आजकाल मोबाईल आणि इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. काही लोकांना तर दर 15 मिनिटांनी फोन बघितल्याशिवाय चैनच पडत नाही.
सगळ्यांनाच फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाचे व्यसन लागलं आहे. अनेक लोकं टीव्ही आणि वर्तमानपत्रांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत.
पण, जास्त वेळ मोबाईल किंवा स्क्रीन पाहत राहिल्याने झोप कमी होते. डोळ्यांना त्रास होणं, धुरकट दिसणे डोकेदुखी, नैराश्य येणं अश्या समस्यांना आपल्याला सामोर जावं लागत. आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना मध्येच मोबाईल बघितला, तर समोरच्याला वाईट वाटतं. आपण त्यांचा अपमान करत आहोत असं त्यांना वाटते.
पूर्वी टेलिफोन फक्त बोलण्यासाठी वापरला जायचा, पण आता मोबाईल फोन आल्यापासून आणि डिजिटल जगात जशी प्रगती होतं गेली तसं सोशल मीडिया, गेम्स, इंटरनेटमुळे मोबाईल फोनचा वापर देखील खूप वाढला आहे.
एका सर्वेनुसार , 70% लोक झोपण्याआधी सोशल मीडिया चेक करतात, तर 15% लोक झोपण्याआधी तासाभरापेक्षा जास्त मोबाईलवर असतात. मात्र, रात्री जास्त वेळ मोबाईल बघितल्याने याचा वाईट परिणाम झोपेवर आणि आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. यामुळे आपल्याला नैराश्यही येऊ शकते. म्हणून, मोबाईलचा अतिरेक वापर आरोग्यासाठी घातक आहे. आणि यापासून स्वतःला दूर ठेवण्याचे महत्त्व आता अनेकांच्या लक्षात येऊ लागले आहे. यातूनच सध्या डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना समोर येऊ लागली आहे.
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळासाठी मोबाईल, टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियापासून दूर राहणे. माणूस सतत एकाच प्रकारचे काम करून कंटाळतो. त्याचप्रमाणे, सतत फोन वापरणे, टीव्ही बघणे आणि सोशल मीडियावर राहणे याचा पण कंटाळा येऊ शकतो.
म्हणून, डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आपल्या खऱ्या आयुष्यावर लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.डिजिटल डिटॉक्समुळे माणूस खऱ्या जगात जगायला शिकतो आणि इतरांशी समोरासमोर संवाद जास्त होतो. यामुळे ताणतणाव कमी होतो आपण खुश राहायला शिकतो. थोडक्यात, डिजिटल डिटॉक्स म्हणजे फोन आणि इंटरनेटच्या जगातून बाहेर पडून खऱ्या जगात आनंद शोधणे.
डिजिटल डिटॉक्स का करावं ?
मोबाईल आणि सोशल मीडियाचा जास्त वापरामुळे इतर कामं करण्याची क्षमता कमी होते. उदाहरणार्थ, आपण सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली आणि आपल्याला पाहिजे तसे लाईक्स किंवा कमेंट्स मिळाले नाहीत, तर काही लोकांना खूप अस्वस्थ आणि बेचैन वाटतं.
या काल्पनिक जगात आपण इतके रमून जातो की, हे सगळं खरं नाही, हेच विसरून जातो. यामुळे आपला खरा जगाशी संपर्क खूप कमी होतो. हे टाळण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ खूप गरजेचं आहे.
तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे की नाही, हे कसं ओळखायचं?
यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या.
जर तुम्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुमचा फोन बघितला नाही, तर तुम्हाला चुकल्यासारखं किंवा अस्वस्थ वाटतं का? किंवा, तुमचा फोन तुमच्याजवळ नसेल, तर तुम्हाला निराश किंवा उदास वाटतं का? तसंच, काहीतरी महत्त्वाचं तुमच्याकडून राहून गेलं आहे, असं वाटतं का? फोन पाहिला नाही, तर जगाच्या माहितीमध्ये मागे पडलो असं वाटतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर ‘होय’ असतील, तर तुम्हाला नक्कीच डिजिटल डिटॉक्सची गरज आहे.
डिजिटल डिटॉक्स कसा करावा?
- वेळेचे नियोजन करा – दिवसभर फोन वापरण्यासाठी ठराविक वेळ ठरवा.ठराविक वेळेनंतर फोन बाजूला ठेवा.
- नोटिफिकेशन्स बंद करा – सतत नोटिफिकेशन आल्याने मन विचलित होते, त्यामुळे अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा.
- ॲप्सचा वापर कमी करा – ज्या ॲप्सची गरज नाही, ते डिलीट करा.
- फोनऐवजी पुस्तकं वाचा – रिकामा वेळ पुस्तक वाचण्यात घालवा.
- निसर्गात वेळ घालवा – बाहेर फिरायला जा आणि निसर्गाचा आनंद घ्या.
- कुटुंबासोबत वेळ घालवा – मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबासोबत गप्पा मारा