अरुणाचल प्रदेशातील 20 हत्तींना अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ वन्यजीव संरक्षण प्रकल्पात नवजीवन मिळाले आहे. या हत्तींना जंगलतोडीच्या कामातून मुक्त करण्यात आले आहे. आता ते मोकळेपणाने आणि आनंदाने जीवन जगतील. ‘वनतारा’ प्रकल्पात देश-विदेशातील जखमी आणि आजारी वन्य जीवांवर उपचार करण्यात येतात आणि त्यांची काळजी घेतली जाते.
या 20 हत्तींमध्ये 10 नर, 8 मादी, 1 वृद्ध हत्तीण आणि हत्तीचे एक लहान बाळ आहे. त्यात 10 वर्षांची लक्ष्मी नावाची हत्तीण देखील आहे. लक्ष्मीचा जन्म बंदीगृहात झाला होता. जंगलतोडीच्या कामामुळे लक्ष्मीला अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या.या जखमांवर उपचार न झाल्यामुळे त्या खोलवर गेल्या आहेत. त्यामुळे तिला मागच्या पायावर उभं राहणं कठीण होत आहे.
कायदेशीर कागदपत्रे पूर्ण
‘वनतारा’ संस्थेने वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 (Wildlife (Protection) Act) अंतर्गत आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आहेत. गुजरात वन विभागाकडून no-objection certificate आणि अरुणाचल प्रदेश वन विभागाकडून वाहतूक परवानगी मिळवली आहे. या हत्तींना विशेष डिझाइन केलेल्या ‘हत्ती अॅम्बुलन्स’मधून सुरक्षितपणे आणले जाईल. यावेळी माया नावाचं हत्तीचं बाळ त्याच्या आईसोबतच प्रवास करेल.
विशेष समिती आणि सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
त्रिपुरा उच्च न्यायालयाने निवडलेल्या एका विशेष समितीने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर ही बचाव मोहीम राबवण्यात आली.
हत्तींचा सुरक्षित प्रवास
‘वनतारा’ने हत्तींना सुरक्षितपणे नेण्यासाठी 200 हून अधिक तज्ज्ञांची टीम तयार केली आहे. या टीममध्ये हत्तींचे डॉक्टर, पशुसंवादक आणि अॅम्बुलन्स चालक समाविष्ट आहेत. जे सर्व नियमांचे पालन करून हत्तींना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेतील.
हत्ती मालकांना रोजगाराच्या संधी
‘वनतारा’ प्रकल्पामुळे हत्ती मालकांना, माहुतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच हत्तींची काळजी कशी घ्यावी, याबाबत वैज्ञानिक पद्धतींवर प्रशिक्षणही त्यांना दिले जाईल.
जंगलतोडीच्या कामातील त्रास
जंगलतोडीच्या कामात हत्तींना खूप त्रास सहन करावा लागतो. जड लाकडे वाहून नेण्यासाठी बराच वेळ काम करण्यास भाग पाडले जाते. योग्य आहार आणि वैद्यकीय देखभाल न मिळाल्याने हत्तींचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब होतं. तसेच, त्यांना साखळीने बांधून ठेवले जाते. काम करण्यासाठी यंत्रांप्रमाणे त्यांचा वापर केला जातो आणि यामुळे हत्तींना शारीरिक दुखापती आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. या सर्व त्रासामुळे हत्ती दुःखी होतात आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. पण ,’ वनतारा’ मध्ये हत्तींना आता मोकळ्या निसर्गात आनंदाने जीवन जगता येईल.
अरुणाचल प्रदेशात हत्तींची संख्या का वाढत आहे ?
आययूसीएन/एसएससी एशियन एलीफंट स्पेशालिस्ट ग्रुपच्या ( IUCN/SSC Asian Elephant Specialist Group ) 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अरुणाचल प्रदेशात खाजगी मालकीच्या हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या हत्तींना जंगलाच्या जवळपास ठेवलं जातं आणि यावेळी कैदेत असलेल्या मादी हत्तींचा संपर्क जंगली नर हत्तींशी येतो.
पण, आता वनतोडीवरील बंदीमुळे वनखात्याच्या कामांसाठी हत्तींच्या वापराची मागणी कमी झाल्याने खाजगी मालकीच्या हत्तींची संख्याही कमी होत आहे.
आरोग्याची काळजी आणि सुधारणा
नामसाईचे वन अधिकारी ताबांग जमो यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशात सुमारे 200 हत्ती आहेत आणि त्यांचे आरोग्य तपासले जात आहे. त्यामधील 20 हत्तींना ‘वनतारा’ मध्ये नेण्यात येत आहे, यामुळे त्यांना चांगले जीवन मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल.
डॉ. सोरांग तडाप यांनी सांगितले की, लॉगिंगमध्ये काम करणाऱ्या हत्तींना जखमा होतात आणि त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. ‘वनतारा’ मध्ये त्यांना योग्य उपचार मिळतील.
हत्तींचे मालक चौ थामसाला मेइन यांनी सांगितले की, आता त्यांना हत्तींना कामावर लावता येणार नाहीये. पण हत्तींना ‘वनतारा’ मध्ये चांगले आयुष्य मिळेल आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील, याबद्दल समाधान व्यक्त केले.