अमेरिकेतून भारतीय नागरिकांना परत पाठवण्याचा (deportation) मुद्दा सध्या चर्चेत आहे. या संदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी 6 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यसभेत बोलताना सांगितले की, अमेरिकेतील अधिकाऱ्यांकडून अशा कारवाई याआधीही केल्या गेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेकडून भारतीय नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया काही नवीन नाही. हे 2009 पासून सुरू आहे. त्यांनी 2009 पासूनची आकडेवारी देखील संसदेत सादर केली.
2009 मध्ये अमेरिकेने 734 भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवले होते. त्यानंतर हळूहळू हा आकडा वाढला, 2024 मध्ये 1,000 पेक्षा जास्त भारतीय नागरिकांना परत पाठवण्यात आले.
अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनाने 2024 मध्ये 1,368 भारतीय नागरिकांना परत पाठवले. यापूर्वी, 2019 मध्ये सर्वाधिक 2,042 भारतीय नागरिक परत पाठवले होते.
विरोधी पक्षांचा गदारोळ
5 फेब्रुवारी 2025 रोजी अनधिकृतपणे स्थलांतर करणारे भारतीय नागरिक अमेरिकेतून भारतात परत आले, तेव्हा विरोधी पक्षांनी मोठे आंदोलन केले. त्यांनी म्हटले की, भारतीय नागरिकांना हातात बेड्या घालून आणण्यात आले. त्यांना अपमानित केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
यावर जयशंकर यांनी स्पष्ट केले की, परत पाठवलेल्यांना संपूर्ण प्रवासात पुरुषांना हातात बेड्या घातल्या होत्या, पण महिलांना आणि मुलांच्या हातात बेड्या नव्हत्या.
काँग्रेस नेते शशी थरुर, हे परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष आहेत. थरुर यांनी म्हटले की, भारतीय नागरिकांना परत घेणे हे सरकारचे कर्तव्य असले तरी, त्यांना अमेरिकेने लष्करी विमानाने पाठवले हे योग्य नाही.
“माझ्या मते, अमेरिकेने या सर्व लोकांना सामान्य व्यावसायिक विमानाने किंवा आवश्यक असल्यास, नागरी विमानाने पाठवले असते तर ते चांगले झाले असते. मात्र अमेरिकेने यासाठी लष्करी विमान वापरले हे मला थोडे वेगळे वाटते ” असे थरूर यांनी मीडिया समोर सांगितले.
थरूर यांनी असेही म्हटले की, अशा प्रकारे देशोधडीला पाठवणे भारताचा आणि भारतीयांचा अपमान आहे. हे पहिलेच परत पाठवलेले विमान नाही आणि हे शेवटचे देखील नसेल.
याआधी, बायडन प्रशासनाच्या कालावधीत अमेरिकेने बेकायदेशीर राहणाऱ्या 1100 भारतीयांना परत पाठवले होते. आणि अमेरिकेने अंदाज व्यक्त केला आहे की, सध्या अमेरिकेत 7,25,000 भारतीय नागरिक बेकायदेशीर आहेत आणि त्यांना परत पाठवले जाऊ शकते. मागील चार वर्षांमध्ये, अमेरिकेने मेक्सिको आणि कॅनडा सीमांवर सुमारे दोन लाख भारतीयांना अटक केली असल्याचं ANI ने आपल्या बातमीत सांगितले आहे.