छोटा शकील – दाऊदचा सगळ्यात प्रामाणिक सहकारी

Chhota Shakeel : छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम हे  नागपाड्याच्या एकाच भागात रहायचे. नागपाड्यातल्या टेमकर मोहल्यात दोघांचं लहाणपण गेलं. दोघांची मैत्री झाली. जी पुढे आयुष्यभर टिकली. छोटा शकीलचं पूर्ण नाव आहे शकील बाबूमियां शेख.
[gspeech type=button]

मुंबई अंडरवर्ल्डमध्ये भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद ईब्राहीमच्या हाताखाली काम केलेल्या छोटा राजनसारख्या अनेक सहकाऱ्यांनी त्याच्याशी फारकत घेत स्वत :च्या गँग्ज सुरु केल्या. पण दाऊदनं त्याची गँग सुरु केल्यापासून आतापर्यंत त्याचे भाऊ आणि नातेवाईक सोडले तर एकच व्यक्ती अशी आहे, जी अजुनही त्याच्याशी प्रामाणिक आहे. ही व्यक्ती आहे छोटा शकील. 90 च्या दशकात छोटा राजननंतर डी कंपनीची धुरा सांभाळणारा छोटा शकील दाऊदचा खऱ्या अर्थानं उजवा हात आहे.

बालपणीची मैत्री

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम हे  नागपाड्याच्या एकाच भागात रहायचे. नागपाड्यातल्या टेमकर मोहल्यात दोघांचं लहाणपण गेलं. दोघांची मैत्री झाली. जी पुढे आयुष्यभर टिकली. छोटा शकीलचं पूर्ण नाव आहे शकील बाबूमियां शेख. दाऊद प्रमाणेच छोटा शकीलचे वडील बाबुमियाँ शेख हे साधे, प्रामाणिक आणि सरळमार्गी होते. पण शकीलनं लहानपणीच दाऊदच्या साथीनं गुन्हेगारीत प्रवेश केला. अधिकृतपणे गँग जॉईन करण्याआधी शकील ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा. शकील सुरुवातीपासूनच डी कंपनीत महत्वाच्या निर्णयांमध्ये, कामात सहभागी असायचा. पण त्याचं नाव मात्र कुठेही समोर यायचं नाही.

दाऊदच्या जवळ जाणाऱ्या प्रत्येक गँगस्टरला छोटा शकीलला सामोरं जावं लागायचं. तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं की आपल्यापेक्षा शकीलला जास्त महत्व आहे. आणि त्यानंतर ते गँगमधून बाहेर पडायचे. असे दाऊदचे उजवे हात समजले जाणारे अनेक गँगस्टर त्याला सोडून गेले. त्याला शकील जबाबदार आहे असंच समजलं जायचं. 

डी गँगचा CEO

1992 पर्यंत छोटा राजन हा डी गँगची मुंबईतली महत्वाची कामं बघायचा. खंडणी गोळा करणं, सुपारी घेणं आणि शत्रूंवर लक्ष ठेवणं अशी कामं छोटा राजनकडे होती. तर बॉलिवुड, तस्करी, हत्यारं, व्यवसाय आणि डी गँगची सगळी आर्थिक बाजू छोटा शकिल बघायचा. छोटा राजन आणि छोटा शकील यांच्यात नेहमीच दाऊदच्या जवळ राहण्यावरुन शीतयुद्ध सुरु असायचं. एकमेकांवर कुरघोड्या करत दोघंही आपापलं महत्व टिकवून होते. छोटा शकील हा पडद्यामागे राहून सगळी कामं करायचा तर छोटा राजन हा दाऊदचा माणूस म्हणून जगजाहीर होता. 1992 पासून दाऊद छोटा राजनला दूर ठेवू लागला. छोटा शकीलनं दाऊदला छोटा राजनच्या विरोधात भडकावलं असं म्हणतात. त्यानंतर 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर सगळीच गणितं बदलली. छोटा राजनला या प्लानपासून दूर ठेवण्यात आलं. त्यानं दाऊदशी फारकत घेत त्याची साथ सोडून स्वत :ची वेगळी वाट निवडली. यानंतर छोटा शकील खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला. डी कंपनीत दाऊदनं त्याला स्वतःच्या खालोखालचे अधिकार दिले. छोटा शकील डी कंपनीचा CEO म्हणून ओळखला जाऊ लागला.

पाकिस्तान व्हाया दुबई

1992 पर्यंत छोटा शकील मुंबई आणि दुबईत राहून डी कंपनीची कामं करायचा. पण 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर तो दुबईला पळून गेला तो कायमचा. 1993 च्या बॉम्बस्फोटात त्याचंही नाव आलं. त्यानंतर 1994 मध्ये तो दुबईतून पाकिस्तानात पळून गेला. असंही म्हटलं जातं की दाऊदला दुबईतून निघून पाकिस्तानात बस्तान बसवायचं होतं, म्हणून त्यानं छोटा शकीलला आधी पाकिस्तानात पाठवलं. त्यानं कराचीत दाऊदसाठी सगळी व्यवस्था केली आणि त्यानंतर दाऊद पाकिस्तानात गेला. छोटा राजन सोडून गेल्यानंतर छोटा शकिलनं डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय कामावरही लक्ष दिलं. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, तस्कर यांच्याशीही तो डील करु लागला. खासकरुन अफगाणिस्तानातील हत्यारं आणि ड्रग्ज माफीया यांच्याशी डिल करुन भारत, अमेरीका, थायलंड आणि पाकिस्तान अशा वेगवेगळ्या देशांत त्यानं हत्यारं आणि ड्रग्जची निर्यात करायला सुरुवात केली. डी कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात आणि यशस्वी करण्यात छोटा शकीलचा महत्वाचा वाटा मानला जातो.

ISI चा पाठींबा

छोटा शकील पाकिस्तानात गेल्यानंतर त्याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांसाठी पाकिस्तानच्या ISI ची मदत मिळाली. त्यांच्या मदतीनं त्यानं भारतात आणि जगभरातल्या अनेक देशांत डी कंपनीचं जाळं पसरवलं. काळे धंदे वाढवले. दाऊदसाठी पाकिस्तानात सगळी व्यवस्था करण्यातही आयएसआयनं मदत केली. पण आयएसआयनं त्याचा तेवढाच वापरही करुन घेतला. त्याच्या नावानं पाकिस्तान आणि आयएसआयसाठी हत्यारं खरेदी केली जायची. ज्यात वरवर पाकिस्तानचा काहीही संबंध दिसायचा नाही. त्याच्या नावानं आएसआय एक मोठी खाण विकत घेण्याचा प्रयत्न करत होतं. पण ती खाण अमेरिकेच्या ताब्यात गेली. छोटा शकील आणि दाऊद यांना अजुनही आयएसआय मदत करतेय हे अनेकदा सिद्ध झालंय.

भारताचं अपयश

छोटा शकील आणि दाऊदला पाकिस्तान व आयएसआय मदत करत आहेत, असं भारतानं अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलंय. पण पाकिस्तान आणि आयएसआयनं नेहमीच ही गोष्ट नाकारलीये. त्यामुळं भारताला दाऊद आणि छोटा शकीलला भारतात परत आणणं अजूनही शक्य झालेलं नाही.

अत्याधुनिक साधनांचा वापर

छोटा शकीलनं गुन्हेगारी क्षेत्रात अत्याधुनिक साधनांचा वापर करायला सुरुवात केली. पाकिस्तानमध्ये गेल्यावर आयएसनं सगळ्यात आधी छोटा शकीलचा आवाज क्लोन केला. कराचीतल्याच रहीम मर्चंट नावाच्या व्यक्तीचा आवाज छोटा शकिलचा आवाज म्हणून वापरायला सुरुवात केली. भारतात खंडणीसाठी फोनवरुन धमकी देताना तोच आवाज वापरला जायचा. छोटा शकील रहिमसोबत बसून असे कॉल्स करायचा. त्याच्या टोळीतल्या सहकाऱ्यांशी बोलताना तो कोडवर्ड्समध्ये बोलायचा. त्याच्या अशा पद्धतींमुळं त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणं शक्य होत नव्हतं.

अनिस आणि शकीलचं शितयुद्ध

पाकिस्तानात गेल्यानंतर छोटा शकीलनं डी गँगमध्ये त्याचं एक अढळपद बनवलं होतं. तोपर्यंत दाऊदचे अनेक वफादार त्याला सोडून गेले होते. गँगमध्ये छोटा शकीलचं महत्वं वाढलं होतं. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमला मात्र त्याचं वाढलेलं महत्व खटकायला लागलं होतं. गँगमधली छोटा शकीलची जागा त्याला हवी होती. त्यानं दाऊदकडे अनेकदा छोटा शकीलच्या तक्रारी केल्या. पण दाऊदनं त्याकडे फार लक्ष दिलं नाही. कारण छोटा शकीलला गमावणं दाऊदला परवडणारं नव्हतं.

मृत्यूचा बनाव

2017 मध्ये छोटा शकीलचा मृत्यू झाल्याची बातमी जगभर पसरली होती. त्याच्या मृत्यूची वेगवेगळी कारणं सांगितली जात होती. वेगवेगळ्या थेअरीज मांडल्या जात होत्या. पण हा सगळा बनाव असल्याचं काही दिवसांतच स्पष्ट झालं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ