तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे हे वाचून कदाचित आपल्याला देखील आश्चर्य वाटेल. इशा कोपीकरच्या हिट सिनेमांमध्ये ‘काटे’, ‘पिंजर’, ‘डॉन’, ‘सलाम-ए-ईश्क’ सारख्या सिनेमांचा समावेश होतो.

भूमीच्या उत्कृष्ट भूमिका

भूमी पेडणेकर या मराठी अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या आणि विविध प्रकारचे रोल्स करण्याच्या क्षमतेच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. 2015 मध्ये यशराज बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या ‘दम लगाके हैशा’ या तिच्या पहिल्याच सिनेमात तिने एका स्थूल व्यक्तीचा रोल साकारत प्रेक्षक आणि समीक्षकांचं स्वतःकडे लक्ष वेधलं. या आधी तिने 6 वर्ष यशराज फिल्म्समध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बाला’, ‘पती पत्नी और वो’, ‘गोविंदा नाम मेरा’, ‘रक्षाबंधन’, ‘भीड’, ‘भक्षक’ सारख्या सिनेमातून तिने आपली अभिनय क्षमता सिनेमागणिक रुंदावली आहे.

बोल्ड अँड ब्युटिफूल राधिका

राधिका आपटे या गुणी अभिनेत्रीने देखील आपल्या विविध रोल्स करण्याच्या क्षमतेच्या जोरावर मागच्या 8 वर्षापासून बॉलीवूड सिनेमा, सिरीजमध्ये कामं मिळवली आहेत. आपल्या बोल्ड अभिनय, फोटोज आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत रहाणाऱ्या राधिका आपटेने ‘लस्ट स्टोरीज्’, ‘रात अकेली है’, ‘पॅड मॅन’, ‘अंधाधून’ या सिनेमांत प्रमुख नायिका साकारली आहे.

100 वर्षाच्या बॉलीवूड सिनेमांच्या इतिहासात, मुंबई ही प्रमुख चित्रनगरी असूनही केवळ बोटांवर मोजता येतील इतक्याच मराठी मुली अभिनेत्री म्हणून यशस्वी करिअर करू शकल्या ही एक शोकांतिका आहे. येत्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलेल आणि आपल्या मराठी मुलींना देखील हिंदी सिनेमांध्ये केवळ नायिकांच्या मैत्रिणींचे रोल न मिळता सिनेमा अभिनेत्री म्हणून कास्ट केलं जाईल अशी आशा करूयात.

1 Comment

  • Rashi

    Ithe Smita Patil he mahtvache naav rahun gele ahe. Tya ek abhinay samppan ani guni abhinetri hotya

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ