महाकुंभ मेळाव्यातलं एक आकर्षण म्हणजे नागा साधू. अंगभर राख, कपाळावर शैवपंथीयांची कट्टर निशाणी आडव्या रेघा ओढत लावलेलं भस्म, त्यावर कुंकवाचा टिळा, गळ्यात रुद्राक्ष माळा, लांब केसांच्या जटा, हातात त्रिशूळ, भाला, तलवार अशी लढवय्या शस्त्रे आणि चेहऱ्यावर आक्रमता अशा रुपातील लाखो साधू हे कुंभमेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात.
मात्र, नागा साधू म्हणजे काय? ते इतके आक्रमक का असतात, त्यांचं राहणीमान, जबाबदारी काय असते आणि कुंभ मेळाव्यानंतर ते कुठे जातात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याचीच उत्तरं आपण या लेखात पाहणार आहोत.
नागा साधू : प्राचीन भारताची परंपरा
नागा साधू हा संन्यासांमधलाच एक प्रकार आहे. अध्यात्माचा शोध घेण्यासाठी कुटुंब, इच्छा-आकांक्षा अशा ऐहिक जीवनाचा पूर्णत: त्याग करुन तपस्या करणारे हे साधू असतात.
मोहंजोदडो कालखंडात नागा साधूंच्या अस्तित्वाची नोंद असल्याचं पाहायला मिळतं. देशातील धार्मिक इतिहासाचे ते अविभाज्य भाग आहेत. मोहंजोदडो कालखंडातील नाण्यांवर हे नागा साधू भगवान शिवाच्या पशुपतीनाथ अवताराची प्रार्थना करीत असल्याचं चित्र रेखाटलेलं आहे.
हे ही वाचा : महाकुंभ मेळाव्यातील उच्चशिक्षित साधू
मठाच्या सुरक्षेसाठी नागा साधूंची निर्मिती
आदीशंकराचार्यांनी ज्यावेळी चार मठांची स्थापना केली, तेव्हा या मठांच्या सुरक्षेचं आव्हान आदीशंकराचार्यांसमोर होतं. यावर उपाय म्हणून त्यांनी आक्रमक, धडाडी अशा साधूंचे सात गट निर्माण केले. त्यांच्यावर सनातन धर्माचं रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी दिली. पुढे याच योद्धा संन्यासींना नागा साधू म्हणून संबोधलं जाऊ लागलं.
‘नागा’ या शब्दाचा संस्कृत अर्थ ‘पर्वत’ असा होतो. हे संन्यासी पर्वतावर किंवा पर्वतामध्ये आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधासाठी एकांतात राहतात.
ऐहिक जगाचा त्याग करुन आश्रम किंवा गुहेत बसून ध्यानसाधना, योग आणि स्त्रोत्रपठण करत असतात.
योद्धा नागा साधू
धर्माच्या रक्षणासाठी नागा साधूंचं दल स्थापन केलं. त्यामुळे या साधूंकडे तलवारी, त्रिशूळ, धनुष्यबाण आणि गदा अशी पारंपारिक आयुधं आढळतात. मुघल आक्रमणांपासून शिव मंदिरांचं रक्षण करणं ही त्यांची मुख्य जबाबदारी होती.
मुघल सम्राट औरंगजेब यांनी ज्यावेळी ज्ञानवापी मंदिरावर हल्ला केला होता. त्यावेळी नागा साधूंनी या मुघल सैन्यांशी लढाई करत त्यांचा पराभव केला.
इतिहासकार, जेम्स जी. लॉचेटफेल्ड यांनी आपल्या ‘द इल्यूस्ट्रेटेड एन्साक्लोपिडीया ऑफ हिंदूइझम – व्हॉल्यूम वन’ या पुस्तकामध्ये त्यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, सन 1664 मध्ये ज्ञानवापी मंदिराची लढाई झाली होती. या लढाईमध्ये महानिर्वाण आखाड्याचे संन्यासी योद्धांनी सम्राटांच्या सैन्यांचा पराभव केला, अशी नोंद आहे.
वाराणसीतल्या स्थानिक लोककथेनुसार, सुमारे 40 हजार नागा साधूंनी काशी विश्वनाथ ज्योर्तिलिंगांचं रक्षण करण्यासाठी बलिदान दिलं आहे.
महिला नागा साधू
नागा साधू हे फक्त पुरुष नसतात. यामध्ये स्त्रियांचाही समावेश असतो. महिला साधूही त्यांच्या कुटुंबाचा आणि अन्य गोष्टींचा त्याग करुन संन्यास घेतात.
महिला नागा साधूंची दीक्षा सुद्धा ही पुरुषासारखीच खूप कठोर असते. नागा साधू म्हणून आखाड्यात सहभागी होण्याआधी या महिला साधूंना विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्यांना चाचण्या द्याव्या लागतात. यामध्ये पास झाल्यावरच त्यांना नागा साधू म्हणून स्वीकारलं जातं.
महिला नागा साधूंची प्रक्रिया
महिला संन्यासांना नागा साधू बनण्यासाठी साधारणत: 6 ते 12 वर्षे ब्रह्मचर्य पाळावं लागतं. या काळात त्यांना एकांतवासात, जंगलात किंवा गुहेमध्ये ध्यानसाधना, तपश्चर्या करावी लागते. त्या आखाड्यामध्ये किंवा मठामध्ये राहतात. येथे त्यांना आखाडा किंवा मठाकडून ठरवून दिलेल्या सर्व नियमांचं, आदेशाचं पालन करावं लागतं.
हे ही वाचा : ऐक्याचा महायज्ञ महाकुंभ मेळावा 2025
महिला नागा साधूंची वेशभूषा
पुरूष नागा साधू प्रमाणे महिला नागा साधू या नग्नावस्थेत नसतात. त्यांना भगव्या रंगांचा अखंड असलेला कपडा घालावा लागतो. या कापडाला कुठेही शिलाई नसते. याला ‘गंती’ असं म्हणतात. त्यांच्या कपाळावरील टिळ्यावरुन त्यांना ओळखलं जातं.
महिला नागा साधूंना समाजात ‘माता’ म्हणून संबोधलं जातं. अन्य संन्यासीही त्यांना माता म्हणूनच संबोधून त्यांना आदराचं स्थान देतात.
पिंडदान
नागा साधू म्हणून जीवन जगायला सुरुवात करण्यापूर्वी या महिला साधूही आपलं स्वत:चं पिंडदान करतात. सामान्य आयुष्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय हे त्या व्यक्तिचं आयुष्य संपलं आहे हे दर्शवण्यासाठी पिंड दान करतात.
मात्र, संन्यास घेऊन साधूचं आयुष्य जगणारे विशेषत: नागा साधू हे स्वत:च्या हातांनी स्वत:च पिंड दान करुन नागा साधूंची जबाबदारी स्वीकारत असतात. या पिंडदानाच्या माध्यमातून ते आपलं पूर्वायुष्य हे संपूर्णत: संपलं असून संन्यासी आणि नागा साधू म्हणून नव्याने आयुष्य जगत असल्याचं हे प्रतिक आहे.
महाकुंभ मेळावा आणि नागा साधू
‘द टेलिग्राफ’ च्या माहितीनुसार, देशात आज जवळपास 4 लाख नागा साधू आहेत. महाकुंभ मेळाव्यादरम्यान या नागा साधूंना पवित्र नदीत पहिल्या स्नानाचा मान दिलेला असतो.
शाही स्नानांच्या दिवशी मोठमोठ्या पालख्यांमधून या नागा साधूंचं नदीकाठावर आगमन होतं. या मिरवणुकांमधील शिस्त, भव्यता आणि मंत्रांच्या पठणातून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते.
शाही स्नानाच्या दिवशी नागा साधूंनी पवित्र स्नान केल्यावरच अन्य भाविक आणि साधू स्नान करतात.
नागा साधू हे त्यांच्यातील आध्यात्मिक शक्ती आणि निष्ठेसाठी विशेष ओळखले जातात. कुंभ मेळाव्यातील त्यांच्या अस्तित्वातून आध्यात्मिक आयुष्य, दैवी ज्ञान आणि स्व शोध किती महत्वाचा आहे याची प्रचिती अनेक भाविकांना येते.